महाराष्ट्रातील एक डॅशिंग व कार्यक्षम नेते नारायण राणे यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची चिपळूणच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याच्यावेळी केलेली कडक शब्दांतील कानउघाडणी आता सगळीकडेच व्हायरल झाली आहे. सीएम बीएम गेला उडत, अशा स्वरूपाची भाषा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना वापरल्याचे अनेकांनी ऐकले आहे. एका जिल्हाधिकाऱ्याशी एक केंद्रीय मंत्री याच राज्याच्या मुख्यमंत्र्याविषयी असे विधान करीत असेल तर त्या बिचाऱ्या जिल्हाधिकाऱ्याची काय अवस्था झाली असेल याची कल्पना करवत नाही.
प्रशासनातील अधिकाऱ्यांना जबाबदार केंद्रीय नेत्यांकडून अशा प्रकारची भाषा ऐकायला मिळणे हे खचितच पटणारे नाही. अर्थात, राणेसाहेबांचा स्वभावच असा रोखठोक आहे. मनात असलेला संताप कोणाचीही भीडभाड न बाळगता व्यक्त करणारे नेते म्हणून राणेंची महाराष्ट्राला ओळख आहे. ते चिपळूणला पुराची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी प्रोटोकॉलप्रमाणे त्या भागातील प्रमुख अधिकारी तेथे उपस्थित असणे अपेक्षित होते. पण असा एकही महत्त्वाचा अधिकारी त्या दौऱ्यात उपस्थित नसल्याने राणे यांचा पारा चढणे अत्यंत स्वाभाविक होते आणि त्यांच्या स्वभावशैलीनुसार त्यांनी चिपळूणच्या भर बाजारपेठेत सर्वांसमक्ष जिल्हाधिकाऱ्यांना खडसावणे हेही त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याला धरूनच होते.
आपण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त होतो असे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला; पण राणेंनी ते ऐकून घेतले नाही. त्यात सीएम असा शब्दप्रयोग जिल्हाधिकाऱ्यांनी उच्चारल्यानंतर राणेंचे माथे भडकणेही अगदीच अपेक्षित होते. त्यामुळेच त्यांच्या तोंडून वरील उद्गार निघाले असणार. अर्थात, आज राणे केवळ एक साधे खासदार नाहीत तर ते केंद्रातील कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत, याचे भानही त्यांना पुढील काळात ठेवावे लागणार आहे. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वितुष्ट जगजाहीर आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात राणे यांचे नाव न घेता त्यांना आणि त्यांच्या मुलांना बेडकाची उपमा दिली होती. त्यावर गप्प बसतील ते राणे कसले. त्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जी मुक्ताफळे उधळली होती तीही सर्वांनी ऐकली आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यांनी त्या पत्रकार परिषदेत आरेतुरेची भाषा वापरली होती. राणे यांचे राजकारणात असलेले दोन्ही पुत्रही आपल्या पिताश्रींच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यरत असतात. अशा पद्धतीची कडक-भडक कार्यशैली महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाला फारशी रूचत नसली तरी त्यांच्या या कार्यशैलीचेही अनेक जण चाहते आहेत, हेही तितकेच खरे आहे.
लोकांना गुळमुळीत पुढाऱ्यापेक्षा असा नेहमी आक्रमक शैलीत वागणारा पुढारीच पसंत असतो. राणे व त्यांच्या कुटुंबीयांचे हेच राजकारणातील प्रमुख भांडवल असावे. काही जणांना ते शोभूनही दिसते. जसे तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या अगदीच गांधीवादी पद्धतीने मवाळ व समजुतीचे राजकारण करू लागल्या, तर लोकही त्यांना ममतांमध्ये आता दम राहिला नाही, असे म्हणायला मागे पुढे पाहणार नाही. कारण त्यांनी ममतांना त्याच स्वरूपात स्वीकारलेले आहे. ममतांची ही भडक कार्यशैलीच त्यांना लोकप्रियता मिळवून देण्यास बहुतांशी कारणीभूत ठरली आहे. तशाच स्वरूपाची कार्यशैली राणेंनाही शोभून दिसणारी असली तरी ती अभिरूची संपन्न नाही.
