-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
बलुचिस्तानचे नागरिक हे उत्कृष्ट लढवय्ये आहेत आणि त्यांना पाकिस्तान सरकार आणि सैन्य यांच्याबद्दल फार मोठा राग आहे. म्हणून आपण जर त्यांना नैतिक मदत दिली, त्यांचा प्रश्न हा युनो/आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला तर त्यांना नक्कीच मदत होईल.
वर्ष 2000 ते कालआजपर्यंत बलुचिस्तानात 2 हजार 644 हिंसक घटना घडल्या, ज्यामधे 4 हजार 267 सामान्य नागरिक, 1 हजार 566 पाकिस्तानी सैनिक, 1 हजार 602 अतिरेकी, 497 इतर, असे एकूण 7 हजार 932 जण मारले गेले. बलुचिस्तानच्या व्यापक हिताचा विरोध प्रारंभी पाकिस्तानने केला. आता चिनी आर्थिक अतिक्रमण तेच करत आहे. पाकिस्तानने गेल्या कित्येक वर्षांपासून बलुचिस्तानमध्ये शांततामय मार्गाने आपल्या अधिकारांसाठी आवाज उठविणाऱ्या बलुच जनतेचे पाकिस्तानी पोलीस, सशस्त्र दले, दहशतवादी गटांच्या मदतीने हनन केले आहे. बलुचिस्तानात पाकिस्तानकडून होणाऱ्या संघटित हत्याकांडाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना नेहमीच कठोरतेने मारण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सुरक्षा दलांविरोधात तिथल्या काही संघटना हल्ले करतात. सध्या सुरक्षा दलांविरोधातील हिंसाचारी कारवायांत वाढ होते आहे.
नुकत्याच बलुचिस्तानच्या “फ्रंटियर कॉर्प्स’च्या (एफसी)चौकीवर झालेल्या हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तथापि, या चकमकीत सातपेक्षाही अधिक जणांचा बळी गेला व कित्येक सैनिक गंभीर जखमी झाले. त्या आधी बलुचिस्तानच्या पंजगुर जिल्ह्यातील फुटबॉल मैदानाजवळील हल्ल्यात दोन प्रेक्षकांचा बळी गेला व सहा जण जखमी झाले. “फ्रंटियर कॉर्प्स’वरील हल्ल्याआधी लष्कर, निमलष्करी बले आणि पोलीस दलांवर अनेकानेक हल्ले झालेले आहेत. दोन महिन्यांपूर्वी ऑक्टोबरच्या मध्यात ग्वादर जिल्ह्याच्या ओरमारा भागातील किनारी महामार्गावर सुरक्षा दलांच्या ताफ्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता व त्यात 14 सुरक्षा कर्मचारी, “एफसी’चे सात कर्मचारी आणि तितकेच सुरक्षारक्षक मृत्युमुखी पडले होते.
पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानमध्ये आनेक मोहिमा चालवल्या. या मोहिमांमध्ये दहशतवादी, धार्मिक कट्टरपंथीयांच्या “डेथ स्कॉड’चा वापर करण्यात येतो. बलुचिस्तानमध्ये राजकीय कार्यकर्ते, बुद्धिजीवी, महिला, त्यांच्या बालकांनाही सुरक्षा यंत्रणा अचानक कधीही गायब करतात. “एफसी’वरील हल्ल्याच्या पाच दिवसआधी सुरक्षाबलांनी बलुचिस्तान प्रांताच्या आवारा भागातील एका चकमकीत दहा संशयित दहशतवाद्यांना (सामान्य कार्यकर्त्यांना) ठार मारले होते. “फ्रंटियर कॉर्प्स’ पाकिस्तानचे एक निमलष्करी दल आहे, जे सध्या अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेवर, बलुचिस्तान व खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी विरोधी अभियान/कायदा-व्यवस्था कायम राखण्यासाठी तैनात आहे. पाकिस्तानी सुरक्षाबलांनी या भागात याआधी “ऑपरेशन रद्द-उल-फसाद’च्या अंतर्गत दहशतवाद-विरोधी अभियान राबविले आहे. या लष्करी अभियानाचा हेतू बलुचिस्तानमधील उग्रवाद्यांच्या व्यापक यंत्रणेला संपवण्याचा होता. 2014 रोजी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील उत्तर वजिरिस्तानमधील उग्रवाद्यांविरोधात “ऑपरेशन जर्ब-ए-अज्ब’ राबवले होते. या सगळ्या अभियानांना पाकिस्तानी पंजाबी आणि देशाच्या उर्वरित भागांतील लढ्याच्या रूपाने पाहिले जाते.
