– अभय कुलकर्णी
भारताच्या दृष्टीने सामरिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या मालदीवला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदी महासागरात हजारो बेटांचा समूह असलेले मालदीव भारताचे मित्रराष्ट्र असून उभयतांत परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाणीचा सिलसिला अनेक वर्षांपासून सुरू आहे. मालदीवमधील राजकीय अस्थिरता ही भारताच्या चिंतेत भर घालणारी आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करणाऱ्या भारताला आणखी एका चिंतेने ग्रासले असून ती म्हणजे मालदीवमधील कट्टरपंथीयांचा वाढता प्रभाव. स्थानिक कट्टरपंथीय मालदीवच्या लोकशाहीला आव्हान देत आहेत. एका स्फोटात जखमी झालेले मालदीवचे माजी अध्यक्ष मोहंमद नशिद यांची प्रकृती गंभीर बनली आहे. या स्फोटात ब्रिटनच्या एका नागरिकांसह चार जण जखमी झाले होते. अर्थात, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारली नाही. स्फोटामागचे कारण शोधण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पोलीस मालदीवला दाखल झाले आहेत. करोना संसर्ग रोखण्यासाठी मालदीवमध्ये रात्री संचारबंदी लागू केली जात असताना बॉम्बस्फोट घडवून आणला. हा स्फोट म्हणजे एकप्रकारे लोकशाहीवरचा हल्ला मानला जात आहे.
मोहंमद नशिद हे मालदीवच्या राजकारणात आघाडीचे नेते मानले जातात. 2008 मध्ये सत्तेत आल्यानंतर फेब्रुवारी 2012 मध्ये त्यांच्याविरुद्ध बंड झाले आणि त्यांना हटवण्यात आले. त्यानंतर दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत त्यांना तुरुंगात पाठण्यात आले. ते एका तत्कालीन न्यायाधीशाला अटक करण्याच्या आदेशात दोषी असल्याचे आढळून आले होते. परंतु त्यांना ब्रिटनला उपचार करण्यासाठी सवलत देण्यात आली. 2016 मध्ये त्यांना निर्वासितांचा दर्जा देण्यात आला. 2018 मध्ये त्यांच्या पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. ते परत मालदीवला परतले आणि त्यांनी संसदेत स्थान मिळवले. नशिद हे सध्या मालदीवच्या संसदेचे अध्यक्ष आहेत. हे पद देशातील दुसरे शक्तिशाली पद मानले जाते. मालदीव हे आलिशानरित्या वीकेंड साजरे करण्यासाठीचे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते.
भारतीय उपखंडात मालदीव हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. मात्र या देशात सातत्याने राजकीय उलथापालथ चालू राहते आणि इस्लामी कट्टरपंथीयांचा देखील सतत उपद्रव सुरू असतो.
मोहंमद नशिद हे कट्टरपंथीय इस्लामिकचे टीकाकार आहेत. मालदीव हा सुन्नी मुस्लीम बहुल देश आहे. 2008 पर्यंत राजकारणात दीर्घकाळ सत्तेवर राहिलेले मोमून अब्दुल गयूम यांच्या पराभवानंतर मालदीवमध्ये राजकीय अस्थिरता वाढली. भारताच्या बाजूने विचार केल्यास मालदीवच्या राजकारणाबाबत भारताने नेहमीच चिंता व्यक्त केली. मालदीव हा एकप्रकारे भारतासाठी संरक्षण कवच म्हणून काम करतो. मालदीव हा हिंद महासागरात 1200 बेटांचा समूह असून ते सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. मालदीवच्या समुद्री मार्गानेच चीन, जपान आणि भारताला इंधन, ऊर्जेचा पुरवठा होतो.
चीनने आपल्या विस्तारवादी भूमिकेतून दशकभरापूर्वीच हिंद महासागरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अदनच्या खाडीत अँटी पायरसी अभियानाच्या नावाखाली मालदीव हे इंटरनॅशनल जिओ पॉलिटिक्समध्ये महत्त्वाचा घटक बनत आहे. मालदीवमध्ये चीनची मोठी आर्थिक गुंतवणूक ही भारतासाठी चिंताजनक आहे. मालदीवला 70 टक्के आयात चीनमधून होते. मात्र, मोहंमद नशिदचा पक्ष सत्तेवर आल्यानंतर चीनचा हस्तक्षेप कमी झाला. कारण अब्दुल यामिन यांच्या काळात त्यांनी मालदीवला चीनच्या झोळीत टाकले होते. तेव्हापासून मालदीवमध्ये चीनविरोधी भावना पसरू लागली. यामिन यांच्या राजवटीत मालदीवमध्ये कट्टरपंथीयांनी डोके वर काढले. सीरियाच्या युद्धासाठी मालदीवमधून अनेक सैनिक गेले होते. मालदीवबरोबर भारताचे अनेक वर्षांपासून सांस्कृतिक आणि व्यापारीसंबंध आहेत. 1965 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मालदीवला मान्यता देणाऱ्या देशांत भारताचा समावेश होता. त्यानंतर 1972 साली मालदीवमध्ये भारतीय दूतावास सुरू झाले.
मालदीवमध्ये सुमारे 25 हजार भारतीय नागरिक राहात आहेत आणि दरवर्षी मालदीवला जाणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी 6 टक्के पर्यटक भारताचे आहेत. मालदीवच्या नागरिकांसाठी शिक्षण, आरोग्य उपचार, व्यापाराच्या दृष्टीने भारत हे पसंतीचे ठिकाण आहे. नोव्हेंबर 1988 मध्ये मालदीवमध्ये मोठे राजकीय बंड होऊन सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न झाला. मालदीवचा एक व्यापारी अब्दुल्ला लुथुकी याने श्रीलंकेत कट रचला आणि फुटीरवादी संघटना पीपल्स लिबरेशन ऑर्गनायजेशन ऑफ तमिळ इनमबरोबर मालदीवमध्ये सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. या संघटनेच्या 80 बंडखोरांनी राजधानी मालेवर समुद्रमार्गाने येऊन हल्ला केला. या बंडखोरांनी महत्त्वाची ठिकाणं, विमानतळ, बंदर, रेडिओ-टीव्ही स्टेशनवर ताबा मिळवला.
मालदीवचे तत्कालीन अध्यक्ष मोमून अब्दुल गयूम यांनी भारताकडे सैनिकी मदत मागितली. त्याचवेळी राजीव गांधी सरकारने 1600 जवानांची तुकडी मालदीवला रवाना केली आणि काही तासांतच 19 बंडखोरांना ठार केले तर उर्वरितांना पकडून त्यांना मालदीवच्या हवाली केले. भारताची मोहीम फत्ते केल्यानंतर दोन्ही देशात संबंध वृद्धिंगत केले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे कौतुकही झाले. त्यानंतर गयूम आणि मोहंमद नशिद यांनी अनेकदा दौरे केले.
सध्याच्या करोना काळात शांतताप्रिय आणि निसर्गरम्य असलेल्या मालदीवमध्ये कट्टरपंथीयांचा रक्तपात वाढणे आणि राजकीय अस्थिरता वाढणे हे भारतीयांसाठी डोकेदुखी आणि चिंताजनक बाब ठरत आहे.