– विलास पंढरी
आज गुरुपौर्णिमा. अखंड-मंडलाकारं व्याप्तम येन चराचरम तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः अशी प्रचंड व्याप्ती असलेल्या गुरूची पूजा करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.
“गुरुर्ब्रह्मा: गुरुर्विष्णूः गुरुदेवा महेश्वरा: गुरूः साक्षात परब्रह्म, तस्मैः श्रीगुरुवे नमः’, गुरू परब्रह्म आहे अशी गुरूची महती वर्णिलेली आहे. संत रामदास एके ठिकाणी म्हणतात, गुरू थोर म्हणावा की देव थोर म्हणावा? आधी नमस्कार कोणाला करावा? मला भासतो सद्गुरू थोर आहे, तयाचे प्रसादे श्रीरघुवीर पावे. म्हणजे रामदास स्वामी गुरूला देवापेक्षाही मोठे मानतात, अशी गुरूची महती आहे. कितीही मोठा माणूस असला तरी त्याला मिळणारे ज्ञान, यश आणि कीर्तीसाठी गुरूची आवश्यकता असतेच. त्यामुळेच म्हटलेले आहे-
गुरुविण कोण दाखवील वाट।
आयुष्याचा पथ हा दुर्गम,
अवघड डोंगर घाट।।
आयुष्यात अत्यंत यशस्वी व मोठ्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्यांच्या गुरूच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून, पुढे जात मोठ्या झाल्या. अगदी एकलव्याचेच उदाहरण घ्या. गुरूने त्याला नाकारले तरी त्याने सरावाच्या वेळी आपल्या गुरूचा पुतळा उभा करून धनुर्विद्येचा अभ्यास केला व मोठा धनुर्धर बनला. गुरू शिष्याची ऊर्जा ओळखतो आणि त्याची पूर्ण क्षमता विकसित करण्यास मदत करतो. हल्लीच्या काळातील महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि आचरेकर सरांचे उदाहरण सर्वश्रुत आहे.
गुरुपौर्णिमेला जगाला प्रज्ञा, करुणा आणि मैत्रीचे शिक्षण देणारे, भगवान बुद्ध यांना विहारात जाऊन वंदन केले जाते. आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटले जात असले तरी हा एक बौद्ध सणही आहे. बौद्ध धर्म ग्रंथांनुसार भगवान बुद्धांनी सारनाथ येथे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पहिल्या पाच शिष्यांना उपदेश केला होता, म्हणूनच बौद्ध धर्माचे अनुयायी देखील गुरुपौर्णिमा उत्सव पूर्ण निष्ठेने साजरे करतात. भारतासह कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, म्यानमार अशा वेगवेगळ्या देशांमंध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
शीख धर्मात गुरूंना विशेष स्थान आहे. केवळ शारीरिक अस्तित्वातीलच गुरू मानले जाण्याची गरज नाही. मनामध्ये खरी उत्कटता आणि श्रद्धा असेल तर गुरू कोणत्याही रूपात सापडतो. शिखांचे गृरूग्रंथ हे याचे उदाहरण सर्वश्रुत आहे. एकलव्याला गुरू मातीच्या पुतळ्यामध्ये सापडला आणि तो एक महान धनुर्धर बनला. चाणक्यसारख्या गुरूंनी चंद्रगुप्तला चक्रवर्ती सम्राट बनविला.
गुरू शब्दाचे महत्त्व त्याच्या अक्षरांमध्ये आहे. संस्कृतमध्ये जो अज्ञानाच्या अंधारापासून मुक्त झाला तो गुरू आहे. पालक हे आपल्या जीवनाचे पहिले गुरू आहेत. पुरातन काळात शिक्षणासाठी गुरूकुलांची एक प्रणाली होती. आज त्यांची जागा शाळा-महाविद्यालयांनी घेतली आहे.
आषाढ पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा “व्यासपौर्णिमा’ असेही म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली असे म्हणतात. त्यामुळेच “व्यासोत्छीष्टम् जगत्सर्वम्’ असे म्हटले जाते. व्यासांनी वेदांचे नीट विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत हा सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ आहे. महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे.
भारताने जगाला योग आणि आयुर्वेदाची देणगी दिली आहेच, पण गुरू शिष्य परंपरेचीही भारताची वेगळी ओळख आहे. गुरू शिष्य नाते प्रेमाचे, विश्वासाचे आणि श्रद्धेचे असते. गुरू नेहमीच प्रेरणादायी असतात. कुंभार जसे मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याप्रमाणे गुरू आपल्या जीवनाला, व्यक्तिमत्त्वाला घडवत असतात. त्यांच्यामुळेच आपल्या जीवनाला खरा आकार प्राप्त होतो.
गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते. विशेषतः गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरूच नव्हे, तर आई-वडील, घरातील ज्येष्ठ, मोठ्या भाऊ-बहिणींचे आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. गुरू अशी शक्ती आहे जी ज्ञानाला धारण करण्यात सक्षम असते व स्वत:च्या शक्तीने या ज्ञानाच्या साहाय्याने शिष्याला गुरूस्थानी आणू शकते.
गुरूशी एकरूप झाल्यावर आपल्याला आपल्या जीवनात कृपेचा ओघ वाढल्याचे जाणवते. जास्त कृतज्ञता म्हणजे जास्त कृपा. जास्त कृपा म्हणजे, जास्त आनंद आणि जास्त ज्ञान.
ज्ञानाशिवाय, सुज्ञपणाशिवाय,आकलनाशिवाय जगण्याला काही अर्थ नाही. गुरू म्हणजे सर्वात मोठा आधार. आपल्या चेतनेत जेव्हा गुरूतत्त्व येते तेव्हा जीवनात ज्ञान, विवेक यांचा उदय होतो. सर्व परिसीमा गळून पडतात, भोवतालच्या सर्वांबद्दल आणि संपूर्ण विश्वाबद्दल एकत्व आणि ममत्व वाटते. तेव्हा त्याला गुरूतत्त्व म्हणतात. जेव्हा आपण पूर्णपणे निरिच्छ होऊन जातो तेव्हा जीवनात गुरूतत्त्वाचा उदय होतो.
व्यासपूजन करण्याच्या बरोबरीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते. शाळा, महाविद्यालये यातील शिक्षक, आध्यात्मिक गुरू, कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.