प्रेम आधी की लग्न आधी, हा अनेकांच्या दृष्टीनं “कोंबडी आधी की अंडं’ असा यक्षप्रश्न असतो. अनेकांना त्यांच्यावर प्रेम करणारं कुणी भेटतच नाही, तर अनेकांना भेटूनदेखील टिकवता येत नाही. ठरवून लग्न करावं, लग्नानंतर प्रेम आपोआपच होतं, असं काहींचं ठाम मत असतं तर काहीजण हे ठरीव लग्न केवळ प्रेमविवाह करणं जमलं नाही म्हणून स्वीकारतात. काही स्त्री-पुरुष प्रेमात अयशस्वी झाल्यानंतर ब्रेकअप वगैरे करून अरेंज मॅरेजची पद्धतच कशी योग्य आहे, हे सांगू लागतात.
अर्थात ठरवलेलं लग्न आणि प्रेमविवाह एवढे दोनच पर्याय आता उरलेले नाहीत. मॅट्रीमोनी साइट्स आहेत, वधुवर सूचक मंडळांचे परिचय मेळावे वगैरे आहेत. अशा ठिकाणी लग्नाआधी परस्परांना भेटून अंदाज घेता येतो. अर्थात, पर्याय कितीही उपलब्ध असले तरी लग्न ही “टिकवण्याची’ गोष्ट आहे, हे बऱ्याच जणांना अजूनतरी मान्य आहे. मध्यंतरी लग्नं मोडण्याचं प्रमाण अचानक वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली गेली.
मग “लिव्ह इन रिलेशनशिप’ वगैरे ऑप्शन्स आले. परंतु त्यातली जोडपीसुद्धा विवाहित जोडप्यांसारखीच हक्कासाठी, प्रॉपर्टीसाठी कोर्टात धाव घेऊ लागली. मग त्यांच्यात आणि विवाहितांच्यात काय फरक राहिला? मुलांनी मुलींशी, मुलींनी मुलांशी, मुलींनी मुलींशी, मुलांनी मुलांशी लग्नं करून पाहिली आणि अखेर “एकला चलो रे’ म्हणजे स्वतःशीच लग्न करण्याचा पर्याय पुढे आला.
खरं तर ज्याला लग्न करण्यासाठी कुणी “तोलामोलाचं’ सापडत नाही,भिन्नलिंगी किंवा समलिंगी लग्नामध्ये ज्याला किंवा जिला रस नाही, “लिव्ह इन रिलेशन’ही मान्य नाही, अशांसाठी लग्न न करणं हाच पर्याय आतापर्यंत होता. पण मग अशांना लग्नसोहळाही अनुभवता येणार नाही. म्हणून मग स्वतःशीच लग्न करण्याचा पर्याय आता पुढं आलाय. भारतातला असा पहिला विवाह (सोलोगॅमी) 11 तारखेला गुजरातमध्ये होणारंय. थोडक्यात काय, तर “मी लग्न करतोय,’ हे जसं बॅंड लावून सांगितलं जातं, तसंच “मी लग्न करणार नाही,’ हे वाजतगाजत सांगणं!
वैगुण्य असणाऱ्यांपासून प्रेमात धोका खाणाऱ्यांपर्यंत अनेकजण अविवाहित राहिले. पण “माझं स्वतःवर प्रेम आहे,’ असं सांगायचं आणि त्यासाठी लग्नासारखाच सोहळा आयोजित करायचा, सगळे सोपस्कार करायचे, म्हणजे “सोलोगॅमी’ होय. अक्षता, सप्तपदी वगैरे सगळं स्वतःचं स्वतःशी! त्यासाठी लग्नासारखेच महागडे कपडे, दागिने आणि पार्टीचा मोठा खर्च…असा हा विवाह करणाऱ्या क्षमा बिंदू या वडोदऱ्याच्या मुलीनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. थोडक्यात, स्वयंवरापासून आपण स्वयंविवाहापर्यंत पोहोलो आहोत. खरं तर ही एकप्रकारे कबुलीच आहे. कुणाशीही, कसंही लग्न केलं तरी आपलं प्रेम स्वतःवरच सर्वाधिक असतं, याची कबुली!
दुसऱ्या कोनातून विचार केला तर सोशल मीडियावर “सेल्फी’ टाकून लाइक्स मोजण्याच्या मानसिकतेचाच हा दुसरा अध्याय! “अहम्’ मोठा झाल्यामुळंच भांड्याला भांडं लागतं, ब्रेकअप होतात हे खरं; पण स्त्री-पुरुषांनी (किंवा समलैंगिकांनी) बेगडीपणे का होईना, एकमेकांना “आय लव्ह यू’ म्हणणंही आता इतकं निरुपयोगी ठरतंय का? मग ब्राझीलच्या ख्रिस गॅलेराने “सोलोगॅमी’नंतर स्वतःलाच घटस्फोट का दिला? मुख्य म्हणजे, स्वतःवरच फक्त प्रेम करायचं तर जग जवळ का आणलं आपण?