– हेमंत देसाई
देशात समर्थ विरोधी पक्ष नसला, तरी शक्तिशाली आघाडी निर्माण होणे, हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.
देशात परिवर्तन होणे आवश्यक आहे. पश्चिम बंगालने नेहमीच क्रांतिकारी चळवळींचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आधी प. बंगालसाठी लढल्या, आता त्यांनी भारतासाठी लढावे, असे आवाहन प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी केले आहे. जावेद आणि त्यांच्या पत्नी शबाना आझमी यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नवी दिल्लीत नुकतीच भेट घेतली. मुख्यमंत्रिपदाची पुन्हा एकदा शपथ घेतल्यानंतरचा दीदींचा हा पहिलाच दौरा होता. भाजपविरोधात विरोधी पक्षांचे नेतृत्व त्या करतील की नाही हे महत्त्वाचे नसून, तुम्हाला कोणत्या प्रकारचा भारत हवा आहे, कोणत्या प्रकारचे वातावरण, परंपरा, स्वातंत्र्य आणि लोकशाही हवी आहे, हे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जावेद यांनी केले.
कोलकात्यात असताना व्हर्च्युअल रॅली घेऊन, दीदींनी आपण दिल्ली दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. या रॅलीत दिल्लीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम प्रभृती सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर दीदींनी दिल्लीत येऊन कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी राहुल गांधीही तेथे हजर होते. ऑनलाइन रॅलीच्यावेळीच दीदींनी बॅंडेज बांधलेला मोबाइल फोन दाखवून, पेगॅससप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. सोनियाजींबरोबरही त्यांनी या विषयाची चर्चा केली. पेगॅससची चर्चा संसदेत नाही, तर “चायपर’ होणार का, असा खणखणीत सवालही त्यांनी उपस्थित केला. जीडीपीचा अर्थ गॅस-डीझेल-पेट्रोल असा झाला आहे. महागाई, बेरोजगारी आणि केंद्राची अरेरावी यामुळे देश बेजार झाला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोदी विरुद्ध देश, असा “खेला होबे’ होणार असल्याचे दीदींनी जाहीर केले आहे.
दीदींच्या दिल्ली दौऱ्यातून भाजपविरोधी पक्षांची एकजूट साधण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. गेल्या महिन्यात शरद पवार यांच्या निवासस्थानी दिल्लीत भाजपविरोधी नेते आणि विचारवंतांची एक बैठक झाली. त्यानंतर विरोधी आघाडीचा नेता शरद पवार, ममता दीदी की राहुल गांधी असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला. मात्र, विरोधी आघाडीत फूट पाडण्यासाठी सत्ताधारी गोटातून जाणीवपूर्वक काही बातम्या पेरल्या जात आहेत. दिल्लीत दीदींची शरद पवारांशी भेट होऊ शकली नाही. त्याबाबतही काही पुड्या सोडण्यात आल्या. “मी भेट घेणार होते, मात्र भेट होऊ शकली नाही. मात्र, मी त्यांच्याशी फोनवर बोलले’, असा खुलासा दीदींनी केला आहे. दिल्लीभेटीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच कमलनाथ, आनंद शर्मा, अभिषेक मनू सिंघवी या कॉंग्रेस नेत्यांबरोबरही दीदींनी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यांनी करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा, प. बंगालचे प्रस्तावित नामांतर वगैरे विषयांवर चर्चा करण्यासाठी घेतली.
