-डॉ. दिलीप गरुड
2 ऑक्टोबर 2020 रोजी महात्मा गांधीजींच्या जन्माला 151 वर्षे पूर्ण होत आहेत. आपण त्यांना राष्ट्रपिता म्हणतो. महात्मा म्हणतो. सरकारी कार्यालयांत त्यांचे फोटो लावतो. पुतळे उभारतो. भारतीय चलनावर त्यांची छबी छापतो. अशा या महामानवाचे मोठेपण कशात आहे त्याचा शोध घेतला पाहिजे…
एका सामान्य कुटुंबातला, सामान्य परिस्थितीत वाढलेला, प्रकृतीने कृश असलेला मुलगा “मोहन’ ते “महात्मा’ असा दीर्घ प्रवास करतो ही असामान्य गोष्ट आहे. बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेलेले, एकेकाळी सुटाबुटात वावरणारे गांधीजी भारतीय लोकांचे दारिद्य्र पाहून खादीच्या पंचाचा स्वीकार करून आयुष्यभर तोकड्या कपड्यात वावरले. हा त्यांच्यातील बदल लक्षणीय आहे. हे केवळ बाह्य परिवर्तन नाही तर ते आंतरिकही परिवर्तन आहे.
त्यांच्या उक्तीत आणि कृतीत एकवाक्यता होती. त्यांनी कधी संपत्तीची हाव धरली नाही. “अति हाव हे दुःखाचे मूळ आहे’, हे भगवान गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान त्यांना पटले होते. म्हणूनच ते म्हणत “ही पृथ्वी सर्वांच्या गरजा भागविण्यास सक्षम आहे. मात्र, एका माणसाची हाव ती पूर्ण करू शकणार नाही.’ आपला जन्म सेवेसाठी आहे असे ते मानत. मात्र, मानवाची सेवा करताना त्याचे फळ काय मिळणार किंवा त्यातून व्यक्तिगत लाभ किती होणार हा विचार त्यांच्या मनाला स्पर्श करून गेला नाही.
गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याबरोबरच अनेक विधायक आणि रचनात्मक कामे केली. त्यामध्ये सूतकताई, खादीचा प्रचार आणि प्रसार, सार्वजनिक स्वच्छता, निसर्गोपचार, ग्रामोद्योग, ग्रामस्वराज्य, श्रमाचे महात्म्य अशी अनेक कामे केली. त्यांची आवश्यकता आपल्या कृतीतून पटवून दिली. खऱ्या अर्थाने त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. म्हणूनच लॉर्ड माउंट बॅटन यांनी गांधीजींचे वर्णन “एका माणसाचे सैन्य’ असे केले होते.
यंत्राला त्यांचा विरोध नव्हता. मात्र, यंत्राने मानवाचे हात रिकामे राहणार नाहीत अशी व्यवस्था आपण स्वीकारली पाहिजे. म्हणून आपल्याला लघु उद्योगाकडे, ग्रामोद्योगाकडे, हाताला काम देणाऱ्या व्यवस्थेकडे वळावे लागेल. गांधीजींनी आश्रमीय जीवनपद्धतीचा स्वीकार केला होता. या आश्रमीय जीवनात त्यांनी अकरा व्रतांचे पालन केले. ती व्रते म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना ही होत.
त्यांच्या आश्रमात सकाळ, संध्याकाळ प्रार्थना असे. पाण्याने शरीर स्वच्छ होते, तर प्रार्थनेने मन शुचिर्भूत होते असे ते मानत. एकाने त्यांना संदेश द्या म्हणून विचारले. त्यावर ते म्हणाले, “माझे जीवन हाच माझा संदेश आहे’. त्यांच्या साध्या राहणीमुळे सामान्य माणूस त्यांच्याकडे आकर्षित झाला. एवढेच काय, पण सार्वजनिक ठिकाणी कधीही न वावरणाऱ्या महिला गांधीजींमुळे आंदोलनात सहभागी झाल्या. त्यांच्यात धाडस निर्माण झाले. पुरुषांइतक्याच स्त्रियाही समाजाचा महत्त्वाचा घटक आहे हे त्यांनी भारतीयांच्या मनात ठसविले.
आज जगात हिंसेने थैमान घातले आहे. भारताला अतिरेक्यांच्या आणि चीन, पाकिस्तानच्या कारवायांना सतत तोंड द्यावे लागत आहे. बलवान देश विस्तारवादी कार्यक्रम राबवत आहेत तर छोटे देश या कारवाया रोखण्यासाठी शस्त्रसामग्री खरेदी करत आहेत. त्यातून असुरक्षिततेची भावना बळावत आहे. माणसांनी श्रमाने निर्माण केलेली संपत्ती व उत्पन्न माणसाची भूक आणि दैनंदिन गरजा भागविण्याऐवजी शस्त्रखरेदीसाठी खर्च होत आहे. अशावेळी जगातल्या सर्व देशांच्या नेतृत्वाने “युद्ध हवे की बुद्ध’ याचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. फक्त एका देशाने विचार करून उपयोग नाही. अशावेळी “यूनो’ या जागतिक संघटनेने यात कृतिशील पुढाकार घ्यायला हवा.
आज सबंध जगभर हिंसा, लोकसंख्या वाढ, तापमानवाढ, भ्रष्टाचार, प्रदूषण, बेकारी, करोनासारखी महामारी यांनी थैमान घातले आहे. या प्रश्नांवरची उत्तरे गांधी विचारदर्शनातून मिळतील, असे मला वाटते. गांधी ही फक्त एक व्यक्ती नाही, तर तो विचार आहे. विसाव्या शतकातील भारताची ही जगाला मोठी देणगी आहे. म्हणूनच थोर तत्त्वज्ञ राधाकृष्णन म्हणाले, “जगाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत जे सांगितले आणि आचरण करून दाखविले असे एकमेव म्हणजे महात्मा गांधी’. तर थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन म्हणाले, “अशा प्रकारचा हाडामांसाचा मनुष्य या पृथ्वीवर वावरून गेला यावर पुढील पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील.’
ज्या इंग्रजांचे साम्राज्य सबंध जगभर पसरले होते, त्या बलाढ्य साम्राज्याला हातात शस्त्र न घेता हादरे देण्याचे काम गांधीजींनी जगाला दाखवून दिले. त्यातूनच कवींच्या प्रतिभेला बहर आला आणि एक काव्य प्रसवले-
“उचललेस तू मीठ मूठभर
साम्राज्याचा खचला पाया’
उपोषण, मूक मोर्चा, मौन, अहिंसक प्रतिकार, सत्याग्रह ही गांधीजींनी आपणाला दिलेली लढ्याची साधने आहे. ही साधने घेऊन अण्स्त्रांनी सज्ज असलेल्या जगाशी आपल्याला लढायचे आहे. ही लढाई मोठी अटीतटीची आहे. मात्र, या साधनांनिशी केलेल्या लढ्यात आपण हरलो, तर या सुंदर जगाचा नाश अटळ आहे, असे मला वाटते. महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन.