भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना, गेल्या 75 वर्षांत भारताने काय साध्य केले याचा विचार करताना, अनेक बाबींचा विचार करावा लागतो.
आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. ते सहजासहजी मिळाले नाही. लाखो लोकांचा त्याग, हजारो लोकांचे बलिदान यातून ते मिळाले. 1857 ते 1947 अशा 90 वर्षांच्या स्वातंत्र्य संग्रामातून स्वातंत्र्य मिळाले. पूर्वी हिंदुस्थान अशी ओळख असणाऱ्या देशाची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले.
भारताच्या 75 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेताना काही महत्त्वाचे टप्पे समोर येतात. त्यामध्ये प्रारंभिक कालखंड, त्यानंतर भाषावार प्रांतरचनेनंतरचा भारत मग जागतिकीकरणा नंतरचा भारत, असे ढोबळमानाने टप्पे करता येतील. दीर्घकाळ चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीने एक विचार दृढ झाला होता की, स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व समस्या आपोआप सुटतील. प्रत्यक्षात स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सर्वजण आनंदात होते; पण तो आनंद फार काळ टिकला नाही. स्वातंत्र्यानंतर लगेचच धार्मिक तेढ निर्माण झाली. नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानात कलह निर्माण झाला. जीवाच्या आकांताने हजारो हिंदूंचे लोंढे भारतात आले. स्वातंत्र्यानंतर लगेचच काश्मीर प्रश्नाने उग्ररूप धारण केले. अशातच महात्मा गांधीजींची हत्या झाली. राज्यघटनेची निर्मिती झाल्यावर 26 जानेवारी 1950 पासून भारत एक लोकशाही गणराज्य झाले.
स्वातंत्र्य चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतलेल्या किंवा स्वातंत्र्य चळवळ अनुभवलेल्या पिढीच्या हातात सत्ता आली होती. त्यांनी त्याग अनुभवलेला होता. ते भारावलेपण होते; पण स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या दुरवस्थेला इंग्रज सरकार कारणीभूत आहे, स्वतंत्र भारतात जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्याच्या जाणिवेपेक्षा जे काही करायचे आहे ते सरकारनेच केले पाहिजे, असा विचार कायम राहिला. याच काळात अन्न, वस्र, निवारा या गरजा महत्त्वाच्या होत्या. विशेषतः अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे गरजेचे होते. शेती, शेतीसाठी पाणी, दळणवळण, शिक्षण यासाठी प्रयत्न केले गेले. पंचवार्षिक योजनांच्या नियोजनातून अनेक बाबतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला गेला.
स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचनेचा निर्णय घ्यावा लागला. एकच भाषा बोलणाऱ्या बहुसंख्य लोकांची राज्ये निर्माण झाली. मुंबई प्रांतातील मराठी भाग, मध्य प्रांतातील वऱ्हाड व मराठवाडा या सर्व मराठी भाषिक प्रदेशाचे महाराष्ट्र हे राज्य 1 मे 1960 रोजी निर्माण झाले. अशाच प्रकारे देशात विविध भाषिक प्रांतांची राज्ये अस्तित्वात आली. त्या त्या प्रदेशातील मातृभाषेत शिक्षण सुरू झाले. शिक्षण आणि सांस्कृतिक विकासासाठी ही बाब पोषक ठरली. याच भूमिकेतून अनेक राज्यांनी उत्तम सांस्कृतिक विकास साधला. भाषिक अस्मिता, प्रादेशिकता यातून पुढे काही प्रश्नही निर्माण झाले. सुरुवातीच्या काळात शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास यावर भर देण्यात आला.त्यानंतर अनेक राज्यांनी कृषी व औद्योगीकरण यांच्या विकासावर भर दिला.
देशातील 70 टक्के लोकांचा व्यवसाय शेती, त्यामुळे शेतीत सुधारणा करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक होते. शेतीच्या विकासासाठी कृषी विद्यापीठांच्या निर्मितीपासून शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांपर्यंत अनेक बाबींचा समावेश होता. 1991 मध्ये व्यापार विषयक उदारीकरणाचे धोरण भारताने स्वीकारले. त्यानंतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आल्या. भारतासाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली. मोठमोठे प्रकल्प भारतात सुरू झाले. अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. भारतीय अर्थकारणाला बळकटी मिळत गेली. भारताचा विकास दर वाढत गेला. याच दरम्यान सेवा क्षेत्रातील संधी उपलब्ध झाली. संगणकाच्या माध्यमातून दुरस्त पद्धतीने पुरविल्या जाणाऱ्या सेवांसाठी भारताची भूमी उपयुक्त ठरली.
