जगातील पाच बड्या महासत्तांना मात देत आपण जगाचे नेतृत्व करण्यासाठी सिद्ध होत आहोत. परंतु अशा देशातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले लोक तेथून रोगमुक्त होऊन परत घरी येतील, अशी आशा बाळगणाऱ्या लोकांना आपल्या जीवाभावाची माणसे जबलपूरमधील घटनेप्रमाणे जळून मरताना पाहावी लागली, तर जनतेसाठी यापेक्षा दुःखद आणि भयानक गोष्ट आणखी कोणती असू शकते?
देशात स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा वर्धापनदिन अमृत महोत्सवाच्या रूपात साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. “हर घर तिरंगा’ अर्थात घरोघरी तिरंगा फडकवण्याची देशव्यापी मोहीम सरकारी पातळीवर देशभरात राबविली जात आहे. एकीकडे देशवासीयांना तिरंगा ध्वज फडकावण्याचे पंतप्रधानांचे आवाहन मन की बातमध्ये प्रसारित केले जात होते, तर दुसरीकडे अगदी दुसऱ्याच दिवशी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील दामोहा नाका येथे असणाऱ्या शिवनगरमधील न्यू लाइफ मल्टी स्पेशालिटी या खासगी रुग्णालयात भीषण अग्निकांड घडले. या दुर्घटनेत काही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला असून, तर काही गंभीर जखमी झाले आहेत.
ज्यांना जीव गमवावा लागला, त्यांच्यात रुग्णांसाठी देवाच्या खालोखाल ज्यांना मानले जाते अशा रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचीही बातमी आहे. हा तोच समाजघटक आहे, ज्यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी करोनाच्या काळात टाळ्या वाजवून, थाळी वाजवून, बॅंड वाजवून त्यांच्या धैर्याची, परिश्रमाची आणि तपश्चर्येची प्रशंसा केली होती. त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. हेच कर्मचारी रुग्णालयाच्या भीषण आगीत जळून मृत्युमुखी पडले.
रुग्णालयातील आगीच्या अन्य घटनांमध्ये जे सांगितले जाते, तेच जबलपूरच्या अग्निकांडानंतर सांगितले गेले. ते म्हणजे, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली आणि रुग्णालयाच्या तळमजल्यावर आगीची सुरुवात होऊन ती तिसऱ्या मजल्यापर्यंत वेगाने पसरली. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या नातेवाइकांना 5-5 लाख रुपये तसेच गंभीर जखमींना 50-50 हजार रुपयांची मदत घोषित केली. यासोबतच जखमींच्या संपूर्ण उपचारांचा खर्च राज्य सरकार उचलेल, असे आश्वासनही दिले. यापूर्वीही अशा घटना घडल्यावर राज्य सरकारे अशाच घोषणा करून पीडित कुटुंबांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करताना दिसली आहेत.
जगातील पाच बड्या महासत्तांना मात देत आपण जगाचे नेतृत्व करण्यासाठी सिद्ध होत आहोत. परंतु अशा देशातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले लोक तेथून रोगमुक्त होऊन परत घरी येतील अशी आशा बाळगणाऱ्या लोकांना आपल्या जीवाभावाची माणसे अशी जळून मरताना पाहावी लागली, तर जनतेसाठी यापेक्षा दुःखद आणि भयानक गोष्ट आणखी कोणती असू शकते? ज्या रुग्णालयीन कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव केला जातो, ज्यांच्या गौरवार्थ थाळ्या-टाळ्या वाजवल्या जातात, तेच कर्मचारी त्यांच्याच रुग्णालयात मात्र असुरक्षित असतात, यापेक्षा मोठे दुर्दैव आणि शोकांतिका कोणती असू शकते?
गुजरातमधील भरूचमधील कोविड रुग्णालयात पूर्वी आग लागली होती. आयसीयूमध्ये दाखल झालेले सुमारे 20 करोना रुग्ण भाजून मरण पावले होते आणि मुख्यमंत्र्यांनी नुकसानभरपाईची घोषणा करून आपले कर्तव्य पूर्ण केले होते. 26 एप्रिल 2021 रोजी गुजरातमधील सुरत येथील आयुष हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या आयसीयू विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. महाराष्ट्रातही अशा प्रकारच्या आगीच्या एकापाठोपाठ एक अनेक घटना घडल्या होत्या. त्यातील काही घटना ऐन कोविडकाळात घडल्यामुळे जीवितहानी अधिक प्रमाणात झाली. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या वेळी ऑक्सिजनचा पुरवठा बंद करावा लागल्यामुळे व्हेन्टिलेटरच्या भरवशावर तग धरून असलेल्या 24 करोना रुग्णांना जीव गमवावा लागला होता. त्यात 11 महिला आणि तेवढ्याच पुरुषांचा समावेश होता.
10 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील सर्वसाधारण रुग्णालयाच्या विशेष नवजात केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. ही आगसुद्धा शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात आले होते. याखेरीज 26 मार्च रोजी मुंबईच्या भांडुप उपनगरातील ड्रीम्स मॉलमधील कोविड स्पेशल रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीत 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे 17 एप्रिल 2021 रोजी छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये अचानक एका करोना सेंटरला आग लागली होती. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता. आपल्या देशात अशा अनेक घटना सातत्याने घडत असतात. परंतु स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत जनतेला 100 टक्के सुरक्षित रुग्णालये उपलब्ध करून देण्याच्या अवस्थेपर्यंत आपण पोहोचू शकलो नाही, ही खेदाची बाब आहे.
ज्या देशबांधवांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले जात आहे, त्यांना शंभर टक्के सुरक्षितता प्रदान करण्याची ग्वाही सरकारने द्यायला हवी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव काळात देशवासीय आणि देशातील सर्व रुग्णालये पूर्णपणे सुरक्षित असायला हवीत. देशातील प्रत्येक रुग्णालयांत सुरक्षिततेच्या निकषांची पूर्तता होत आहे, याची खात्री केली जायला हवी. अन्यथा रुग्णालयांचे परवाने रद्द करायला हवेत. कोणत्याही रुग्णालयात आग लागण्याची घटना होऊन रुग्ण किंवा रुग्णालयातील कर्मचारी दगावले तर त्याला रुग्ण किंवा कर्मचारी जबाबदार नसणार हे उघड आहे. मग शेवटी या लोकांनी व्यवस्थेच्या बेफिकीरपणाचा आणि दुर्लक्षाचा फटका सहन का करावा? रुग्णालये जीवनरक्षक असावीत. ते मृत्यूचे सापळे बनता कामा नयेत.