-शर्मिला जगताप
महात्मा गांधीजी यांच्या 151व्या जयंतीनिमित्त त्यांच्या “अहिंसा’ या तत्त्वाचे महत्त्व आज जगाला पटले आहे. अहिंसा या शब्दाची व्याख्या आपण “कोणत्याही प्रकारची हिंसा न करणे’ अशी साधीसोपी करतो. मात्र, महात्मा गांधी यांचा अहिंसेविषयी दृष्टिकोन खूपच व्यापक आहे. अहिंसेविषयी गांधीजी म्हणतात, “एखाद्याविषयी तुमच्या मनात वाईट विचार आला तरी ती हिंसा ठरते. तुमच्या मनात दुसऱ्यांविषयी हिंसक विचार न येणे याला अहिंसा असे म्हणतात’.
अहिंसा हे शौर्य, शक्ती यांच्याविरुद्ध आहे, असेही काही जण म्हणतात. मात्र, गांधीजी यावर म्हणतात, “तुम्ही कमजोर आहात म्हणून अहिंसा करत नाही असे नाही, तर जो बलवान असतो त्याने हिंसा न करणे हेच खरे शक्तीचे प्रतीक आहे’. अहिंसा तत्त्वाचे पालन केल्यास आपण दुर्बल बनणार नाहीत, तर उलट आपल्यात सहनशीलता वाढते. अहिंसा हेच असे शस्त्र आहे जे जगात शांतता प्रस्थापित करू शकते.
डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतानुसार जे बलवान आहेत ते कमजोर असलेल्यांवर मात करून आपले अस्तित्व टिकवतात. बलवान असलेल्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले आणि ते जिवंत राहिले. या उलट जे कमजोर होते ते नष्ट झाले. हा सिद्धांत प्राथमिक काळात म्हणजे मानव वस्ती करून राहण्याच्या अगोदर तंतोतंत लागू पडतो. मात्र, मानव समूहाने राहू लागल्याने त्याची शक्ती वाढली. मानवाकडे अणुकूचीदार दात, नखे नसूनसुद्धा समूहशक्तीमुळे मानव बलवान बनला. त्याने इतर प्राण्यांना आपल्या मुठीत घेतले. जे बलवान होते त्यांची शिकार करून त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यास यश मिळविले. या टप्प्यापर्यंत “अहिंसा’ आणि “हिंसा’ हे दोन्ही शब्द अस्तित्वात नव्हते. तुम्ही जिवंत राहण्यासाठी दुसऱ्या हिंस्र प्राण्यांचा बळी घेतला जात होता. कंदमुळे आणि प्राण्यांची शिकार करून मांस खाऊन स्वतःचे अस्तित्व टिकविणे अनिवार्य असल्याने या टप्प्यापर्यंत “हिंसा’ हा शब्द लागू होत नाही. मात्र, परिस्थिती बदलली. वातावरण बदलले. मानवजात उच्च आणि इतर प्राणीजात कनिष्ठ होण्याच्या टप्प्यापासून बलवान मानवाने प्राण्यांचा बळी घेणे किंवा मानवाने दुसऱ्या मानवाचे प्राण घेण्याने “हिंसे’चा जन्म झाला.
पुढे जगभरातील धार्मिक कर्मकांडाविरुद्ध “अहिंसे’चा जन्म झाला. जगातील अनेक महान अहिंसेचे पुरस्कर्त्यांमध्ये भारताचे वर्धमान महावीर, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांचे स्थान सर्वांत वरचे आहे. जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश देऊन मानव जातीवर त्यांनी उपकार केले आहे.
शस्त्राच्या जोरावर जगातील घडलेल्या लढाया, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध यात जगाने फक्त संहार पाहिला आहे. यातून काहीही नवनिर्मिती झाली नाही. त्यामुळे हिंसेऐवजी अहिंसेचा स्वीकार करण्यातच समस्त मानवजातीचे हित आहे. “अहिंसा परमो धर्म’ यात अहिंसेचे महत्त्व सामावलेले आहे.
महात्मा गांधी यांना अपेक्षित असलेली सर्वप्रकारच्या अहिंसेची आज मानवजातीला गरज आहे. त्यांनी दाखवून दिलेल्या अहिंसेच्या मार्गावरून चालत जाण्यातच मानवजातीचे हित आहे. अहिंसा मानवाला दुसऱ्यांवर प्रेम करायला शिकविते. दुसऱ्यांविषयी आपल्या मनात द्वेष राहात नाही. अहिंसावृत्तीमुळे मन शांतचित्त राहून मानवाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या रागावरही नियंत्रण मिळवण्यास मानव यशस्वी होतो.