देशातील काही छोट्या राज्यांहूनही अधिक मोठा अर्थसंकल्प जिचा असतो, त्या मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या कब्जात येईल, याकडे महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च 2022 ला समाप्त झाली. त्यापूर्वीच निवडणुका होणे, हे अपेक्षित होते; परंतु महाविकास आघाडी सरकारने पालिकेचे प्रभाग 227 वरून 236 करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय बदलून एकनाथ शिंदे सरकारने प्रभागसंख्या परत 227 वर आणली. प्रभागांची संख्या वाढवण्याच्या निर्णयास भाजपने उच्च न्यायालयात आव्हान दिले, पण न्यायालयाने आघाडीच्याच बाजूने निकाल दिला.
शिंदे सरकारने निर्णय बदलल्यानंतर मूळ शिवसेनेने या बदललेल्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथील सुनावणीदरम्यान पाच आठवडे परिस्थिती “जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. या सगळ्या घोळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता दिवाळीनंतरच होतील, असे दिसते. या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वीचे महाभारत सुरू झाले असून, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास शिवतीर्थावर परवानगी नाकारण्याचा खेळ खेळण्यात आला. शिवसेना आणि शिंदे सेना या दोघांनाही तेथे सभा घेण्यास कायदा व सुव्यवस्थेचे कारण दाखवून, महानगरपालिकेने परवानगी नाकारली. आम्ही कसे न्यायबुद्धीने वागतो हे दाखवण्याचा हा शिंदे सरकारचा पोकळ प्रयत्न असून, अन्य सोयीच्या ठिकाणीदेखील शिवसेनेला मैदान मिळू नये, याचीही तजवीज करण्यात आली. खरी शिवसेना कोणाची, याचा निर्णय
सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात होईलच. परंतु त्यापूर्वी असे क्षुद्र राजकारण करण्याचे सरकारला कारण नव्हते. मात्र, तरीदेखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हिंमत कायम असून, त्यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानात शिवसेनेच्या शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांचा जंगी मेळावा घेतला. मुंबई महापालिका जिंकण्याची भाषा करणाऱ्या कमळाबाई आणि मुंबई यांचा संबंध काय, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महिनाभरात पालिका निवडणुका घेण्याचे थेट आव्हान भाजपला दिले. या निवडणुका जेवढ्या लवकर होतील, तितका आपला फायदा होईल. कारण, गद्दारी करून सरकार पाडल्यामुळे सहानुभूती मिळेल, असे ठाकरे यांना वाटत असणार. उलट, निवडणुका जेवढ्या लांबतील तितके चांगले. कारण तोवर सहानुभूतीची लाट निघून जाईल, असे शिंदे गट आणि भाजपचे मत आहे. या सभेत ठाकरे यांनी, केंद्रीय सत्ता विरुद्ध महाराष्ट्र असा संघर्ष असून, शिवसेना ही महाराष्ट्रीय अस्मितेची खूण आहे, हे बिंबवण्याचा जोरदार प्रयत्न केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच मुंबईत येऊन मूळ शिवसेनेला पालिका निवडणुकीत लोळवण्याची गर्जना केली होती. त्यास प्रतिआव्हान देताना, फोडाफोडीचे डावपेच यशस्वी होणार नाहीत, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे. अर्थात, फोडाफोडी करूनच शिंदे सरकार स्थापन झाले असून, येत्या काही दिवसांत शिवसेनेचे बरेच माजी नगरसेवक पक्ष सोडू शकतात; परंतु ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल जावे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले असून, पूर्वीची शिवसेना आणि आताची शिवसेना यांच्यात हाच गुणात्मक फरक आहे. बाळासाहेबांच्या काळात गद्दारांना माफ केले जात नव्हते आणि शिवसेनेची दहशतच होती. आता मात्र ती दहशत उरली नसून, उद्धव आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे राजकारण नेमस्त स्वरूपाचे असून, हे स्वागतार्ह आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जनसंघ नव्हता आणि संयुक्त महाराष्ट्र समितीतून एकजूट सोडून जनसंघ बाहेर पडला होता, याचा उल्लेख करून, भाजपला मराठी अस्मितेचे काही पडलेले नाही, यावर उद्धव ठाकरेंनी बोट ठेवले आहे. ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणात समाजातील सर्व जातिधर्माची काळजी घेण्याच्या धोरणावर भर दिला गेला होता. तसेच रोजगार, उद्योगधंदे यासारखे विषय त्यांनी मांडले आणि विशेष म्हणजे, दिल्लीतील केजरीवाल सरकारचे कौतुक करून “आप’शी आपण जवळीक साधू इच्छितो, याचे संकेत दिले.
