पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर, ज्येष्ठ गायिका
“लता मंगेशकर’ हे नावच इतकं जादूमय आहे की, त्यांच्या सोबतच्या प्रत्येक आठवणी, प्रत्येक क्षण मला अलिबाबाच्या गुहेतच घेऊन जातात. दीदींनी माझं “धुंद मंद…’ गाणं ऐकून मला सहीसकट भेट दिलेल्या एल.पी.रेकॉर्डस् आजही मी जपून ठेवल्यात. बालपणापासून दीदींनीच अनेक पिढ्यांना चांगलं “दर्जेदार संगीत’ काय असतं हे शिकवलं. त्यांनी चांगलं वाईट जाणण्याची नीर क्षीर विवेकबुद्धी दिली. आचार्य अत्रेंनी म्हटल्याप्रमाणे “लोण्यात केशर विरघळावे’ तसा दीदींचा आवाज! आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त…
साल 1982… भावगंधर्व पंडित हृदयनाथजी मंगेशकरांचा एके दिवशी अनपेक्षितपणे मला फोन आला… मी मुंबई दूरदर्शनसाठी, एक दिवाळी पहाट स्पेशल… “शब्दांच्या पलिकडले’ करतोय. मी आणि दीदी गातोय. त्यात तुम्हीही गावं अशी आमची इच्छा आहे… हे फोनवर ऐकताक्षणी, माझ्या पायात कापरं भरलं आणि आनंदानं हात थरथरू लागले. हे सारं काही “विश्वासाच्या पलिकडलं’ होतं. आजही माझ्या आयुष्यातल्या अशा अनेक घटना परमेश्वराच्या अस्तित्वाची सदैव साक्ष देतात.
दीदींनी आणि बाळासाहेबांनी मला “तरुण आहे रात्र अजुनी’ गायला बोलावलं खरं, मात्र रेकॉर्डिंगच्या आदल्या रात्री मी बाळासाहेबांकडून गाणं घेऊन घरी परतल्यावर मला, तुमचं उद्याचं रेकॉर्डिंग कॅन्सल झालंय असं सांगणारे निनावी फोन वारंवार येऊ लागले. इतकी मोठी सुवर्णसंधी हातून जाईल की काय, असं वाटून मी खट्टू झाले. बाळासाहेबांना फोन केल्यावर ते म्हणाले, दीदीशी बोलून घे. त्वरित मी दीदींना फोन केला, आणि सारं सांगितलं… त्यावर त्या गोड आवाजात म्हणाल्या, ही तर तुमच्या यशाची पहिली पायरीच समजा. माझ्याही बाबतीत करियरच्या सुरुवातीला असंच घडायचं! दीदींचा “हा असा’ आश्वासक सूर माझ्या सांगीतिक कारकिर्दीच्या सुरुवातीलाच माझ्या पाठीशी “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश’ सारखा उभा राहिला, हे मी माझं भाग्यच समजते.
1981 मध्ये अनील-अरुण या संगीतकार द्वयींच्या “शब्दांच्या पलिकडले’मध्ये मी गायलेले “धुंद मंद ही अशीच सांज उतरली’ हे माझं दूरदर्शनवरचं अगदी पहिलं वहिलं गीत ऐकून, ही मुलगी कोण? हिने संपूर्ण कार्यक्रम खाऊन टाकला आणि मला हिच्याकडून गाऊन घ्यायचंय… ही दीदींची उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनिल मोहिलेंकडून मला समजल्यावर, माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना.
“निवडुंग’ चित्रपटासाठी “केव्हा तरी पहाटे’ व “लवलव करी पातं’ ही गाणी बाळासाहेबांच्या दिग्दर्शनाखाली गाऊन घेऊन दीदींनी, मला हिच्याकडून गाऊन घ्यायचंय हा शब्दही पुरा केला.
दीदींना दादरच्या पुरोहितांचे, पांढरे बारीक साखर पेरलेले पेढे, खूप आवडायचे म्हणून मी त्यांच्यासाठी घेऊन जाई. त्यावेळी आपल्या रूममध्ये टीव्हीवर मिकी माउसची कार्टून्स पाहताना, खळखळून हसणाऱ्या दीदींना पाहून मला आश्चर्य वाटे नि त्यांनी स्वत:त जपलेले मूल पाहून आनंदही होई. असंच कधीतरी गप्पा मारताना, दीदी त्यांच्या परिचयातील जुन्या गायकांच्या गायकीची हुबेहूब नक्कल करून दाखवित. त्यावेळी 25-30 वर्षांपूर्वीचे सारे काही दीदींना जसेच्या तसे कसे काय आठवते, याचे मला कुतूहल वाटे, तर मग कधी त्या माझ्याच समक्ष, दोन्ही हातांनी हातवारे करून, मी जशी गाते, तशीच थेट नक्कल करून दाखवत हास्याचे फवारे उडवित.
