उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ संपून नवे उपराष्ट्रपती धनखड यांचे पर्व सुरू होत आहे. त्यानिमित्ताने देशाच्या दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद भूषविणाऱ्या व्यक्तींचा आढावा.
डॉ. राधाकृष्णन यांच्यापासून ते नायडू यांच्यापर्यंतचा उपराष्ट्रपतींचा गौरवशाली इतिहास आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत अनेक किस्से घडले आहेत. भाजपचे जगदीप धनखड देशाचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत. कॉंग्रेसप्रणित संपुआच्या मार्गारेट अल्वा यांचा मोठ्या फरकाने पराभव करीत धनखड यांनी हा विजय मिळविला आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकांत केवळ तीन उपराष्ट्रपती बिनविरोध निवडून आले आहेत.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन – पहिली उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली होती 1952 मध्ये. 21 एप्रिलपर्यंत उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी नामांकन मागवण्यात आले होते. यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शेख कादीर हुसेन असे दोनच अर्ज आले होते. यात हुसेन यांचा अर्ज छाननीमध्ये बाद ठरविला आणि डॉ. राधाकृष्णन देशाचे पहिले उपराष्ट्रपती बनले. यानंतर 1957 मध्ये झालेल्या निवडणुकीतही सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले होते. यावेळेस त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नव्हता. यानंतर 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
झाकीर हुसेन – उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान झाले ते 1962 मध्ये. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकात डॉ. राधाकृष्णन अविरोध निवडून आले होते. 7 मे 1962 रोजी झालेल्या निवडणुकीत एकूण 596 सदस्यांनी मतदान केले. हुसेन यांच्या बाजूने विक्रमी 582 म्हणजेच 97.65% मते पडली.
व्ही. व्ही. गिरी – तिसऱ्या उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक झाली ती 6 मे 1967 रोजी. यावेळेस व्ही. व्ही. गिरी आणि मोहम्मद हबीब रिंगणात होते. व्ही.व्ही. गिरी 71.45 टक्के मते मिळवून देशाचे तिसरे उपराष्ट्रपती बनले.
गोपाल स्वरूप पाठक – व्ही. व्ही. गिरी यांनी 1969 मध्ये उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला. यानंतर देशाच्या चौथ्या उपराष्ट्रपतीसाठी 30 ऑगस्ट 1969 रोजी निवडणूक झाली. यावेळेस सहा उमेदवारांनी दंड थोपटले होते. यातील एक होते गोपाल स्वरूप पाठक. पाठक 400 मते मिळवून विजयी झाले. गोपाल स्वरूप पाठक यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. ते पहिले उपराष्ट्रपती होत ज्यांना पुढे चालून राष्ट्रपती नाही होता आले. याआधी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन आणि व्ही. व्ही. गिरी हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर राष्ट्रपती झाले होते.
बी. डी. जत्ती – 27 ऑगस्ट 1974 रोजी पाचव्या उपराष्ट्रपतीसाठी निवडणूक झाली. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या नियमात पहिल्यांदाच बदल करण्यात आला. त्यानुसार किमान पाच सदस्यांना प्रथम पसंतीचे मतदार आणि पाच जणांना द्वितीय पसंतीचे मतदार म्हणून मूव्हर्स करण्यात आले. याशिवाय अडीच हजार रुपये सुरक्षा रक्कमही जमा करण्यात आली. या निवडणुकीत कॉंग्रेसचे बी. डी. जत्ती आणि झारखंड पक्षाच्या नीरल एनम होरो हे उमेदवार होते. 78.70 टक्के मते मिळवून जत्ती देशाचे पाचवे उपराष्ट्रपती बनले.