एरव्ही राणेंच्या कार्यक्षमतेचे आजवर कौतुकच झाले आहे. जागच्या जागी लोकांचे प्रश्न सोडवणे, लोकांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणणे हा त्यांच्या कार्यशैलीचा खाक्या आहे. त्याचा अनुभव राज्यातील जनतेने ते मुख्यमंत्री असतानाही घेतला आहे. राणेंना मुख्यमंत्री म्हणून अगदी थोडाच काळ वाट्याला आला, पण त्या अल्पावधीतही त्यांनी प्रशासनावर आपल्या करड्या स्वभाववैशिष्ट्याने चांगलीच पकड बसवली होती. मधला काही काळ विजनवासात गेल्यानंतर त्यांना लॉटरी लागल्याप्रमाणे अचानक केंद्रीय मंत्रिपदाचा लाभ झाला. मंत्री झाल्यानंतर त्यांची अधिकाऱ्यांशी जी पहिली बैठक झाली, त्यातही त्यांच्या करड्या कार्यशैलीची चुणूक तेथील अधिकाऱ्यांना बघायला मिळाली आहे.
पहिल्याच बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांवर जी प्रश्नांची सरबत्ती केली त्यातून हे अधिकारी चांगलेच अवाक झाले होते, अशा बातम्या प्रसारित झाल्या आहेत. त्यांच्याकडे लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग हे महत्त्वाचे खाते आले आहे. या खात्याचे देशाच्या एकूण जीडीपीत कॉन्ट्रिब्युशन किती, असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला होता. त्याचे उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नव्हते. आपल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी परस्पर रजा घ्यायची नाही आणि मला विचारल्याशिवाय सुट्टीवर जायचे नाही अशी तंबीही त्यांनी या अधिकाऱ्यांना पहिल्याच बैठकीत दिली, असेही छापून आले आहे. त्यामुळे हे काही तरी वेगळेच पाणी आहे याची त्या अधिकाऱ्यांना पहिल्याच बैठकीत कल्पना आली असणार.
मंत्रिपदावर असलेला लोकप्रतिनिधी खमक्या असेल तरच प्रशासनातील अधिकारी बरे काम करतात. अन्यथा ते सारे प्रशासन कोळून प्यायलेले असतात. त्यामुळे प्रशासनावर चांगली पकड ठेवणे म्हणजे अधिकारी धाकात ठेवणे हे एक सूत्र बनून राहिले आहे. अधिकारी धाकात ठेवण्यासाठी प्रत्येकवेळी अरेरावीच उपयोगी पडते असे नाही, मंत्र्याचा अभ्यास आणि एखादा विषय समजून घेण्याची त्याची क्षमता अशा बाबीही त्यासाठी आवश्यक असतात. राणेंकडे तेही वैशिष्ट्य आहे. त्यांनाही प्रशासनाचा बारकाईने अभ्यास असतो. सरकारी कामे वेगवान पद्धतीने मार्गी लावणे हे त्यांना आजवर चांगले जमले आहे. म्हणूनच इतका दीर्घकाळ ते कोकणात आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवू शकले आहेत, हे कोणालाही नाकारता येणार नाही. पण राणेंना आता देशपातळीवर आपली प्रतिमा निर्माण करायची आहे.
एका महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद त्यांच्या पदरात आले असताना आता त्यांना चिपळूण मध्ये जो प्रकार घडला तसे प्रकार टाळण्याची गरज आहे. आपला सात्विक संताप व्यक्त करताना त्यांना सारासार विचारही ध्यानात घ्यावा लागणार आहे. केंद्रीय मंत्री या नात्याने त्यांच्याकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांना मिळालेल्या संधीचे त्यांच्याकडून सोनेच व्हावे अशीही सर्वांचीच इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण बाजारपेठेत घडलेल्या प्रकाराची पुनरुक्ती होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे.