राजकारण हा नेहमीच समाजकारणाचा एक भाग मानला जातो आणि समाजामध्ये चांगले स्थान आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी अनेक लोक राजकारणात प्रवेश करतात. साहजिकच मान आणि अपमान समाजकारण आणि राजकारण याच्या दोन बाजू असतात. गेल्या काही दिवसांमध्ये विविध पक्षांमधील हे मानापमानाचे रंगलेले राजकारण पाहता कोणताच राजकीय पक्ष या मानापमानापासून अलिप्त नाही, असे म्हणावे लागते.
भाजपमधील पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे या दोन भगिनींचे मानापमानाचे राजकारण असो किंवा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीमुळे निर्माण झालेले पक्षांतर्गत मानापमानाचे राजकारण असो किंवा तिकडे पंजाबमध्ये कॉंग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंग व नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामध्ये रंगलेले मानापमानाचे राजकारण असो सर्वत्रच आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतूनच हे मानापमानाचे राजकारण रंगत आहे, हे निश्चित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर त्यामध्ये महाराष्ट्रातील चार महत्त्वाच्या नेत्यांना संधी दिली; पण खासदार प्रीतम मुंडे यांना या मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती.
बीड जिल्हा आणि मराठवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे या नाराजीतूनच पक्षाकडे सादर केले होते. त्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. अर्थात, दिल्लीतून परत आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी मुंबईमध्ये मी नाराज नाही, अशी स्पष्ट ग्वाही दिली असली तरी त्यांच्या भाषणातील काही शब्द पाहिले तर नाराजी आहे हे दिसून येते. “मला माझ्या सर्व कार्यकर्त्यांची काळजी आहे. केवळ बहिणीला मंत्रिपद मिळावे यासाठी मी कधीच प्रयत्न करणार नाही,’ असे जरी पंकजा मुंडे यांनी या भाषणामध्ये म्हटले असले तरी कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यावर स्वार होऊन “मला सत्ता नको आहे’, हे त्यांचे विधान मात्र पुरेसे सूचक आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आपले नेता मानताना पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला नाही, हेसुद्धा याठिकाणी उल्लेखनीय मानावे लागते. यातील फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीमुळेच राज्यातील चार नेत्यांना मंत्रिपद मिळाले आहे, हे गृहीत आहे.
साहजिकच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी प्रीतम मुंडे यांच्या नावाची शिफारस केली नाही, असाच अर्थ पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढला तर त्यात चुकीचे नाही आणि त्यातूनच हे मानापमानाचे नाट्य रंगले आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधानानंतर सध्या या नाटकाला पूर्णविराम मिळाला असला, तरी भविष्यात योग्य संधी मिळताच पंकजा मुंडे पुन्हा एकदा योग्य वार करतील, असे संकेत मात्र त्यांच्या या भाषणातून मिळत आहेत. भाजपमध्ये अशा प्रकारची परिस्थिती असताना दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीमुळे पक्षांतर्गत रुसवा-फुगवा आणि मानापमान समोर येत आहे.
कोणत्याही प्रदेशाध्यक्षापेक्षा आक्रमकपणे काम करणाऱ्या नाना पटोले यांची पक्षातील प्रतिमा अधिक उजळ होत असल्याने इतर नेत्यांची नाराजी वाढणे साहजिकच आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले नाना पटोले यांना चांगले मंत्रिपद हवे आहे आणि हे चांगले मंत्रिपद त्यांना द्यायचे असेल, तर कुठल्यातरी अन्य मंत्र्यांचे खाते काढून त्यांना द्यावे लागणार आहे. याची जाणीव पक्षातील अनेक नेत्यांना असल्यामुळेच हे मानापमानाचे नाटक केले जात आहे. कॉंग्रेसचे नेते नितीन राऊत यांचे महत्त्वाचे असे ऊर्जा खाते नाना पटोले यांना हवे असल्याने नाना पटोले यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींचे कान भरण्याचे काम नितीन राऊत करत असल्याची चर्चाही आहे.
महत्त्वाचे म्हणजे नाना पटोले जे काही बोलत आहेत ते सर्वच पक्षातील इतर नेत्यांना मान्य नाही. उदाहरणार्थ, आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा नाना पटोले यांचा आरोप किंवा त्यांनी स्वबळाची केलेली भाषा सध्या तरी कॉंग्रेसच्या इतर नेत्यांना परवडणारी नाही. त्यातूनच पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांना सतत सारवासारव करावी लागत आहे. त्यातून वेगळेच एक मानापमानाचे नाट्य समोर येत आहे.
साहजिकच नजीकच्या कालावधीमध्ये पटोले यांना आपल्या कार्यशैलीत सुधारणा करण्याबाबत जर सूचना पक्षश्रेष्ठींकडून मिळाली तर आश्चर्य वाटायला नको, असेच कॉंग्रेस पक्षांतर्गत मानापमानाचे नाट्य सध्या पंजाबमध्येही रंगत आहे. भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये डेरेदाखल झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांना पक्षात आपली प्रतिष्ठा योग्य प्रमाणात जपली जाईल अशी अपेक्षा होती; पण पूर्वीपासूनच पंजाबमधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अमरिंदर सिंग त्यांच्यासोबत त्यांचे मतभेद असल्याने त्याचा फटका त्यांना बसला आहे आणि पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू यांचे मानापमानाचे नाट्य चांगलेच रंगू पाहात आहे.
पंजाबात येत्या काही कालावधीमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने अशा प्रकारचे मानापमान पक्षाला परवडणारे नसल्याने प्रियांका गांधी यांनी मध्यंतरी नवज्योतसिंग सिद्धू यांना नवी दिल्लीत पाचारण करून त्यांना समजही दिली होती; पण नवज्योतसिंग सिद्धू यांचा स्वभाव बघता त्यांच्या कार्यशैलीत कोणती सुधारणा होईल असे दिसत नाही. त्यातच दोन दिवसांपूर्वी नवज्योतसिंग सिद्धू यांनी आप पक्षाच्या कार्यशैलीचे कौतुक केल्यामुळे त्यांच्या मनात दुसरा काही विचार सुरू आहे की काय, या विषयीही चर्चा सुरू झाली आहे.
आप पक्षाने नेहमीच माझ्या कार्याची कदर केली आहे, अशा प्रकारचे विधान नवज्योतसिंग सिद्धू यांनी केल्यामुळे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळा विचार करण्याचा संकेत मिळत आहेत. ते आम आदमी पक्षाला चांगला चेहरा हवा असल्याने नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासारखा लोकप्रिय आणि आक्रमक नेता आपल्याला हवाच आहे, याबाबतच्या घडामोडी येत्या काही दिवसांतच समोर येऊ शकतात; पण पक्षांतर्गत मानापमान यामुळेच याबाबतच्या घडामोडी प्रत्यक्षात येतील.
अर्थात, अशा प्रकारच्या मानापमान नाट्याचा कोणताही अतिरेकी परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर आणि पक्षाच्या निवडणुकीतील यशावर होणार नाही याची काळजी पक्षश्रेष्ठींना नेहमीच घ्यावी लागते. साहजिकच आपल्या पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी आणि पक्षातील हे मानापमानाचे नाट्य बंद करण्यासाठी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी आणि भाजपाचे पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेतात हेच महत्त्वाचे आहे आणि ही भूमिका येत्या काही दिवसांमध्ये समोर येण्याची शक्यता आहे.