-सत्येंद्र राठी
“मॅग्नम ऑपस ऑफ इंडियन सिनेमा’ असे बिरूद लाभलेला या एकमात्र सिनेमाने नुकतीच आपली साठ वर्षे पूर्ण केली. आजच्या पिढीला याची ओझरती का होईना, माहिती मिळावी यासाठीचा हा लेखप्रपंच.
मुघल-ए-आझम, भारतीय सिनेसृष्टीला पडलेले एक मधाळ स्वप्न. पिढ्या बदलल्या; पण याचे आकर्षण आजही अबाधित आहे. वयाच्या बाविसाव्या वर्षी ह्या सिनेमाचे स्वप्न ज्या वेड्या डोळ्यांनी बघितले त्या माणसाचे नाव करीमुद्दीन आसिफ. भणंग प्रवृत्तीचा आसिफ अकबराच्या व्यक्तिमत्त्वाने झपाटलेला होता. त्याच्या या झपाटलेपणाला पाठबळ मिळाले शापूरजी मिस्त्रींचे.
मुघल-ए-आझमसारख्या सिनेमाची संगीताची बाजू भक्कम असणे गरजेचे आहे, ही बाब आसिफ जाणून होता. नौशाद हे त्याकाळचे कर्णप्रिय नाव. आसिफने नौशाद यांना गाठलं, नौशाद त्या वेळी त्यांच्या म्युझिक रूममध्ये “अमर’ सिनेमाच्या गाण्यांना चाल लावत होते. आसिफने त्यांना येण्याचे कारण सांगितले आणि आपल्या नेहमीच्या बेदरकार स्वभावाप्रमाणे पन्नास हजार रुपयांची गड्डी त्यांच्या हार्मोनियमवर टाकली. नौशाद संतापले आणि त्यांनी ती गड्डी उचलून तशीच खिडकी बाहेर भिरकावून दिली. दोघांत मोठी तक्रार झाली; पण दोघांना एकमेकांची कदर असल्याने ते एकत्र आले आणि “मुघल-ए-आझम’चे अविस्मरणीय संगीत जन्माला आले. या सिनेमाची मुहूर्तमेढ खरंतर स्वातंत्र्यपूर्व काळातली, पण साज चढू लागला 1952 पासून, आधी अनारकली नर्गिस ठरली होती; पण दिलीपकुमारबरोबर काम करायला ती राजी नसल्याने परत शोधाशोध केली गेली आणि आसिफला मधुबालात आपली “अनारकली’ सापडली.
मधुबालाचे वडील अताऊल्ला खॉं यांच्या खंडीभर शर्ती स्वीकारून आसिफने मधुबालाला करारबद्ध केले. मधुबालाचे वडील बऱ्याच वेळ सेटवर असत, त्यांचा असण्यामुळे मधुबाला अभिनयात संकोचत. त्यांना टाळण्यासाठी त्यांच्या रमी खेळण्याच्या सवयीचा फायदा घेत आसिफ आपल्या सहाय्यकास पुरेशी रक्कम देत आणि तो सहाय्यक मधुबालाच्या वडिलांना वेगळ्या खोलीत नेऊन त्यांच्याबरोबर रमी खेळत, महत्त्वाचे म्हणजे त्यांना तिथं खिळवत ठेवण्यासाठी तो सहाय्यक मुद्दाम पैसे हारत; आणि इकडे आसिफ सलीम अनारकलीवरील प्रणयदृश्य चित्रित करून घेत. सिनेमात आपल्याला हवा असलेला परिणाम साधण्यासाठी पडेल तितके श्रम आणि लागेल तितकी रक्कम मोजायची आसिफची तयारी असे.