एकदा दीदींनी मला, मी भरली वांगी कशी करते ते पाहायला या म्हणून स्वत:च्या सपाता मला घालायला देऊन स्वयंपाकघरात नेले. मला कोण आनंद! जणू काही त्यांच्या सुरांनी त्यांच्या सपातांतून माझ्या शरीरात विजेप्रमाणे प्रवास केला तर… काय मज्जा येईल? असेच मला वाटत होते. कढई, तेल, मसाले, बारीक चिरलेला कांदा, छेद असलेली छोटी वांगी, सारे काही आधीच तयार होते. जणू काही संगीत दिग्दर्शकाने वाद्यवृंदासह गाण्याची जय्यत तयारी केल्यासारखे! मग दीदींनी सर्व मसाले प्रमाणात घेऊन, एका ताटात कालवले आणि छेद असलेल्या वांग्यांत भरून, ती वांगी अलगदपणे उकळत्या तेलात सोडली. ही सर्व प्रक्रिया मला दीदींच्या गाण्याप्रमाणेच भासली. संगीतकाराने तयार ठेवलेल्या प्रत्येक गाण्यात, भावभावनांचे रंग योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या प्रमाणात मिसळून, दीदी किती तरलपणे रसिकांसमोर सादर करतात तशीच! गंमतच सारी न्यारी! सारे काही खमंग, चविष्ट आणि सुरेल!
हिंदुस्थानी संगीतातला लखलखता जरतारी, उत्तुंग स्वर म्हणजे मास्टर दीनानाथ! या ओजस्वी आणि तेजस्वी दिनानाथांचीच कन्या ती! ते तेज आणि ओज दीदींमध्ये उतरलं नाही तरच नवल!
दीदींनीच हिंदी व उर्दूचे उच्चार शिकवले आम्हां रसिकांना. दीदींच्या स्वरांनी धर्म, भाषा, जात, पात, देश, खंड, उपखंड न मानता एकछत्री अंमलाखाली अनेक वर्षं अधिराज्य गाजवलं. रसिकांचे हे असे त्यांच्या प्रति प्रेम अव्याहत सुरूच राहणार आहे. कधी दूरदूरच्या दौऱ्यात, प्रवासात एकटे असताना, दीदींचे गाणे कानावर पडले तर केवढा मोठ्ठा आधार वाटतो आणि एकटेपण पळून जातं. कुठे कसं गावं, कुठे कसा शब्दोच्चार करावा, तलमपणे व तरलपणे भावना कशा व्यक्त कराव्यात, कुठे ठहराव घ्यावा, कुठे श्वास घ्यावा, कुठे हरकती, मुरक्या घ्याव्यात नि कुठे घेऊ नये, तसेच चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेला साजेशा आवाजात गायलेलं गाणं. एक ना दोन… अशा अमाप गोष्टींच्या अचूकतेचा “वस्तूपाठ’ म्हणजे साक्षात दीदी! झपाटून टाकणाऱ्या त्यांच्या स्वरांचा रोज अभ्यास केला तरी कमीच! प्रतिभावंत संगीतकार (आनंदघन) म्हणूनही दीदी ग्रेटच! सहजसुंदर आणि शब्दांना चित्ररूप व समर्पक न्याय देणाऱ्या रचना, हे त्यांचे संगीतकार म्हणून वैशिष्ट्य! उदा. ऐरणीच्या देवा तुला…, अखेरचा हा तुला दंडवत…!
26 जानेवारी 2001 रोजी भारत सरकारकडून सर्वोच्च नागरी पुरस्काराने दीदींना “भारतरत्न’ व मला “पद्मश्री’ने सन्मानित केल्याचे एकाच वेळी जाहीर झाले, अन् दीदींचे मला अभिनंदनपर सुंदर पत्र आले. मी भाग्यवान अशी, की दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनातील सोहोळ्यातही मला दीदींना राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न स्वीकारताना पाहायला मिळाले. माझं नाव पुकारल्यावर पुढे येऊन मी या गानसरस्वतीला वाकून नमस्कार केला. त्यावेळी त्यांनी माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत “विश यू द बेस्ट’ असा छान आशीर्वाद दिला आणि त्यानंतर मी राष्ट्रपतींच्या हस्ते “पद्मश्री’चा स्वीकार केला. हे सारे क्षण माझ्यासाठी केवळ अनमोल आहेत.
दीदींच्या सुरात, “प्रभू तेरो नाम’ ऐकताना कानात देव, मनात देव, रोमरोमांत देव आणि डोळ्यांतून फक्त अश्रूधारा अशी माझी अवस्था असते. या दैवी सुरांत परमेश्वराप्रत क्षणार्धात नेण्याचं सामर्थ्य आहे, म्हणूनच वाटतं, “कहीं ये वो (ईश्वर) तो नहीं?’