गोदावरी पाणी तंट्यावर लवादाशिवाय तोडगा निघेल
हैदराबाद, दि. 22 – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जे. वेंगल राव यांनी आज असा विश्वास व्यक्त केला की, गोदावरी पाणी वाटप तंट्यावर लवादाशिवाय देखील तोडगा निघू शकेल. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश व ओरिसा ही पाच राज्ये या तंट्यात गुंतलेली आहेत. वेंगलराव म्हणाले की, हा तंटा मिटविण्याचे दृष्टीने प्राथमिक चर्चा झाली.
ताबडतोब आपापली मालमत्ता जाहीर करा
गौहत्ती – सर्व आमदार, खासदार, जिल्हा कॉंग्रेस समित्यांचे सदस्य व प्रदेश कॉंग्रेस समितीचे सदस्य यांनी आपापली मालमत्ता ताबडतोब जाहीर करावी, असा आदेश आसाम प्रदेश कॉंग्रेस समितीने दिला आहे.
लाल रंगापेक्षा पिवळा रंग डोळ्यात अधिक भरतो
नवी दिल्ली – आगीचे बंबाचा परंपरागत रंग तांबडा असतो. परंतु पश्चिम जर्मनीच्या रंग तज्ज्ञांचे मते हा तांबडा रंग डोळ्यात जसा भरावा तसा भरत नाही. त्यांच्या मते गर्द पिवळा रंग हाच डोळ्यात भरण्यासारखा आहे. लिंबू रंग हाच रस्त्यावरील वाहनांना सुरक्षित व आकर्षक रंग आहे.
अलिप्त राष्ट्रांनी समान आर्थिक कार्यक्रम आखावा
नवी दिल्ली – अलिप्त राष्ट्रांनी समान राजकीय पवित्रा घ्यावा. त्यामुळे प्रगत राष्ट्रांकडून त्यांना आर्थिक व्यवहारांत न्याय संपादन करता येईल अशा तऱ्हेने जगात चिरकाल शांतता नांदण्याचे कामी साहाय्य करता येईल, असे उद्गार राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी काल मेक्सिकन अध्यक्षांना मेजवानी देतेवेळी काढले.