ते काही असो, मात्र कॉंग्रेस वा राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा तृणमूल कॉंग्रेसने मोदींविरोधात नेहमीच खणखणीत भूमिका घेतली आहे. मोदींच्या आक्रमक धोरणांना जशास तसे उत्तर देण्याचे धैर्य दीदींमध्ये आहे. सोनियाजी, राहुल वा प्रियंका यांच्यातही तेवढाच निडरपणा आहे. मात्र, कॉंग्रेसमधले अन्य अनेक नेते केंद्र सरकारविरोधात बोलण्याचे वा काही कृती करण्याचे तेवढे धाडस करत नाहीत. तर चीनची घुसखोरी, कृषी कायदे अथवा पेगॅससमार्फत झालेली हेरगिरी या विषयांबाबत संसदेत वा संसदेबाहेर महत्त्वाच्या काही नेत्यांनी नरमाईची अथवा मिळमिळीतच भूमिका घेतली. 2014 पासून सात वर्षे मोदींना कधीच तगडे आव्हान मिळाले नाही. आता मात्र दीदींमुळे विरोधी आवाज काही प्रमाणात बुलंद होऊ लागला आहे. मोदींचा पराभव करणे केवळ अशक्यप्राय आहे, हे समीकरण दीदींनी प. बंगाल विधानसभा निवडणुकीत खोडून दाखवले. भाजपने सर्व शक्तिनिशी प्रयत्न करूनही, तृणमूलचा मतहिस्सा घटण्याऐवजी पाच टक्क्यांनी वाढलाच, त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवारांचे राजकारण मुख्यतः सत्तेच्या आधारेच विकसित झाले आहे, तर दीदी या रस्त्यावरची लढाई लढण्यात तरबेज आहेत.
डाव्या आघाडीची बंगालमध्ये सत्ता असताना, त्यांच्या हिंसाचारास दीदींनी तोंड दिले होते. त्यांच्यावर व्यक्तिगत हलला होऊनही दीदी डगमगल्या नाहीत. ताज्या निवडणुकीतही पाय जखमी होऊनही, व्हीलचेअरवरून दीदींनी प्रचार केला. नंदीग्राममध्ये जेव्हा मतदान केंद्रांवर गैरप्रकार होण्याची त्यांना शक्यता वाटली, तेव्हा दीदी स्वतः तेथे उपस्थित राहिल्या. “जो डर गया, सो मर गया’, असे निवडणूक प्रचारात त्या गरजल्या होत्या. मोदींना पराभूत करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापराव्या लागतीलच, ज्याचे तंत्र पवारांना अवगत आहे; परंतु निर्भयताही हवी, जी दीदींकडे आहे.
मोदींनी 2012 साली मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये तिसऱ्यांदा विजय मिळवला, तेव्हा त्यांना राष्ट्रीय पातळीवर गंभीरपणे घेतले जाऊ लागले. दीदींचाही हा तिसरा विजय आहे. नवीन पटनायक यांच्याखेरीज राज्यात सलग तीनवेळा अन्य कोणीही यश मिळवलेले नाही. नवीनबाबू तर कठीणप्रसंगी भाजपच्याच मदतीला धावून जातात. त्यामुळे मोदीविरोधी आघाडीचे नेतृत्व ते करण्याची सुतराम शक्यता नाही. दीदींप्रमाणे स्वबळावरच सत्ता मिळवण्यात पवारांना एकदाही यश मिळालेले नाही. निवडणुका जिंकण्याबाबतचे राहुल गांधींचे रेकॉर्ड अजिबातच समाधानकारक नाही. तरीदेखील आज देशात सर्वत्र अस्तित्व असलेला कॉंग्रेस हाच एकमेव पक्ष आहे. तीन राज्यांत कॉंग्रेसची सत्ता असून, अन्य तीन राज्यांत तो सत्तेत सहभागी आहे.
गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा व कर्नाटकात कॉंग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे फेडरल फ्रंटच्या घोषणा केल्या, तरी कॉंग्रेसला बाजूला सारून काहीएक साध्य होणार नाही. पेगॅसससंदर्भात राहुल गांधींनी तेरा पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून व्यूहरचना आखल्याचे दिसले. परिस्थिती भविष्यात कोणता आकार घेईल, हे सांगता येणार नसल्यामुळे विरोधी पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाईल हे अनिश्चित आहे; परंतु अन्य कोणी नेतृत्व केल्यास माझी त्यास हरकत नाही, असे दीदींनी स्पष्ट केले आहे. शिवाय त्या केवळ आक्रस्ताळ्या आणि तापट आहेत, अशी त्यांची प्रतिमा गडद करण्याचे भाजपचे प्रयत्न असतात. परंतु अलीकडील काळात त्यांच्यात अधिक व्यवहारचातुर्य आले असून, त्या लवचीकही बनत चालल्या आहेत.