श्रीकृष्ण स्वत: एक परिपूर्ण युगपुरुष आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वात इतकी विविधता आहे तेवढी विविधता इतर कोणत्याही पुरुषात किंवा देवांनी घेतलेल्या अवतारात आढळून येत नाही. दहीहंडी गोपाळकाला हा त्याच्या बालपणाशी निगडीत असलेला उत्सव प्रसिद्ध आहे.
भगवान श्रीकृष्ण हे समस्त भारतीयांचे अत्यंत आवडते, प्रिय असे दैवत आहे. याचे कारण तो देव न वाटता आपल्यातला वाटतो. कृष्ण आपल्या सर्वांमधला असा वाटतो. त्याच्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, रणनीतीने त्याचे देवत्व सिद्ध झालेलं आहे. त्याचे जीवनउद्देश आणि जन्मचरित्र सारंच विलक्षण आहे. त्याच्या जीवनात डोकावलं असता तो आपल्यासारखा वाटतो. तो नटखट आहे, खोडकर आहे, मनमोहक आहे. गोपसखा, सुदामामित्र, अर्जुनसखा, द्रौपदीचा सखा, राधेचं सर्वस्व, देवकीचा कान्हा, यशोदेचा पुत्र अशी किती तरी स्थित्यंतर त्याच्या आयुष्यात आली. तसं पाहता तो राजा नाही. कोणतीही सत्ता त्याच्याकडे नाही. तो कुठेच नाही; पण तरीही सर्वत्र आहे. तो जगव्यापी आहे. तो चराचरात आहे. प्रत्येकाच्या हृदयात आहे. ज्याला तो आपला मानतो किंवा त्याचा जो भक्त आहे त्याला कृष्ण कधीच सोडत नाही. त्याचं सर्व काही तो आपलं मानतो. आजही तो सर्वत्र व्यापून आहे म्हणूनच जन्माष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्मदिवस आजही सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
श्रीकृष्ण स्वत: एक परिपूर्ण युगपुरुष आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वात इतकी विविधता आहे तेवढी विविधता इतर कोणत्याही पुरुषात किंवा देवांनी घेतलेल्या अवतारात आढळून येत नाही. यमुनेच्या तीरावर पौर्णिमेच्या रात्री जेव्हा गोप-गोपिका रासक्रीडा करीत असत, तेव्हा प्रत्येक गोपिकेसोबत कृष्ण असायचा. असं म्हणूया की तो प्रत्येकीच्या मनात इतका भिनलेला असायचा की त्याचा प्रत्यक्ष सहवास अनुभवित असल्याचा प्रत्यय यायचा. तो खरोखरंच एक जादूगार आहे. कोणत्याही प्रसंगी तो आपल्या प्रियजनांना मदत करण्यास तयार असायचा. एक अलौकिक असं आकर्षण त्याच्या व्यक्तिमत्त्वात आहे. म्हणूनच तो बालगोपाळांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांचा लाडका देव आहे. आज भारतात तो निरनिराळ्या राज्यांत निरनिराळ्या नावाने प्रसिद्ध आहे.
सृष्टीच्या पालनकर्त्या भगवान विष्णूंचा हा कृष्णावतार विलक्षण आहे. दरवर्षी कुठेना कुठे भागवत सांगितलं जातं आणि त्याचं श्रवण आजही मोठ्या भक्तिपूर्ण अंतःकरणाने केलं जातं. त्याच कृष्णकथा आजही मोठ्या आवडीनं कथन केल्या जातात आणि श्रवणही केल्या जातात. श्रीकृष्णाचे जीवनचरित्र अतिशय चमत्कारिक आहे. अगदी त्याच्या जन्मापासूनच त्यात चमत्कार आढळतात. श्रावणातल्या कृष्णपक्षातल्या अष्टमीच्या मध्यरात्री 12 वाजता त्याचा जन्म झाला. आपली पाठवणी गोकुळातल्या नंदाघरी करा, असं त्यानं आपल्या पित्याला दृष्टान्त देऊन सांगितले होते. दुथडी भरून वाहणारी यमुना, ऐन मध्यरात्र आणि मुसळधार पाऊस, सतत पहाऱ्याचा कारागृह अशा पार्श्वभूमीवर कृष्णाने अवतार घेतला. बालपणीच्या लीला, कालिया मर्दन, पुतना मर्दन, गोवर्धन उचलून गोकुळवासीयांचे केलेले संरक्षण हे सारं अतिशय मनोज्ञ आहे. आज कृष्णाच्या या बाललीला लहानांपासून थोरापर्यंत प्रिय आहेत. कितीही वेळा ऐकल्या तरी त्यातील गोडी कमी होत नाही.
