-ह.भ.प. गणेश म. भा. फड
परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी । धरावांचूनि अनारिसी । गतिची नेणें ।। कां सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्रातें गिवसिती । गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे ।। तैसें सर्व भावसंभारें । न धरत प्रेम एकसरे । मजमाजी संचरे । मीचि होऊनि ।।
माऊली ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायात सांगतात, भक्ती अशा प्रकारची पाहिजे की पावसाची सुटलेली सर पृथ्वीशिवाय दुसरीकडे पडणे शक्यच नाही. सर्व जलसंपदा घेऊन जशी गंगा समुद्राचा शोध घेत अनन्य गतीने मिळते. पुन:पुन्हा मिळतच राहते. त्याप्रमाणे सर्व भाव-भावना एकवटून प्रेमाला अनावरता येऊन भक्त माझ्या ठायी संचरून माझ्याशी समरसून गेला पाहिजे.
सुवर्णमनि सोनिया । कल्लोळ जैसा पाणिया । तैसा मज धनंजया । शरण ये तू ।।
माऊली म्हणतात,सोन्याचा मणि सोन्याला शरण जातो. पाण्याची लाट पाण्याला शरण जाते त्याप्रमाणे तू मला शरण ये.