-प्रा. विजया पंडित
वाढत्या वयाचा परिणाम आपल्या बौद्धिक क्षमतेवरसुद्धा होतो असे आजवर मानले जात होते. परंतु काही संशोधनांमधून असे स्पष्ट झाले आहे की, वाढत्या वयातसुद्धा जर मेंदू सक्रिय राहिला, तर वृद्धापकाळातही चांगले काम देतो. आपण आपला मेंदू सतत कार्यरत ठेवला तर वयाच्या साठीनंतरही आपल्याला हव्या त्या क्षेत्रात जोरदार बौद्धिक प्रगती करता येते.
मानवी मेंदूचा विकास सातत्याने होत राहतो, असे अलीकडील काळात झालेल्या अनेक संशोधनांमधून स्पष्ट झाले आहे. जसजसे मेंदूचे स्नायू वयस्क होतात, तसतशी मेंदूच्या बौद्धिक क्षमतेत वाढच होते. ड्यूक विद्यापीठाचे न्यूरोलॉजिस्ट रॉबर्टो काबेजा यांनी माणसाच्या मेंदूची ताकद मोजण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबिला. त्यांनी तीन समूह तयार केले. एक समूह 65 ते 95 वर्षे वयोगटातील व्यक्तींचा होता आणि या व्यक्ती निवृत्तीनंतर पूर्णपणे निष्क्रिय होत्या. दुसऱ्या समूहात त्यांनी 20 ते 40 वयोगटातील व्यक्तींना समाविष्ट केले आणि तिसऱ्या समूहात 65 ते 95 वर्षे वयोगटातील अशा व्यक्तींना समाविष्ट केले, ज्या बौद्धिकदृष्ट्या सक्रिय होत्या. त्यानंतर रॉबर्टो यांनी या तीनही समूहांमधील लोकांना काही रचनात्मक आणि बौद्धिक क्षमतेची गरज असलेले प्रश्न दिले.
आश्चर्यकारकरीत्या या प्रश्नांची सर्वाधिक चांगली उत्तरे तिसऱ्या गटातील लोकांनी दिली. या गटात 65 ते 95 वर्षे वयोगटातील लोक होते. परंतु वय वाढल्यानंतरसुद्धा त्यांनी मेंदूचा वापर कायम सुरू ठेवला होता. या निष्कर्षावरून असे स्पष्ट होते की, म्हातारपण येणे याचा अर्थ शरीराबरोबरच मेंदूही कमकुवत होतो, असा अजिबात होत नाही. वस्तुतः ज्येष्ठ नागरिक या संज्ञेत आल्यानंतर लोकांचा मेंदू अधिक क्रियाशील होतो. परंतु आपण स्वतः मेंदूचा वापर सुरू ठेवला पाहिजे, ही एकच पूर्वअट आहे.
आतापर्यंत असे मानले जात होते की, माणसाच्या मेंदूतील स्नायू वयाच्या 40 वर्षांच्या आसपास सर्वाधिक सक्रिय असते. तोच या स्नायूंच्या विकासाचा उत्कर्षबिंदू असतो. त्यानंतर त्यांचे पतन सुरू होते. 60 ते 70 वर्षांच्या वयात अशी स्थिती येते की, नवी माहिती मेंदू ग्रहण करीत असतो; परंतु ती फार काळ आपल्याजवळ ठेवू शकत नाही. जर हे खरे असते तर 85 वर्षांपेक्षा अधिक वयाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आजही जटिल आर्थिक समस्यांवर सहजासहजी तोडगा सुचवू शकले नसते. वय वाढल्यानंतर शरीर भले कमजोर होवो, परंतु मेंदू कमजोर होत नाही, ही गोष्ट अलीकडील काळात झालेल्या अनेक संशोधनांमधून स्पष्ट झाली आहे.
या संशोधनांनुसार, मेंदू स्वतःचा विकास सतत करीत असतो आणि 35 ते 65 वर्षे वयादरम्यान हा विकास सर्वांत वेगाने होतो. परंतु हे वय पार केल्यानंतरसुद्धा मेंदूचा विकास सुरूच राहतो. परंतु तो नियमित वापरात असणे आवश्यक आहे. जसजसा आपण मेंदूचा वापर कमी करू लागतो, तसतसा त्याच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ लागतो. परंतु तो कार्यान्वित राहिल्यास तो सक्षम राहतो. याचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे चित्रपटसृष्टीतील नव्वदीच्या घरात पोहोचलेले गुलजार. ते आजही 20-21 वर्षांच्या युवकासारखा विचार करतात. त्यांची गाणी तशीच चटपटीत आणि तरुणांच्याच भाषेत असतात आणि म्हणूनच ती तरुणांना पसंत पडतात.
वय वाढल्यानंतर जरी मेंदूच्या एखाद्या भागावर दुष्परिणाम होत असला, तरी तो भाग केवळ शॉर्ट टर्म मेमरीचा असतो. 65 वर्षांच्या नंतर मेंदूत अधिक डेटा स्टोअर करता येत नाही. पन्नाशीत ज्या प्रकारे शॉर्ट टर्म मेमरी कार्यरत असते, तसे काम करणे ती नंतर बंद करते. जर तुम्हाला कुणी असे सांगितले की, 65 वर्षांच्या वयात तुम्ही विद्यापीठाच्या परीक्षेला बसून उत्तीर्ण होऊ शकता, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. याखेरीज वय वाढल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचे आपले भ्रमही वाढत जातात. परंतु याचा अर्थ असा निश्चितच नाही की, आपला मेंदू वाढत्या वयाबरोबर कमकुवत होतो.
यासंदर्भात न्यूरोलॉजिस्ट जॉर्ज बार्टजोकिस यांचे म्हणणे असे आहे की, निम्मे आयुष्य संपल्यानंतर आपण आपल्या मेंदूत साठवून ठेवलेल्या माहितीचा जास्तीत जास्त वापर करू लागतो. प्रत्येक दिवसागणिक आपल्या मेंदूची क्षमता सेकंदाच्या हिशोबाने वाढत जाते. जर जैवशास्त्रीय प्रणालीच्या आधारावर ही गोष्ट समजून घ्यायची झाल्यास आपल्या मेंदूची क्षमता सर्वांत चांगली याच काळात असते, असे म्हणता येईल. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, आपण आपला मेंदू सतत कार्यरत ठेवला तर 60 वर्षे वयानंतरही आपल्याला हव्या त्या क्षेत्रात जोरदार बौद्धिक प्रगती करता येते.