– डॉ. ऋतु सारस्वत
धर्म, जाती, वर्ग या सगळ्या सीमा ओलांडून मुली आजही “परक्याचे धन’च ठरतात. हे एक असे “धन’ आहे, ज्याची पाठवणी करण्याचीसुद्धा किंमत मोजली जाते.
मुलींच्या जन्मामुळे भारतीयांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलते की चिंतेची रेषा उमटते? भारतात मुलीचे लग्न झाल्यानंतरच तिचे जीवन सार्थकी लागले, असे का मानले जाते?
स्वतःचे अस्तित्व, स्वतःची ओळख, स्वतःची इच्छा हे शब्द आजही मुलींच्या जीवनाच्या शब्दकोशात का नाहीत? या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील, तर प्रथमतः हे प्रश्न आहेत, हे मान्य केले पाहिजे. वस्तुतः हे प्रश्न पडतच नाहीत; कारण धर्म, जाती, वर्ग या सगळ्या सीमा ओलांडून मुली आजही “परक्याचे धन’च ठरतात. हे एक असे “धन’ आहे, ज्याची पाठवणी करण्याचीसुद्धा किंमत मोजली जाते.
आपल्या समाजातील ही किती विद्रुप प्रथा आहे! जी आपले घर सोडून परक्याचे घर आपल्या त्यागाने, तपश्चर्येने आणि समर्पणभावाने सांभाळते, तिला त्याच घरात पहिले पाऊल ठेवण्यासाठी लाखोंचा हुंडा द्यावा लागतो. परंपरेच्या नावाखाली होणारा हा सौदा पीडादायक नाही का? ज्या परंपरांना समस्या मानून शाळा-कॉलेजात त्यावर निबंध लिहिले जातात, तो फक्त शब्दांचा खेळ ठरतो, हे हास्यास्पद नाही का? या परंपरेचे काय करायचे, यावर विचार करायला मात्र समाज तयार नाही.
जागतिक बॅंकेच्या एका विस्तृत सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, यात जे वास्तव उघड करण्यात आले आहे, त्यातूनच भारतीय मुलींच्या स्थितीचे यथायोग्य वर्णन होते. हे सर्वेक्षण 1960 ते 2008 या कालावधीत देशाच्या 17 अशा राज्यांमध्ये करण्यात आले होते, जिथे देशाची 96 टक्के लोकसंख्या राहते. या भागातील 40 हजार लग्नांमध्ये हुंडा देण्या-घेण्याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणात करण्यात आला. त्याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. 95 टक्के लग्नांमध्ये हुंडा दिला गेला होता. 1961 मध्ये भारताने हुंड्यावर कायद्याने बंदी आणली, तरीसुद्धा ही स्थिती आहे. या कायद्याचा वापर सामान्यतः अशा वेळी केला जातो, जेव्हा कुटुंबात संघर्ष किंवा वेगळे होण्याची परिस्थिती निर्माण होते. अन्यथा हुंडाविरोधी कायद्याची सर्रास पायमल्ली करणे हा जणू भारतीयांचा जन्मसिद्ध अधिकारच असावा, असे वाटते. जागतिक बॅंकेच्या अहवालाने ज्या वास्तवाचा उल्लेख केला आहे, त्यामुळे भल्या-भल्या बुद्धिजीवी लोकांच्या अंदाजाला सुरूंग लागला आहे. हुंड्याच्या विरोधात ज्या गोष्टींकडे सक्षम पर्याय म्हणून पाहिले जात होते, त्या गोष्टी म्हणजे मुलींचे उच्चशिक्षण आणि स्वावलंबन. मात्र, हे अंदाज साफ चुकीचे ठरले आहेत.
भारतात ज्या दोन राज्यांत हुंड्याची देवाणघेवाण सर्वाधिक प्रमाणात होते ती राज्ये म्हणजे केरळ आणि गुजरात. दोन्ही राज्यांमध्ये महिलांची परिस्थिती देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत कितीतरी चांगली आहे; परंतु तरीही सुशिक्षित मुलींचे आईवडील हुंड्याची मोठी रक्कम चुकती करतात. हा एक गंभीर प्रश्न आहे. आपल्या देशात हुंड्याच्या कारणावरून दर चार तासांत एका महिलेचा बळी घेतला जातो, तरीही आपल्याकडे लोकांची अशी मानसिकता आहे, की हुंड्याची मोठी रक्कम म्हणजे मुलीच्या सुखाची केलेली व्यवस्था आहे. मुलीची सुरक्षितता आणि सुखासाठी जे लोक आपली आयुष्याची कमाई खर्ची घालतात, त्यांच्या मनात आपण स्वतःचीच फसवणूक करीत आहोत असा विचार येतो का? खरेदी-विक्री तर निर्जीव वस्तूची होते. मुली वस्तू आहेत का? आणि जर नसतील तर त्यांच्यासाठी नवरे खरेदी का केले जातात? जी मुले आपली किंमत निश्चित करतात, त्यांना काही दिवसांनंतर जर स्वतःची त्याहून चांगली किंमत मिळाली तर ते मागे हटतील का?
आपल्या देशात हुंड्यापायी हसतमुखाने प्राणार्पण करणाऱ्या कोट्यवधी “आयशा’ आहेत; परंतु तरीही आपल्या मानसिकतेत जरासुद्धा बदल होत नाही. हुंड्याच्या मागणीसाठी काही महिन्यांपूर्वी आयशाने साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूमुळे लोक काही काळ भावनाविवश झाले; परंतु पुन्हा एकदा तीच परंपरा पुढे सुरू राहिली. हुंड्यासाठी दबाव आणल्याबद्दल मुलाकडच्या लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते; मात्र मुलीकडील लोकही स्वतःला निर्दोष मानू शकत नाहीत.
कारण मुलांची किंमत त्यांच्या घरच्या मंडळींनी निश्चित केली असली, तरी ती द्यायची की नाही याचा निर्णय सर्वस्वी मुलीच्या घरच्या मंडळींनी घ्यायचा असतो. ज्या क्षणापासून विवाह हे मुलीच्या आयुष्याचे अंतिम उद्दिष्ट नाही, असे मानले जाईल त्या क्षणापासून विवाह हे प्रतिष्ठेचे द्योतक राहणार नाही. ज्या घरात तुम्ही जन्माला आलात, त्या घरात तुम्ही काही वर्षांच्या पाहुण्या आहात, याची जाणीव मुलींना जन्मल्यापासून करून दिली जाणार नाही. त्याच क्षणापासून मुले आपली किंमत ठरवणे बंद करतील.
अर्थात, हे खूप कठीण काम आहे. एखाद्-दुसऱ्या कुटुंबाने विचार बदलल्यामुळे हुंडामुक्त भारताचे स्वप्न साकार होऊ शकणार नाही. समाजातील संवेदनशील आणि प्रभुत्व असलेला वर्ग जेव्हा याविरुद्ध आवाज उठवेल, तेव्हा रस्ता खऱ्या अर्थाने सोपा होईल. उदाहरणार्थ, आयशाच्या मृत्यूनंतर आग्रा येथील मशिदींमधून हुंडा न घेण्याचे आवाहन केले गेले, ही एक चांगली सुरुवात ठरू शकते. आपण आपल्या मुलीच्या लग्नात हुंडा देऊन तिच्यासाठी सुखाचे नव्हे तर दुःखाचे दरवाजे उघडत आहोत, हे आपण समजून घेतले पाहिजे. पालक असून असे करणे योग्य ठरेल का?