-वृषाली पंढरी
करोनाच्या पार्श्वभूमीवर गेले वर्षभर सण-उत्सव साजरे करण्यास किंवा व्रते आचरण्यात काहीसे निर्बंध होते. करोनाची परिस्थिती अद्याप निवळली नसली, तरी ती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. अशा वेळी सण साजरे करताना काही बंधने पाळत व करोनाच्या संदर्भातील सरकारी नियमांचे काटेकोर पालन करीत संक्रांत साजरी करायला हवी.
आपल्याकडील प्रत्येक सणाला धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक महत्त्व असते. संक्रांतीचे सामाजिकदृष्ट्या महत्त्व आहे. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला, म्हणत मतभेद विसरून गोड बोलायला शिकवणारा, सर्व धर्मियांनी साजरा करावा असा आगळावेगळा सण म्हणजे मकरसंक्रांत. आपली संस्कृती ही कृषीप्रधान असल्याने या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे, फळांचे वाण (भेटवस्तू) एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवालाही अर्पण करतात.
मकर संक्रांत तिथीने साजरी होत असली तरी तिची सांगड वैज्ञानिकतेशी जोडली असल्याने दरवर्षी 14 जानेवारीला येते. तसेच ठराविक वर्षांनी 15 जानेवारीला येते. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो, म्हणजेच मकरसंक्रमण होते म्हणून या दिवसाला “मकरसंक्रांती’ म्हणून संबोधले जाते.
वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने व नावाने हा उत्सव साजरा केला जातो. गुजरात व राजस्थान- पतंगनो त्योहोर (पतंगांचा सण) किंवा उतराण म्हटले जाते. गुजरातमध्ये या दिवशी धान्य, तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. गुजरातेत या दिवशी गहू, बाजरींची खिचडी बनवली जाते. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात.
दक्षिण भारतात पोंगल सण 3 दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात. सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गूळ, दूधाची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात. मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते.
आंध्रप्रदेशमध्ये तीन दिवस हा उत्सव साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये हुबळी नदीच्या काठावर गंगा सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येत भाविक या उत्सवात सहभागी होतात. आसाममध्ये भोगली बहू नावाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव या नावाने साजरा केला जातो.
हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो. महाभारतात कुरू वंशाचे संरक्षक भीष्म युद्धात जखमी झाल्यावर बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पाहत पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान होते. त्यांनी या दिवशी उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केला.
महाराष्ट्रात हा सण फारच आगळ्यावेगळ्या पद्धतीने तीन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवसास भोगी (सामान्यतः 13 जानेवारी) म्हणतात.
यादिवशी अनेक भाज्या एकत्र करून पौष्टिक भाजी बनवतात. ग्रामीण भागात याला खेनाट किंवा खेंदट म्हणतात. तर शहरवासीयांनी या भाजीला लेकुरवाळी भाजी असे गोड नाव दिले आहे. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगूळ आणि स्त्रियांना वाण वाटून “तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते.
आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांत येणाऱ्या संक्रांतीला तीळभक्षण लाभदायक असते. अध्यात्मानुसार तिळात कोणत्याही इतर तेलापेक्षा सत्त्वलहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असल्याने सूर्याच्या या संक्रमणकाळात साधना चांगली होण्यासाठी तीळ पोषक ठरतात.
तीळगुळाचे आरोग्यदृष्ट्याही महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ उपयुक्त असतात. तसेच उष्ण असल्याने बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात या निमित्ताने केला जातो.
तिळवण व बोरन्हाण …
नवविवाहित वधूचे हळदीकुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा आहे. प्रथम दिवाळीला जसे महत्त्व आहे तसेच प्रथम संक्रांतीला आहे. हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांचे कौतुक करण्याची प्रथा आहे. बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर घातले जाते. याला बोरन्हाण (बोरांनी आंघोळ) असे म्हणतात. साधारणपणे वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत बोरन्हाण केले जाते. यंदा करोनाची साथ अजूनही असल्याने हळदी कुंकू आणि बोरन्हाण हे दोन्हीही विधी घरगुती वातावरणात आणि कमीत कमी उपस्थितीत साजरे करणे क्रमप्राप्त आहे.