-माधव विद्वांस
लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीपैकी लक्ष्मीकांत यांची आज जयंती. त्यांचे पूर्ण नाव लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर. त्यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1937 रोजी मुंबई येथे अतिशय गरीब कुटुंबात झाला होता.
संगीताची आवड असलेले लक्ष्मीकांत अशा परिस्थितीतही मेंडोलीन हे इटालियन तंतुवाद्य वाजविण्यास शिकले. परिस्थितीमुळे त्यांना शिकवणी लावून मेंडोलीन वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांना घेता आलं नाही. तशातच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांना पोटा-पाण्यासाठी काम करणे भाग पडले. लहानपणीच गाणी ऐकून सरावाने त्यांची बोटे मेंडोलीनमधून नाद काढू लागली.
एका कार्यक्रमात त्यांना लतादीदींना साथ देण्याची संधी मिळाली. त्यावेळी या छोट्या मुलाची जिद्द आणि वादनातील कौशल्याने लतादीदी प्रभावित झाल्या. त्यांच्या परिस्थितीची कल्पना येताच त्यांनी त्यांना मदत करायचे ठरवले व लक्ष्मीकांतांना सुरील कला केंद्र या लहान मुलांना संगीतशिक्षण देणाऱ्या संस्थेत पाठवले. लक्ष्मीकांत यांनी प्रारंभिक संगीत शिक्षण “उस्ताद हुसेन अली’ तसेच बालमुकुंद इंदोरीकर यांच्याकडून मेंडोलिन वाद्य वाजवण्याचे शिक्षण घेतले.
सुरील कला केंद्र या ठिकाणीच त्यांची भेट प्यारेलालजींशी झाली. बोलके लक्ष्मीकांतजी तर प्यारेलालजी मितभाषी.आपल्या कामातच व्यस्त राहणे असा या दोघांचाही खाक्या. या दोघांची मैत्री झाली. प्यारेलाल शर्मा यांना व्हायोलिनवादक व्हायचे होते. त्यासाठी सतराव्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते, पण लक्ष्मीकांत यांनी त्यांना थांबवले व व्यावसायिक भागीदारीही केली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल या नावाने दोघेही ओळखले जाऊ लागले. त्यांनी 35 वर्षांच्या कारकिर्दीत 635 चित्रपटांसाठी साडेतीन हजारांच्या वर गाण्यांना संगीत देऊन तब्बल सात वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळवले.
प्यारेलाल आणि लक्ष्मीकांत हे दोघेही गाण्यांना चाली बरोबर वाद्यसंगीताचे संयोजनही करायचे. दोघांचे विचार करण्याची पद्धत एकच होती. एकदा प्यारेलाल यांना एक चाल सुचली. त्यावर लक्ष्मीकांतनीही काम केले होतं. आश्चर्य म्हणजे दोघांची चाल एकसारखी निघाली. इतके ते दोघेही एकजीव होऊन काम करायचे.
सुरुवातीला मेंडोलीन आणि व्हायोलीन वादक तर कधी संयोजक म्हणून काम केले. वर्ष 1963 उजाडले आणि या जोडीने बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेल्या “पारसमणी’ या चित्रपटास संगीत दिले. चंदेरी दुनियेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. लता मंगेशकर, मुकेश व मोहमद रफी यांचे आवाजातील गीतांनी लोकप्रियतेचा कळस गाठला.
“हॅंसता हुआ नुरानी चेहरा’, “वो जब याद आये, बहोत याद आये’ व इतर चारही गाणी खूपच गाजली. लता आणि रफी यांनी त्यांच्या संगीताला आवाज दिला व त्यांच्या करियरला हातभार लावला हे सांगण्यास ते कधीही विसरले नाहीत.
वर्ष 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या सरगम चित्रपटातील “डफली वाले’ हे गाणे सुरू झाल्यावर प्रेक्षकांनी पडद्यावर पैसे फेकून दाद दिली, हे पहिल्यांदाच घडले होते. संगीत आणि नृत्याची जादू काय असते हे त्यांनी दाखवून दिले. बिनाकाच्या एका वार्षिक उत्सवातील 50 पैकी 32 गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचीच होती. लक्ष्मीकांत यांचे 25 मे 1998 रोजी मुंबई येथे निधन झाले.