बांगलादेशात लष्करी क्रांती
डाक्का, दि. 16 – बांगलादेशात काल पहाटे लष्करी क्रांती होऊन तीमध्ये अध्यक्ष शेख मुजीबूर रहमान मारले गेले. मुजीब यांचे एके काळचे सहकारी मुश्ताक अहमद हे नव्या सरकारचे अध्यक्ष बनले आहेत. देशात मार्शल लॉ पुकारण्यात आला आहे.
क्रांतीनंतर बांगलादेश नभोवाणीवरून सांगण्यात आले की, संपूर्ण देशात कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. लोकांनी घरातच राहावे. कोणीही गडबड करणारास कडक शासन करण्यात येईल. क्रांतीनंतर बांगलादेशचे नाव बदलण्यात आले असून ते बांगलादेशचे मुस्लीम संघराज्य असे ठेवण्यात आले आहे. यापूर्वी बांगलादेश हे निधर्मी राष्ट्र होते.
भारत सरकारला तीव्र खेद
नवी दिल्ली – शेख मुजीबूर रहमान यांच्या दुर्दैवी अंताबद्दल भारत सरकारने तीव्र खेद व्यक्त केला आहे. बांगलादेशातील राजकीय नेते व त्यांचे कुटुंबीय यांच्या हत्येच्या वार्ता ऐकून भारत सरकारला मोठा धक्का बसल्याने अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.
प्रवक्ता पुढे म्हणाला, बांगलादेशात घडलेल्या घटनांचा व पुढील वृत्तांचा सरकार काळजीपूर्वक अभ्यास करीत आहे व बारकाईने निरिक्षण करीत आहे. शेजारी देशातील या राजकीय घडामोडींचा भारतावर परिणाम झाल्यावाचून राहणार नाही. परंतु या घडामोडी म्हणजे बांगलादेशाचे “अंतर्गत प्रश्न’ आहेत.