काश्मिरात अशांतता माजविण्याचे यज्ञ फसले
जम्मू, ता. 9 – परकीयांच्या साहाय्याने काश्मीरमध्ये अशांतता, गोंधळ माजविण्याचे पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले पण ते सर्वस्वी फसले. काश्मिरात संपूर्ण शांतता आहे, याबद्दल समाधान वाटते, असे काश्मीरचे सदर-ई-रियासत युवराज करणसिंग यांनी सांगितले. जम्मू-काश्मीर विधानसभांच्या संयुक्त बैठकीपुढे युवराजांनी उद्घाटनाचे भाषण केले.
ते म्हणाले, काश्मीरचा काही भाग अद्याप परकीय अंमलाखाली असून तेथे आर्थिक परिस्थिती बिकट आहे. प्रगती थांबली आहे. सरहद्दीवर जे प्रकार होत आहेत ते लक्षात घेता दक्ष राहिले पाहिजे. अन्नधान्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारत सरकारने दिलेल्या मदतीचा त्यांनी कृतज्ञतेने उल्लेख केला.
मलायन पंतप्रधान रहमान यांचा राजीनामा
कौलालंपूर – मलायाचे पंतप्रधान टुंकू अब्दुल रहमान यांनी पंतप्रधानकीचा राजीनामा दिल्याचे आज घोषित केले. उपपंतप्रधान रझाक हे पंतप्रधान होणार आहेत अशी माहिती रहमान यांनी दिली.
भारताच्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे लोभसवाणे चित्र
नवी दिल्ली – राष्ट्रीय उत्पन्न वाढविणे, वेगाने औद्योगिक प्रगती करणे व रोजगाराच्या संधी व्यापक प्रमाणात निर्माण करणे, उत्पन्न आणि संपत्ती यातील विषमता कमी करणे ही तिसऱ्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत, असे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी आज सांगितले. लोकसभेच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाचे उद्घाटन करताना राष्ट्रपती बोलत होते. उभयसभागृहांच्या संयुक्त बैठकीपुढे त्यांचे भाषण झाले. नेहमीच्या रिवाजाला अपवाद करून राष्ट्रपतीचे आजचे भाषण प्रदीर्घ झाले. या भाषणात निरनिराळ्या क्षेत्रात चाललेल्या कार्याचा विस्ताराने आढावा घेण्यात आला होता.
लवकरच अणुवीज – शांतताकालीन उपयोगासाठीच अणुशक्ती वापरण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटच्या काळात अणुशक्ती निर्मिती क्षेत्रात नाव घेण्यासारखे कार्य होणार असले तरी निदान 250 हजार किलोवॅट वीज निर्माण करणारी अणुशक्ती केंद्रं उभारण्याचे सरकारने ठरविले आहे.