अफगाणिस्तान आणि इराणशी सीमा लागून असलेला बलुचिस्तान पाकिस्तानमधील सर्वात मोठा आणि सर्वात अस्थिर प्रांत आहे. लष्कर-ए-झांगवी, तालिबानसह अनेक सशस्त्र दहशतवादी संघटनांच्या बहुस्तरीय धोक्याचा या प्रांताला सातत्याने सामना करावा लागतो. बलुचिस्तानमधील राष्ट्रवादी संघटनांनी पाकिस्तानपासून या प्रांताला स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणी केलेली आहे. त्यातूनच इथल्या संघटनांच्या निशाण्यावर पाकिस्तानी सशस्त्र दलांबरोबरच चीनने सुरू केलेल्या 62 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूक योजनेतील प्रकल्पही आलेले आहेत. चिनी नागरिकांवरील हल्ल्याच्या घटनांतही कायम वाढच होते आहे. कराचीला पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणतात व इथे चिनी नागरिकांवर झालेल्या हल्ल्यातून चीनच्या “बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’चा विरोध करणाऱ्या संघटनांनी चिनी प्रकल्पांना लक्ष्य केले आहे. शहरी केंद्र, चिनी नागरिक आणि चिनी गुंतवणुकीला लक्ष्य करण्यातून चिनी आर्थिक आक्रमणाचा विरोध होत आहे.
हा प्रांत नैसर्गिक वायू आणि तेलासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. पण, त्याचा उपयोग स्थानिकांच्या फायद्यासाठी कधीच झाला नाही, अशी इथल्या जनतेची तक्रार आहे. बलुचिस्तान पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असला तरी तिथली लोकसंख्या सर्वात कमी आहे. पाकिस्तानच्या उदयानंतर बलुचिस्तान प्रांत भीषण गरिबी आणि उग्रवादाने ग्रासला गेला. 1947 साली पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांताचे विलीनीकरण करण्याच्या स्थानिक जनजातींनी जोरदार विरोध केला होता. तेव्हापासून बलुच स्वातंत्र्यासह राजकीय, आर्थिक स्वायत्ततेसाठी लढा देत आहे. इस्लामाबादचे बलुच नागरिकांशी नेहमीच तणावपूर्ण संबंध राहिले. अनेक वर्षांपासून स्थलांतरित बलुची नागरिक, बलुच कार्यकर्ते आणि समर्थकांकडून जगभरात पाकिस्तानविरोधात निदर्शने केली जात आहेत. कॅनडा येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या करीमा बलोच यांनी बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कर करत असलेल्या अन्याय-अत्याचाराला संयुक्त राष्ट्र संघात वाचा फोडली होती. पाकिस्तान लष्कराने अनेक बलुच नागरिकांची हत्या केली.
अंतर्गत हिंसाचाराचे वाढते प्रमाण पाहिले तर पाकिस्तान हे स्वतःशीच युद्ध करत असलेले राष्ट्र आहे, असे म्हणावे लागेल. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी सरकार व लष्कराने केलेले कुठलेही उपाय यशस्वी झालेले नाहीत. पाकिस्तानच्या बहुतांश भागावरून पाकिस्तानी सरकारचे शासन हे नाहिसे होत गेले आहे. एका अंदाजावरून निम्म्याहून जास्त पाकिस्तानचा भाग पाकिस्तानी सरकारच्या हाताखाली नाही.
अशा परिस्थितीमध्ये भारताने काय करायला हवे, जर पाकिस्तान भारताच्या काश्मीरमध्ये छुपे युद्ध करू शकतो, तर आपण बलुचिस्तानच्या स्वातंत्र्य लढ्याला का मदत करू शकत नाही? बलुचिस्तान स्वातंत्र्य लढ्याला मदत करून बलुचिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र बनण्यासाठी आपण मदत करायला हवी. त्यामुळे पाकिस्तानची ताकद ही अर्ध्याहून कमी होऊ शकते. ज्यावेळी भारताचा स्वातंत्र्य लढा सुरू होता तेव्हा बलुचिस्तानी लोकांशी आपले चांगले संबंध होते. भारतीय नेत्यांना बलुचिस्तानी जनतेच्या मनात मानाचे स्थान आहे. म्हणून बलुचिस्तानी स्वातंत्र्य लढ्याला ज्यांना पाकिस्तानी सरकार दहशतवादी म्हणतात त्यांना आपण मदत करून पाकिस्तानला इशारा देऊ शकतो. त्यासाठी भारताने बलुचिस्तानी जनतेला आपला पाठिंबा स्पष्टपणे जाहीर करायला हवा.