कोणत्याही राजकीय घटनेचा किंवा मुद्द्याचा स्वतःला सोयीचा ठरेल असा अर्थ लावण्याची आपल्याकडे जुनी रीत आहे. महाविकास आघाडी सरकार हे जनादेशाचा अपमान करून स्थापण्यात आले होते. कारण भाजप आणि शिवसेना यांनी संयुक्तपणे निवडणूक लढवली होती, असे प्रतिपादन भाजपचे सर्वच नेते आणि प्रवक्ते करत असतात. परंतु जनादेशाचा अपमान करूनच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे संयुक्त सरकार आधी अस्तित्वात आले होते, याचा या मंडळींना विसर पडतो.
या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अशाच प्रकारचे एक वक्तव्य केले आहे. स्वतःला जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी म्हणवणारे त्यांच्या समाजवादी विचारधारेला तिलांजली देऊन, सत्तेसाठी कॉंग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, अशी तिखट टीका त्यांनी केली. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपला बाजूला फेकून देऊन राष्ट्रीय जनता दल व कॉंग्रेस यांच्याशी मैत्री करून तेथे आघाडी सरकार स्थापन केले आहे. नितीशकुमार हे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी असून, राजद नेते लालूप्रसाद यादव हेदेखील जयप्रकाशजींच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढले होते. बिहारमधील सरन जिल्ह्यातील सिताब दियारा हे आणीबाणीविरोधी आंदोलनाचे जननायक जयप्रकाशजींचे जन्मगाव. जयप्रकाशजींच्या 120व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास शहा यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. जेपींच्या पंधरा फूट उंच पुतळ्याचे अनावरणही शहा यांनी केले. महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री यांच्याप्रमाणेच जेपींवरही भाजप आता दावा करू लागला आहे.
जेपींच्या नावाचा गजर करून, बिहारमधील कॉंग्रेसविरोधी मतांचे ध्रुवीकरण करणे आणि समाजवाद्यांमध्ये फूट पाडणे हा भाजपचा उद्देश आहे. बिहार हे देशातील मोठे राज्य असून, लोकसभा निवडणुकीतील यशाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आहे. बिहारमधील सत्ता गेल्यामुळे भाजप संतप्त झाला असून, ही सत्ता उलथणे आणि बिहारमध्ये लोकसभेत आपल्याला फटका बसू नये याची व्यवस्था करणे, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. यापूर्वीच्या बिहारमधील निवडणुकांतदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेपींचा उदोउदो केला होता. आपल्या कॉंग्रेसविरोधी राजकारणाचा भाग म्हणून काही नेत्यांचा प्रतीकस्वरूपात उपयोग करून घेणे, हे भाजपचे धोरण आहे. जेपी हे सत्तेसाठी नव्हे, तर आपली श्रद्धा असलेल्या विचारधारेसाठी आयुष्यभर लढले. मात्र, त्यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी सत्तेसाठी पाचवेळा आपली भूमिका बदलून सोयीस्कर युती-आघाडी केली, असा आरोप शहा यांनी केला आहे. नितीशकुमारांबाबत शहा यांची टीका योग्यच ठरते. परंतु ते बाजू पलटत असताना तत्त्वनिष्ठ आणि नीतिमान भाजपने त्यांना प्रतिसाद का दिला, हा प्रश्न आहे. शहा यांच्या मते, जेपींनी आयुष्यभर ज्या कॉंग्रेसशी संघर्ष केला, त्यांचे अनुयायी सध्या त्याच कॉंग्रेसच्या गोटात जाऊन बसले आहेत. ते सत्तालोलुप असून, त्यांना जेपींच्या विचारधारेशी काहीही देणेघेणे नाही.
