पंतप्रधानांचा निवडणूक वाद सोडविण्यास समिती
नवी दिल्ली, दि. 3 – पंतप्रधान आणि लोकसभेचे सभापती यांच्या निवडणुकीबाबतचे वाद असल्यास त्यावर निर्णय देण्यासाठी 9 सदस्यांची एक समिती नेमण्याची तरतूद राष्ट्रपतींनी केली आहे. या 9 जणांत लोकसभेचे 3, राज्यसभेचे 3 व राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले 3 सदस्य असतील. राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबत वाद असल्यास ते सोडविण्याकरिता अशीच 9 जणांची दुसरी एक समिती नेमली जाईल.
देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न
नवी दिल्ली – देशात अस्थिरता निर्माण करण्याचे पुन्हा प्रयत्न होत आहेत. परंतु जनतेच्या पाठिंब्याने आपण कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ, असा निश्चय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी व्यक्त केला.
मुठा नदीचे पात्र खोल होणार
पुणे – मुठा नदीच्या पात्रामध्ये विशेषतः पानशेत पुरानंतर फार मोठा गाळ, राडारोडा व मोठमोठ्या दगडी वाहून आल्यामुळे नदीचे पात्र जास्त उथळ झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी नदीस पूर आला असता पुराचे पाणी नदीच्या काठावरील दोन्ही भागांत जास्तीत जास्त पसरत असते. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनाही दरवर्षी या पुराचा धोका सोसावा लागतो.
अमेरिका खाद्यतेल पुरविणार
नवी दिल्ली – पीएल 480 योजनेखाली भारत अमेरिकेकडून 50 हजार टन सोयाबिन तेलाची आयात करणार आहे. या तेलाची किंमत 26 दशलक्ष रुपये होईल. याविषयीचा आज एक करार झाला. तेलाच्या किमतीपैकी 5 टक्के रक्कम प्रारंभी द्यायची असून 95 टक्के रक्कम दीर्घमुदतीत द्यावयाची आहे.