देशाच्या पश्चिम सीमेकडे जागरूकतेने लक्ष
नवी दिल्ली, दि. 5 – देशाच्या पश्चिम सीमेवरील परिस्थितीबाबत सरकार जागरूक आहे, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांगितले. देशाच्या पश्चिम सीमेवर शस्त्रांची मोठ्या प्रमाणावर जमवाजमव चालू असल्याबद्दल संसदीय सल्लागार समितीच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली. त्यावर पंतप्रधानांनी वरील खुलासा केला.
त्या म्हणाल्या, बांगलादेशात घडणाऱ्या घटनांकडे भारत अतिशय जागरूकतेने लक्ष देत आहे. पाकच्या दुतोंडी धोरणाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. पाकची ही कृती सिमला कराराच्या अंमलबजावणीच्या आड येत आहे, असेही पंतप्रधान म्हणाल्या.
अयोग्य जाहिरातींना बंदी घालण्यासाठी विधेयक
नागपूर – अयोग्य आणि अश्लील भित्तिपत्रके व जाहिरातींना बंदी घालण्यासाठी लवकरच विधेयक मांडण्यात येईल, असे आज विधान परिषदेत नगरविकास मंत्री रफिक झकेरिया यांनी सांगितले. ते म्हणाले की, विधेयकाचा मसुदा तयारही झाला आहे.
सावकारी कायद्यात दुरुस्ती
मुंबई – सावकारी कायद्यात दुरुस्ती करणारे एक विधेयक विधानसभेने मंजूर केले. परवान्याशिवाय सावकारी करणाऱ्यास या दुरुस्तीनुसार 1 वर्षापर्यंत कैद किंवा 1500 रुपयेपर्यंत दंड अथवा दोन्ही, अशी शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.