वास्तविक नितीशकुमार यांच्याबरोबर भाजप बिहारमध्ये सत्तेत असताना, नितीशकुमारांनी बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कशी सुधारली, मोफत सायकली देऊन मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन कसे दिले, राज्यात कल्याणकारी योजना कशा सुरू केल्या, याचे गोडवे मोदी-शहा हे गात होते. जेपी आंदोलनातील नितीशकुमार यांचे दोस्त आणि त्यांच्या सरकारातील उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे तर, नितीशकुमार हे सद्गुणांचा पुतळा आहेत, असेच सांगत असत. मात्र, नितीशकुमार यांनी, “ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’, हे गाणे भाजपबरोबर गाण्याचे थांबवल्याबरोबर नितीशकुमार यांच्यामधील नवनवीन दुर्गुणांचा साक्षात्कार भाजपला होऊ लागला. शिवाय जेपींनी आयुष्यभर कॉंग्रेसशी दोन हात केले, असे सांगणाऱ्यांना ते मुळात कॉंग्रेसमध्ये होते, हे सांगावेसे वाटत नाही. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी आपली सत्ता टिकवण्यासाठी देशावर आणीबाणी लादली, त्यावेळी जेपींसह अनेक विरोधी नेत्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आले होते.
भारतीय जनतेने जेपींच्या लढ्याला साथ देऊन इंदिराजींना पराभूत केले व जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले, हे खरेच आहे. समाजाचे मूलगामी परिवर्तन करण्यासाठी जेपींनी 1974 मध्ये “संपूर्ण क्रांती’ची भूमिका मांडली. आपले हे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी छात्रयुवा संघर्ष वाहिनीची स्थापना करून, समाजपरिवर्तनाच्या लढ्यात युवकांना प्राधान्याने स्थान दिले. राजकीय-आर्थिक सत्तेच्या विकेंद्रीकरणाची बाजू घेत, जेपींनी अहिंसक मार्गाने भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे नेतृत्व केले. परंतु जेपींच्या स्वप्नातील भारत उभा करण्यात जनता पक्ष सपशेल अपयशी ठरला आणि त्यानंतरची व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल, वाजपेयी यांची सरकारे असोत की कॉंग्रेसची, जेपींना अभिप्रेत असलेला भारत प्रत्यक्षात अस्तित्वात आलाच नाही. अमेरिकेत समाजशास्त्राचे शिक्षण घेऊन जेपी 1929 साली भारतात परतले, तेव्हा ते विचाराने मार्क्सवादी होते. परंतु जवाहरलाल नेहरू यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन त्यांनी कॉंग्रेसमध्ये त्याच वर्षी प्रवेश घेतला.
महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जेपींची कॉंग्रेसमध्ये जडणघडण झाली. 1930 साली ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या असहकार आंदोलनात जेपींना अटक होऊन नाशिकमधील तुरुंगात डांबण्यात आले आणि तेथे त्यांची राममनोहर लोहिया, मिनू मसानी, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, बसावन सिंग, युसुफ देसाई, सी. के. नारायण स्वामी प्रभृती नेत्यांशी भेट झाली. तुरुंगातून मुक्तता झाल्यानंतर, कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गतच कॉंग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष आचार्य नरेंद्र देव होते आणि जेपी पक्षाचे सरचिटणीस बनले. 1942च्या चलेजाव आंदोलनात योगेंद्र शुक्ला, पंडित रामानंद मिश्रा यांच्यासमवेत जेपींनीही हजारी बाग मध्यवर्ती तुरुंगाच्या भिंतीवरून उडी टाकून सुटका करून घेतली आणि भूमिगत आंदोलन आरंभले.
थोडक्यात, जेपींची पाळेमुळे कॉंग्रेसमध्येच रुजली होती. 1948 साली कॉंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वतंत्रपणे समाजवादी पक्ष स्थापन केला. पण हा पक्ष कॉंग्रेसला पर्याय देऊ शकला नाही. त्यानंतर 1953 मध्ये रेल्वे व टपाल कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्व जेपींनी केले आणि पुढे ते सक्रिय राजकारणातून बाहेर पडून विनोबांच्या भूदान आंदोलनात सामील झाले. 1970च्या दशकात महागाई, भ्रष्टाचार यांचा अतिरेक झाल्यामुळे जेपींनी तरुणांना आंदोलनाची हाक दिली. परंतु म्हणून त्यांचे आयुष्य कॉंग्रेसविरोधाला वाहिलेले होते, असे म्हणणे साफ चूक आहे. त्यामुळेच नितीशकुमार यांनी कॉंग्रेसशी सहकार्य करण्याची भूमिका घेतली, म्हणजे जेपींच्या विचारांशी द्रोह केला, असे मानण्याचे कारण नाही!