भारतात स्त्रियांचे प्रमाण घटले!
चंदीगड, दि. 23 – सत्तर वर्षांपूर्वी भारतात पुरुष व स्त्रिया यांचे लोकसंख्येतील प्रमाण दर हजारास 972 असे होते, ते आता हजारास 930 असे झाले आहे. या प्रश्नाचे सखोल शास्त्रीय संशोधन झाले पाहिजे, असे पंजाब विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. गोसल यांचे मत आहे.
त्यांनी म्हटले आहे की, भारत हा पुरुषांचे प्रमाण जगात सर्वाधिक असणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. जवळजवळ प्रत्येक पाश्चिमात्य देशांत स्त्रियांचे प्रमाण पुरुषांहून अधिक आहे. भारतीय स्त्रियांमध्ये साक्षरतेचे असलेले कमी प्रमाण, अंधश्रद्धा, दुय्यम स्थान, पुरुषसत्ताक पद्धती अशी यामागची कारणे आहेत.
मुंबईत संस्कृत विद्यापीठ स्थापण्याचे प्रयत्न चालू
मुंबई – केंद्राच्या मदतीने मुंबईत संस्कृत विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे शिक्षणमंत्री नर. प्रभा राव यांनी संस्कृत दिन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले. याप्रसंगी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
आता स्वस्त धान्य दुकानातच चहा, साबण
पुणे – स्वस्त धान्य दुकानातून यापुढे चहा, साबण, आगपेट्या आदी जीवनावश्यक वस्तू विक्रीस ठेवण्याची योजना आहे. मूळ उत्पादकांकडून अशा दुकानांना 25 टक्के मालाचा पुरवठा व्हावा, असे मंत्री रत्नाप्पा कुंभार यांनी सांगितले.