किमती भडकल्या तरी नियोजन रद्द होणार नाही
नवी दिल्ली, ता. 25 – “महागाई वाढली आहे, उत्पादन कमी पडत आहे, तरी अशा परिस्थितीतही आम्ही नियोजनाचा त्याग करणार नाही’, असे केंद्रीय नियोजनमंत्री डी. पी. धर यांनी येथे स्पष्ट केले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे असेही म्हणाले, “वाढत्या किमतीबद्दलचा अभ्यास चालू आहे. आपल्याला जर अर्थव्यवस्था व तिचे स्वातंत्र्य राखावयाचे असेल तर काही त्याग करायला पाहिजे.
काश्मीर फाळणीस विरोध
काश्मीर – जम्मू व काश्मीर या राज्यांच्या कोणत्याही तऱ्हेच्या विभाजनास जनसंघ विरोध करेल, असे जम्मू-काश्मीर जनसंघचे अध्यक्ष शेख अब्दुल यांनी आज सांगितले. डेमोक्रटीक जनसंघाचे अध्यक्ष बलराज मधोक यांनी काश्मीरपासून जम्मू अलग करावे, असे आवाहन केले होते. या विधानास उद्देशून शेख म्हणाले, या विभाजनाच्या प्रश्नावर माझा पक्ष एक संध असून पक्षात कोणतीही फाटाफूट नाही.
मानव निर्मित बेट
पुणे – जपानमधील ओकिनावा येथे 1975 मध्ये भरणाऱ्या आंतरराष्ट्रीय सागरी प्रदर्शनात एका मानव निर्मित बेटाचा समावेश असणार आहे. उसळत्या लाटा व जोरदार वारे यांना तोंड देण्यासाठी हे बेट खाली-वर करण्याची सोय असेल व ते कार्य कॉम्प्युटरच्या मदतीने होईल. किनाऱ्यापासून चारशे मीटर्स अंतरावर हे कृत्रिम बेट असेल व ते चौरसाकार असून त्याची प्रत्येक बाजू 100 मीटर लांब असेल.
तुर्भे येथे आणखी एक खत कारखाना
नवी दिल्ली – पाचव्या योजनेत तुर्भे (महाराष्ट्र), मथुरा (उत्तर प्रदेश), भाटिया (पंजाब), कर्नाल किंवा पानिपत (हरियाना), आणि परादीप (ओरिसा) या ठिकाणी पाच नवे खत कारखाने उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या पाच कारखान्यांपैकी तीन अंतर्गत भागात आणि दोन किनारपट्टीवरील प्रदेशात उभारण्यात येतील. या कारखान्यांची दैनंदिन उत्पादन क्षमता अनुक्रमे 900 टन आणि 1300 टन अमोनिया अशी राहील.