जिहीं आपणपे नाही देखिले । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले । जैसे रंक का आळुकैले । तुषाते सेवी ।। 110:5 ।।
श्री ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायातील ओवी क्र. 110, 112, 121, 128 यामध्ये माऊली म्हणतात, ज्यांनी स्वतःला बघितले नाही त्यांनाच इंद्रियसुखात आनंद मिळतो. ज्याप्रमाणे एखाद्या भुकेल्या गरीब माणसाला कोंडा खाण्यातच सार्थक वाटते.
तसेच ज्यांना स्वस्वरूप दिसले नाही, ज्यांना आत्मानंदाबद्दल आस्था नाही त्यांनाच विषयसुखात गोडी वाटते. (खऱ्या आणि खोट्या सुखातील) अंतर त्यांना ठाऊक नसल्याने त्यांना (इंद्रियसुख) हेच सुख वाटते. सांग बघू शेणकिड्याला शेणाबद्दल किळस येऊ शकेल का?
पण जे पुरुष विरक्त झाले आहेत ते मात्र इंद्रियसुखाला विषासारखे दूर सारतात, ज्यांच्या मनातून (काही प्राप्त करण्याची) आशा निघून गेली आहे त्यांना या इंद्रियसुखरूपी दुःखाचे दर्शनही आवडत नाही.