महाराष्ट्रातील भूमिहीन मजुरांना स्वतःची घरे
नवी दिल्ली, दि. 14 – महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व चार लक्ष तीस हजार भूमिहीन मजुरांना येत्या चार वर्षांत स्वतःची घरे देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी नभोवाणी व दूरचित्रवाणी वरून बोलताना केली.
पंतप्रधानांच्या आर्थिक कार्यक्रमाचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, या कार्यक्रमात गरिबांना घरासाठी जागा देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पण महाराष्ट्राने त्याच्यापुढे जाऊन जागाच नव्हे तर प्रत्यक्ष घरे देण्याचा कार्यक्रम आखला आहे.
पु. ल. देशपांडे, मालशे, कुरुंदकर यांचे राजीनामे
पुणे – साहित्य अकादमीने कोकणी भाषेला स्वतंत्र वाङ्मयीन भाषा म्हणून जी मान्यता दिली, त्याचे निषेधार्थ पु. ल. देशपांडे, प्रा. नरहर कुरुंदकर व डॉ. स. ग. मालशे यांनी अकादमीच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत.
अकादमीला घालून दिलेले सारे दंडक धुडकावून अकादमीने स्वतंत्र वाङ्मयीन भाषा म्हणून कोकणीला मान्यता दिली आहे. त्याचे निषेधार्थ अकादमीवरच्या मराठी भाषिक सदस्यांनी आपले राजीनामे द्यावेत असा आदेश मराठी महामंडळाने दिला होता.