याउलट, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत जाऊन तेरा राज्यांतील शिवसेनेच्या राज्यप्रमुखांना आपल्या गटात सामील करून घेतले. निवडणूक आयोगात आपली केस बळकट व्हावी, हाच त्यामागील उद्देश होता. शिंदे गटाचे वर्णन उद्धव ठाकरेंनी “मिंधे’ गट असे केले. तर आम्ही मिंधे नसून बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत, असे प्रत्युत्तर शिंदे यांनी दिले. हैदराबादला अमित शहांच्या बैठकीत आपण सामील झालो, तेव्हा बैठकीनंतर हजारो लोकांनी आपले अभिनंदन केले, असे शिंदे यांनी सांगितले. तेव्हा अनेकजण चकित झाले. मतदारच ठाकरे यांच्या शिवसेनेला धडा शिकवतील, असा आत्मविश्वास शिंदे यांनी दिल्लीत केलेल्या भाषणात व्यक्त केला आहे. खोक्यांबद्दलच्या आरोपास उत्तर देतानाही, मी कधी कोणाचे काही घेतले नाही, फक्त देण्याचे काम केले, असा खुलासा त्यांनी केला. मात्र “पन्नास खोके एकदम ओके’, ही घोषणा घराघरात गेली असून, ती शिंदे गटास चांगलीच लागली असल्याचे दिसते. हे सर्व राजकारण मुख्यतः मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चालले असून, या निवडणुकीत शिंदे सेना आणि भाजप यांची युती होणार आहे. गरज पडल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही उपयोग होणार आहे.
मुंबईत भाजपचे 82 नगरसेवक गेल्या वेळी निवडून आले होते. त्यापैकी 52 उमेदवार कमीत कमी 2500 मतांनी पराभूत झाले होते. आज 227 वॉर्डांत मिळून उत्तर भारतीयांची 16 लाख मते असून, कृपाशंकर सिंह, आमदार राजहंस सिंह, विद्या ठाकूर या नेत्यांच्या मदतीने ही मते मिळवण्याचा भाजप प्रयत्न करणारच. उत्तर भारतीयांची मतदारयादीत नावनोंदणी करण्याचे काम सध्या जोरात चालू असून, ही मतदारसंख्या त्यामुळे 26 वरून 28 टक्क्यांवर जाईल, असे सांगण्यात येते. याचा भाजपला फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे शिंदे सेनेलाही. शिवसेनेने गेल्या वेळी 84 जागा जिंकल्या होत्या. मुंबई शहरात शिंदे गटाचे अस्तित्व कमी आहे. शिवाय शिवसेनेला आता मुस्लीम मतेही अधिक प्रमाणात मिळू शकतात. कॉंग्रेसने मुंबईत स्वबळावर निवडणुका लढवण्याचे ठरवले असून, त्याचा शिवसेनेला अप्रत्यक्ष फायदाच होईल. मात्र मुंबईत कॉंग्रेसचा जनाधार कमी होत चालला असून, राष्ट्रवादीचा मुंबईतील एकमेव चेहरा नवाब मलिक आणि ते तर तुरुंगात आहेत. हे सर्व बघता आणि केंद्र व राज्य सरकारांकडे असलेली साधनसंपत्ती आणि सत्ता पाहता, ठाकरे यांच्यासमोरचे आव्हान प्रचंड आहे. तरीही ते मुंबई राखू शकले, तर तो त्यांचा मोठाच विजय असेल.