-हिमांशू
लॉकडाऊन? पुन्हा एकदा? बापरे! विचारसुद्धा सहन होत नाही ना आता? जिवंत राहणं आणि जीवन जगणं या दोन्हीत प्राधान्य द्यायचं तरी कशाला? इतका अवघड प्रश्न मानवजातीला आतापर्यंत कोणत्याच परीक्षेत घातला गेला नसेल.
सुमारे सहा महिन्यांनी लोक घराबाहेर पडायला लागले, कामधंदे सुरू झाले, जगण्यापुरता का होईना पैसा-अडका मिळू लागला, तेवढ्यात पुन्हा एकदा पश्चिमेकडच्या वाऱ्यांनी ही अशुभ वार्ता आणली. सध्या युरोपातल्या देशांवर हे संकट घोंगावत असलं, तरी ते आपल्याकडे कधी येणारच नाही असं कुणी ठामपणे सांगायला तयार नाही. उलट हिवाळ्याच्या दिवसांत कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढणार असे इशारे दिले जातायत. अर्थात, उन्हाळ्यात विषाणूचा प्रसार आटोक्यात येईल हे भाकित खोटं ठरलं होतं, त्यामुळे हिवाळ्याच्या बाबतीत केलेलं भाकितही असंच खोटं ठरावं अशी सगळ्यांची इच्छा आहे.
बड्या, श्रीमंत, विकसित देशांमध्ये लोकांना सामाजिक सुरक्षितता अधिक प्रमाणात दिली जाते. तिथल्या सरकारी तिजोऱ्या आपल्यापेक्षा अधिक भरलेल्या असतात. तरीसुद्धा बेरोजगारीसारख्या समस्या आपल्यासारख्याच तिकडेही आहेत. घरात बंदिस्त राहणं परवडणार नाही, असे असंख्य लोक आहेत. “लॉकडाऊन’ शब्द उच्चारताक्षणी तिकडे भयानक अवस्था झाली. पुन्हा एकदा बाजार आणि कार्यस्थळं बंद होणार, विषाणूच्या भीतीमुळे दिवसेंदिवस घरात बसावं लागणार, रोजगार बुडणार, या कल्पनेनं पाश्चात्य देशांमधील लोकांची बरीच धांदल उडाली.
विशेषतः फ्रान्समध्ये. हा देश भारताप्रमाणे एकाच वेळी अनेक संकटांचा मुकाबला करतो आहे. सध्या कट्टरतावादी समूहांनी घडवून आणलेल्या हत्याकांडांमुळे फ्रान्स हादरलाय. त्यातच करोनाची दुसरी लाट येऊ घातलीय, अशी बातमी आली. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा जबरदस्त असेल असा अंदाज तज्ज्ञांनी दिल्यामुळे पुन्हा एकदा कडेकोट टाळेबंदी करण्याची वेळ सरकारवर आली. लॉकडाऊनपूर्वी पॅरिस शहराबाहेर जाणाऱ्यांची, वीकेन्डसाठी बाहेर पडलेल्यांची आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणाऱ्यांची एवढी गर्दी झाली, की शहरात चक्क 700 किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली.
लोक तरी काय करणार? पुढे किती दिवस घरात थांबावं लागेल, सांगता येत नाही! घरापासून एक किलोमीटर अंतरात सकाळी फक्त एक तास व्यायामासाठी बाहेर पडण्याची मुभा नागरिकांना सरकारनं दिलीय. कारखान्यांबरोबरच रेस्टॉरंट, कॅफे बंद राहणार आहेत. करोनाचा फैलाव दुसऱ्या टप्प्यात तिथं खूपच वेगानं होऊ लागलाय. त्यामुळे एक नोव्हेंबर ते एक डिसेंबर असा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. युरोपातल्या इतर देशांपेक्षा फ्रान्समध्ये करोनाची दुसरी लाट अधिक प्रभावी असल्याचं दिसून आलंय. त्यामुळं “आता नाही तर कधीच नाही,’ अशी मानसिकता घेऊन नागरिक घराबाहेर पडले असतील आणि तासन्तास कोंडीतच अडकून पडले असतील.
अशा वातावरणाची भारतीयांना तर आता आठवणही नकोशी होईल. परंतु करोना हे जळजळीत वास्तव आहे. बाधितांची संख्या कमी होत असली, तरी ती शून्य होईपर्यंत कोणताही धोका पत्करता येत नाही. त्यातच संयुक्त राष्ट्रांच्या जैवविविधताविषयक पॅनेलच्या ताज्या अहवालात म्हटलंय की, करोना हा एकमेव विषाणू नव्हे. याहून अधिक धोकादायक, त्रासदायक, जीवघेणे आणि याहून वेगानं पसरणारे विषाणू यापुढे मानवजातीवर हल्ला करू शकतात. हे सगळं कशामुळे होतंय, याचा विचार मानवजातीनंच करायचा आहे.