भारत हा शांतताप्रिय देश आहे पण तरीही युद्ध लादली गेली. 1962 मध्ये चीनने आपल्यावर आक्रमण केले. 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. 1971 मध्ये बांगलादेश मुक्तीसाठी भारताने प्रयत्न केले. 1999 मध्ये कारगिल युद्ध झाले. अशा संकटाच्या काळात युद्धावर अधिक खर्च होतो. मनुष्यहानी होते. देशाच्या विकासाला खीळ बसते; पण त्यावरील इलाज नसतो. याबरोबर दुष्काळ, महापूर, भूकंप, चक्रीवादळ अशा अनेक नैसर्गिक संकटांना तोंड दिले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात झालेल्या अणुचाचणीने भारत हा एक अण्वस्त्रधारी देश आहे, हे सिद्ध झाले होते. त्याचा आपल्या परराष्ट्र धोरणावरही परिणाम झाला होता.
भारतीय अवकाश क्षेत्रात इस्रो या संस्थेने मोठी कामगिरी केली आहे. अगदी मंगळापर्यंत मजल मारली आहे. गेल्या सात दशकांत सर्व क्षेत्रात प्रगती झाली आहे. भारताचे अर्थकारण समृद्ध होत गेले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाने माणसाचे जीवन सुखकर केले. बदलत्या काळात भौतिक सुविधा झाल्या. मनोरंजनासाठी साधने आली. याचबरोबर सामाजिक जीवनही बदलले. 75 वर्षांत लोकशाहीमुळे परिवर्तन घडले. मंडल आयोगामुळे व अंमलबजावणीमुळे इतर मागासांना शिक्षणात, राजकारणात संधी मिळाली. समाजातील एक मोठा घटक परंपरेच्या चौकटीत अडकला होता. स्त्रियांना शिक्षणामुळे दास्यमुक्ती मिळाली. त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला. त्यांना समान संधी मिळाली.
धार्मिक स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य यामुळे अनेक शतके दडपला गेलेला आवाज साहित्यातून, सभांमधून व्यक्त झाला. सर्व सकारात्मक बदल घडत असताना, भ्रष्टाचार मात्र वाढीस लागला. निवडणुकांचा खर्च वाढला. निधर्मी देशातील निवडणुका मात्र जातीच्या आधारावर होतात. तिकीट वाटपाचा आधारच जात किंवा धर्म हा असतो. जात धर्माच्या भावनिक खेळावरच निवडणुका जिंकल्या जातात. हे वास्तव आहे. भविष्यकाळात यामध्ये फरक पडेल, प्रचाराची तंत्रे बदलतील त्यामुळे आज प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी भविष्यकाळात कमी होतील असे वाटते.
भारतीय समाज हा कुटुंबवत्सल आहे. कुटुंबातील सर्वांनी उत्पादक काम केले पाहिजे. आपल्या परंपरेनुसार कुटुंबातील एखादी व्यक्ती कमावणार आणि बाकी इतर त्याच्यावर अवलंबून असणार, हे बंद झाले पाहिजे. प्रत्येकाने वेगवेगळी कौशल्य आत्मसात करून, काही ना काही निर्मिती केली पाहिजे. तरच कुटुंबाचे, पर्यायाने देशाचे उत्पादन वाढेल. देश अधिक समृद्ध बनेल.
आपल्या भारत देशाने सर्वच बाबतीत प्रगती केली आहे, असे वाटते. यामध्ये पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यापासून सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत, सर्वच राजकीय क्षेत्रातील मान्यवर, तसेच साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, औद्योगिक क्षेत्रातील सर्वांनी देशासाठी योगदान दिले आहे. अशा सर्वांच्या सामुदायिक योगदानातून देश प्रगती करत आहे. तरीही सामान्य नागरिकांपासून सर्वांनी देशहीत हे प्राधान्य मानून कार्यरत राहिल्यास देशाची कीर्ती आणि समृद्धी अधिक वाढेल.