नवी दिल्ली ता. 23 – “”कोरियन राजकीय परिषद व्यापक व्हावी अशी राष्ट्रसंघाची इच्छा असेल, तर काही आंतरराष्ट्रीय प्रश्न सलोख्याने सुटण्यास मदत होईल,” अशा अर्थाचे सूचक उद्गार पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी आज राज्य परिषदेत आंतरराष्ट्रीय राजकारणावरील चर्चेची सुरुवात करताना काढले. ते पुढे म्हणाले, तटस्थ राष्ट्रांचा कोरियन राजकीय परिषदेत समावेश केल्याने जगात शांतता नांदण्यास मोठी मदत होईल. युरोपमधील राष्ट्रांनी आणि अमेरिकेने आशियातील राष्ट्रांची इच्छा डावलता कामा नये.
सुरक्षा समितीत प्रतिनिधित्वाची मागणी
सुरक्षा समितीचा उल्लेख करून पं. नेहरू पुढे म्हणाले, “”सुरक्षा समितीत आशियाई राष्ट्रांना पुरेसे आणि योग्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही. हिंदुस्थानला सुरक्षा समितीचे सभासदत्व मिळावे अशी इच्छा या मागे दडलेली नाही; पण आशियातील राष्ट्रांना सुरक्षा समितीत योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. आपले स्वार्थी राजकारण खेळण्यासाठी किंवा सत्ता- स्पर्धेची प्यादी मागेपुढे करण्यासाठी जी राष्ट्रे राष्ट्रसंघाचा दुरुपयोग करीत आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, आशियातील राष्ट्रांची राष्ट्रसंघाने उपेक्षा करणे यापुढे चालणार नाही. त्याचा परिणाम आशियात चांगला होणार नाही.”
शांतता काळातील महान कृत्य
शांततेच्या काळात कोणत्याही परक्या राष्ट्राचे लष्कर दुसऱ्या राष्ट्राच्या भूमीवर उतरले असल्याचा मानवी इतिहासात तरी दाखला नाही. पण शांतता स्थापण्यासाठी हिंदी लष्कर कोरियात गेले आहे आणि ही अत्यंत अलौकिक घटना आहे. याचा मला मोठा अभिमान वाटतो. कोरियांत पाठविलेले लष्कर अपुरे आहे आणि एक-दोन दिवसांत आणखी हिंदी लष्कर पाठविण्यात येणार आहे. परस्परविरोधी राष्ट्रे एकमेकांना शत्रुवत लेखत असली, तरी हिंदी सैन्याने आपल्या निःपक्षपाती कार्याने प्रशंसाच मिळविली आहे.”
राष्ट्रसंघाला कमी लेखणाऱ्या लोकांची पं. नेहरूंनी चांगलीच हजेरी घेतली आणि अशाप्रकारे एक जग निर्माण होणार नाही असा इशारा दिला. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात अनंत परिवर्तने घडून आली असून आणखीही घडण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.