मोहम्मद हिदायतुल्ला – 1979 च्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत न्या. मोहम्मद हिदायतुल्ला यांची बिनविरोध निवड झाली. हिदायतुल्ला हे तीन प्रमुख घटनात्मक पदे भूषवणारी पहिली व्यक्ती आहे. भारताचे पहिले सरन्यायाधीश, नंतर उपराष्ट्रपती आणि नंतर कार्यवाहक राष्ट्रपती. त्यांच्या विरोधात एकही उमेदवार उभा राहिला नाही. 31 ऑगस्ट 1979 रोजी त्यांनी उपराष्ट्रपती पदाची सूत्रे स्वीकारली. याआधी ते फेब्रुवारी 1968 ते डिसेंबर 1970 पर्यंत भारताचे सरन्यायाधीश होते.
आर. वेंकटरमन- 1984च्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कॉंग्रेसने वेंकटरमन यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात आरपीआय (के)चे बी. सी. कांबळे हे रिंगणात होते. वेंकटरमन यांनी चार पंतप्रधानांसोबत काम केले होते.
शंकरदयाल शर्मा – 1987 च्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एकूण 27 पैकी 26 उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी केवळ डॉ. शंकरदयाल शर्मा यांचाच अर्ज वैध असल्याचे जाहीर केले आणि ते अविरोध उपराष्ट्रपती घोषित झाले. मध्य प्रदेशचे डॉ. शंकरदयाल शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. याशिवाय महाराष्ट्र, पंजाब आणि आंध्र प्रदेशचे राज्यपालही राहिलेत.
के. आर. नारायणन- के. आर. नारायणन यांनी 1992 मध्ये उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकली होती. नारायणन यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काका जोगिंदर सिंग यांचा विक्रमी मतांनी पराभव केला. या निवडणुकीत 711 मतदार होते. यामध्ये 10 मते अवैध ठरविण्यात आली. नारायणन यांना 700 मते मिळाली, तर जोगिंदर सिंग यांना केवळ एक मत मिळाले. यासह केआर नारायणन सर्वाधिक मतांनी विजयी होणारे पहिले उपराष्ट्रपती ठरले.
कृष्णकांत – 1997 मध्ये पंजाबचे कृष्णकांत उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. कृष्णकांत यांना युनायटेड फ्रंटने, तर अकाली दलाने सुरजितसिंग बर्नाला यांना उमेदवारी दिली. सुरजीतही पंजाबचेच होते. कृष्णकांत हे तामिळनाडूचे राज्यपाल होते, तर बर्नाला पंजाबचे मुख्यमंत्री होते. कृष्णकांत यांना 441 म्हणजेच 61.76 टक्के मते मिळाली.
भैरवसिंह शेखावत – 2002 मध्ये झालेली उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक पहिली अशी निवडणूक होय ज्यात भारतीय जनता पक्षाचे पहिल्यांदाच खाते उघडले. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार भैरव सिंह शेखावत विजयी झाले. कॉंग्रेसप्रणित संपुआने सुशीलकुमार शिंदे यांना मैदानात उतरविले होते.
मोहम्मद हमीद अन्सारी – भैरवसिंह शेखावत यांच्यानंतर, कॉंग्रेसचे मोहम्मद हमीद अन्सारी 2007 आणि 2012 अशा दोन्ही निवडणुकीत सलग दोन वेळा उपराष्ट्रपतिपदी निवडून आले. 2012 मध्ये अन्सारी यांनी भाजपचे जसवंत सिंग यांना पराभूत करून उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकली होती. अन्सारी हे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतर एकमेव उपराष्ट्रपती आहेत, ज्यांनी सलग दोन वेळा देशाचे दुसरे सर्वोच्च पद भूषवले.
व्यंकय्या नायडू – व्यंकय्या नायडू यांचा 10 ऑगस्ट रोजी कार्यकाळ संपला आहे. नायडू शेखावत यांच्यानंतर भाजपचे दुसरे उमेदवार आहेत जे उपराष्ट्रपती झालेत. 2017 मध्ये कॉंग्रेसप्रणित यूपीएने गोपाल कृष्ण गांधी यांना मैदानात उतरविले होते.