“प्यार किया तो डरना क्या’ गाण्यातील शिशमहलच्या उभारणीस त्याने त्या काळी दहा लाख रुपये मोजले. इतके खर्च करून बनविलेल्या शिशमहलला लागलेल्या आरशाचे परावर्तन शूटिंगला अडसर ठरू लागल्याने शूटिंग थांबले. परावर्तनच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी ब्रिटिश दिग्दर्शक डेविड लीन यांना बोलाविण्यात आले; पण तेही हा तिढा सोडवू शकले नाही. शेवटी छायाचित्रकार आर. डी. माथूर यांनी आरशावर अतिशय पातळ मलमलचे अच्छादन घातले आणि चित्रीकरण मार्गी लागले. उदयपूर येथील तलावात सलीम, अनारकली व बहार यांना प्रत्येकी एका नावेत बसवून गाण्याची शूटिंग सुरू होती, पण काही केल्या नावेचा ताळमेळ बसेना, कोणतीना कोणती नाव फेममधून निसटून जायची. गाणं होतं, “हुस्नकी बारात चली मौसमे बहारमें’. मेहनत करूनही हवे तसे घडत नसल्याने शिकस्त खात आसिफने हे गाणं महालाच्या सेटवर चित्रित करायचे ठरविले; आणि ती कव्वाली जन्मास आली जी तुम्ही मी आजही गुणगुणतो… अर्थात “तेरी महफिलमें किस्मत आजमाकर हम भी देखेंगे’. मुघल-ए-आझममध्ये जॉनीवॉकरही होते, हे कोणाला आठवतही नसेल. काही क्षणांसाठी एका तृतीय पंथीची भूमिका त्यांनी निभावली. ती केवळ या सिनेमासोबत आपले नावही जोडले जावे म्हणून.
आसिफला एक गोष्ट सातत्याने सतावत होती की, मधुबाला चांगली नर्तिका नव्हती. त्यामुळे लॉंगशॉटमध्ये एखादा चांगला नर्तक घेऊन चित्रीकरण करणे क्रमप्राप्त झाले. खासकरून गिरक्याना तर ते अत्यावश्यक होते. प्रसिद्ध नर्तक लक्ष्मीनारायणवर हे लॉंगशॉट चित्रित करण्याचे ठरले. चित्रीकरण सुरू झाल्यावर बेमालूमपणेही लक्ष्मीनारायणचा चेहरा प्रेक्षकांच्या नजरेस पडू नये म्हणून मधुबालाचा मुखवटा बनविण्याचे आसिफने ठरविले. त्याकाळी तंत्रज्ञानही प्रगत नव्हते आणि आसिफला हुबेहूब मुखवटा हवा होता. हे कोण बनविणार याची शोधाशोध केली गेली आणि हा शोध संपला तो पुण्याचे निष्णात शिल्पकार अप्पासाहेब तथा बी. आर. खेडकर यांच्यावर.
खेडकर अत्यंत प्रतिभावंत शिल्पकार होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बनविण्यात तर त्यांचे विशेष कौशल्य. आसिफला तेच हवे असे. खेडकरांनी आपले कसब पणास लावले. आधी मधुबालाला समोर बसवून तिचा पुतळा बनविला, हा पुतळा त्यांनी फुग्यांच्या कारखान्यात नेला आणि या पुतळ्यावर रबराचा द्रव ओतून सुंदर मुखवटा बनविला. आसिफ खेडकरांचा सफाईदारपणा बघून बेहद्द खूश झाला. हा मुखवटा घालून आणि वेशभूषा लेवून जेव्हा लक्ष्मीनारायणने नृत्याचे शॉट दिले; तेव्हा त्यातील तादात्म्य पाहून आसिफ हरखून गेला. अशाने मुघल-ए-आजम सजविण्यास एका पुणेकराच्या कलेचा उपयोग झाला.
चौदा वर्षांच्या तपश्चर्येनंतर 5 ऑगस्ट 2020 रोजी आसिफने जोपासलेले स्वप्न 85 टक्के कृष्णधवल आणि 15 टक्के रंगीत असा पेहराव करून मुंबईच्या मराठा मंदिर चित्रपटगृहात अवतरले.