-माधव विद्वांस
कथालेखक, प्रवचनकार, भारतीय संस्कृतिकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांची आज जयंती. 12 जानेवारी, 1906 रोजी गोव्यातील एका निसर्गरम्य आंबेडे या खेडेगावात त्यांचा जन्म झाला. त्यांनी कोणतेही शालेय शिक्षण घेतले नव्हते, तथापि पारंपरिक पद्धतीने संस्कृत व्याकरण, काव्यशास्त्र तसेच ज्योतिष ह्या विषयांचे अध्ययन आंबेडे, धावे आणि सांगली येथे केले.
वर्ष 1926 साली शिक्षण संस्था स्थापन करून त्यांनी स्वतःला शिक्षणप्रसारास वाहून घेतले. ते ज्योतिष विद्या जाणत असले तरी पुरोगामी विचारांचे होते. ते वेदशास्त्री पंडित होते; पण कर्मठ नव्हते. वर्ष 1935 मध्ये ते कुटुंबासह पुण्याला आले. चरितार्थासाठी पुराण कीर्तन करू लागले. वर्ष 1938 पासून भक्तिज्ञान वैराग्य इत्यादी अध्यात्मिक विषयांना वाहिलेल्या चैतन्य ह्या मासिकाचे सहसंपादक म्हणून ते काम पाहू लागले. ह्याच नियतकालिकात 1934 मध्ये “राण्यांचे बंड’ ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी सातत्याने कथालेखन केले. “वेल विस्तार’ हा पहिला कथासंग्रह 1941 मध्ये प्रकाशित झाला. 1957 पर्यंत त्यांचे एकूण दहा कथासंग्रह प्रसिद्ध झाले.
1940 ला त्यांनी “जगावेगळे सासर’ ही कथा लिहिली. त्यामध्ये सासरा आपल्या विधवा सुनेचे कन्यादान करतो. याच कथेवरून पुढे “कन्यादान’ हा चित्रपट आला आणि महादेवशास्त्रींना उत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला.त्यानंतर “मानिनी’ या त्यांच्या कथेवर याच नावाचा चित्रपट आला. विविध भारतीय भाषांतील, तसेच परभाषांतील संस्कृतिविषयक ग्रंथांचे अवलोकन करून भारतीय संस्कृतिकोषातील दहा खंडांचे त्यांनी संपादन केले. “भारतदर्शन’ ही प्रवासवर्णनमाला, तसेच “आईच्या आठवणी’ हे बालसाहित्य, मुलांचा नित्यपाठ, याचेही त्यांनी लेखन केले. “आत्मपुराण’ आणि “आमचा वानप्रस्थाश्रम’ या नावाने त्यांनी आत्मचरित्र लिहिले. चाळीसहून अधिक ग्रंथाचे त्यांनी लेखन केलं.
गोवामुक्ती आंदोलन सुरू झाले व त्यांचे पाय पुन्हा मातृभूमीकडे वळले.महादेवशास्त्री गोवामुक्ती आंदोलनात जाण्यासाठी निघाले असताना त्यांच्या पत्नी सुधाताईंनी त्यांना अडविले आणि म्हणाल्या, “तुम्ही मिळवते पुरुष.तुम्ही सत्याग्रहाला गेलात तर आपला संसार कसा होणार? मुलं लहान आहेत, त्यांचं शिक्षण कसं होणार? त्यापेक्षा मीच जाते. घरात बसले आहे त्याऐवजी तुरुंगात जाऊन बसेन. तुम्ही घरी असाल तर मला मुलांची काळजी वाटणार नाही,’ असे सांगून त्या गोवामुक्ती संग्रामात सामील झाल्या. त्यांना अटक झाली. त्यांच्यावर तुरुंगात खटला सुरू झाला.त्यावेळचे पोर्तुगीज न्यायाधीश त्यांना म्हणाले, “तू संसारी स्त्री आहेस.तुला लहान मुलं आहेत. त्यांना सोडून तू इथे कशाला आलीस? तू फक्त “सॉरी’ म्हण, मी तुला लगेच मुक्त करतो’. त्यावर त्यांनी नकार दिला. त्यांना तब्बल 13 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली.
महादेवशास्त्री जोशी हे 1980 च्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचे पुत्र दिवंगत अशोक जोशी यांनी आपल्या वडिलांचा कोशनिर्मितीचा वसा पुढे चालू ठेवला होता. निधनापूर्वी अशोक जोशींनी “कृषी विज्ञान कोश’ या ग्रंथाच्या 15 खंडापैकी 8 खंड प्रकाशित केले. “अ’ पासून ते “क’ अक्षरापर्यंतचे काम त्यांनी पूर्ण केले आहे. महादेवशास्त्रींचे 12 डिसेंबर 1992 रोजी निधन झाले.