आपल्या धर्मग्रंथांमधील महत्त्वाचा धर्मग्रंथ भगवद्गीता हा श्रीकृष्णाने प्रेरित केलेला आहे. आज त्या ग्रंथातील तत्त्वज्ञान संपूर्ण जगभरात अभ्यासलं जात आहे. कर्माचा सिद्धांत सांगताना कृष्णानं प्रत्येकानं आपलं कर्तव्य कसं पार पाडावं याचं सखोल ज्ञान गीतेतून वर्णिलं आहे. या ग्रंथाचे कितीतरी भाषांमध्ये अनुवाद केले गेले आहेत. अनेक विचारवंतानी आपले विचार मांडले आहेत. अशा या अलौकिक ग्रंथाचा निर्माता म्हणून कृष्ण एक युगावतारी पुरुष आहे. आपलं देवत्व सहजपणानं लक्षात येऊ न देण्याची अशी एक नटखट खुबी कृष्णाजवळ आहे. “मॉं मैं नहीं माखन खायो!’ असं म्हणणारा कृष्ण पुढील आयुष्यात अनेक करामती करूनही “मी तो नाहीच’ असा दिसून येतो. द्रौपदीच्या वस्त्रहरण प्रसंगी तिला मदत करणारा, 16 हजार 108 स्त्रियांना करागृहातून मुक्त करणारा, किंकर्तव्यमूढ अर्जुनाला त्याचा धर्म काय आहे सांगणारा, महाभारत युद्धानंतर धृतराष्ट्राच्या भेटीला जाताना भीमाला सावध करणारा, कर्णाविषयी सहानभूती मनात बाळगणारा श्रीकृष्ण मनमोहक आहे. नित्यनूतन आहे. रूक्मिणीचे प्रेम स्वीकारणारा, राधेच्या मनात घर करणारा, कुंतीला नेहमीच मदत करणारा कृष्ण सर्वप्रिय आहे.
महाभारत युद्धाच्या प्रसंगी श्रीकृष्णाने अर्जुनाला, जो गीतोपदेश केला. त्यातील तत्त्वज्ञान, केवळ भारतीयांनाच नाही तर पाश्चिमात्य विचारवंतांना त्यातील कर्मयोग पटलेला आहे. त्याचा अंगीकार त्यांनी आपल्या तत्त्वविचारातून मांडलेला आहे. त्याच्या आयुष्यात प्रसंगानुरूप काही बदल स्वत: कृष्णाने केलेले आहेत. परंपरेने मान्य केलेल्या दोषांचे, गुणात रूपांतर, परिवर्तन करणारे कृष्णचरित्रसारखे उत्तम उदाहरण इतिहासात आढळत नाही. म्हणूनच तो सामान्यांना जवळचा वाटतो.
युगं लोटली तरी आजही त्याचा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दहीहंडी गोपाळकाला हा त्याच्या बालपणाशी निगडीत असलेला उत्सव देवलोकातही प्रसिद्ध आहे. वनात भोजन करताना तो आपल्या सोबत्यांची शिदोरी एकत्र करीत असे. तोच त्याचा आवडता प्रसाद ठरला. देव मत्स्यरूपात येऊन तो गोपलकाला खात असत. ते कृष्णाच्या लक्षात येताच त्याने यमुनेच्या पाण्यात हात धुणे बंद केले होते. आजही गोपाळकाला खाल्ल्यानंतर हात धुवत नाही. अशा अनेक रंजक कथांनी कृष्णचरित्र लोभस बनलं आहे. सर्वात राहून तो अलिप्त आहे. सर्व कर्म करीत राहा आणि मला अर्पण करा, असं आपल्या भक्तांना सांगणारा श्रीकृष्ण! सर्वांच्या मनात घर करून आहे.