खेड्यांतील बातम्या अधिक द्याव्यात
नवी दिल्ली, दि. 25 – पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वीस-कलमी आर्थिक कार्यक्रमामुळे ग्रामीण भागात महत्त्वाचे आणि क्रांतिकारक बदल होत आहेत. या बदलांच्या बातम्या वृत्तपत्रांनी पुरेशा प्रमाणात द्यावयास पाहिजेत, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आज येथे वृत्तसंस्थांच्या कर्मचारीवर्गापुढे बोलताना केले. जवळपास सर्वच दैनिकांमध्ये प्रामुख्याने शहरी भागांतीलच बातम्या मोठ्या प्रमाणावर देण्यात येतात, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त केला.
कुटुंबनियोजन मोहिमेस फार मोठा प्रतिसाद
लंडन – कुटुंब नियोजन कार्यक्रम लोकांवर बळजबरीने लादला जात असल्याचा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जोरदारपणे इन्कार केला आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटीश दूरचित्रवाणीच्या वार्ताहरास नवी दिल्लीत मुलाखत देताना पंतप्रधानांनी हा इन्कार करून सांगितले की, भारतात कुटुंब नियोजन कार्यक्रमास जनतेचा फार मोठा प्रतिसाद मिळत आहे.
चीनच्या धोरणात बदल नाही
हॉंगकॉंग – चेअरमन माओंच्या निधनामुळे चीनच्या अंतर्गत व परराष्ट्र धोरणांमध्ये बदल होणार नाहीत, असे चीनचे पंतप्रधान हुआ कुओ-फेंग यांनी सांगितले.