खरे तर कोणत्याही एखाद्या चांगल्या घटनेची वर्षपूर्ती आनंदाने साजरे करण्याची प्रथा आणि परंपरा आहे. मात्र, गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या एका विषाणूने साऱ्या जगाला हादरून टाकले आहे, त्या विषाणूच्या जगातील प्रवेशालाही एक वर्ष पूर्ण झाल्याने त्याची आठवणही साऱ्या जगाला ठेवावी लागणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चीनमधील वुहान प्रांतामध्ये करोना विषाणूचे रुग्ण प्रथम उघडकीस आले होते आणि अल्पावधीत जगाच्या कानाकोपऱ्यात या विषाणूचा प्रसार सुरू झाला. 2019 या वर्षाच्या अखेरच्या काही महिन्यांमध्ये या विषाणूचा शोध लागल्याने या विषाणूला कोविड-19 असे म्हटले जात असले, तरी 2020 हे संपूर्ण वर्ष या विषाणूने खाऊन टाकले होते आणि लवकर सुरू होणारे 2021 या वर्षातील पहिले काही महिने या विषाणूने प्रभावाखाली ठेवले, तर आश्चर्य वाटायला नको. एका वर्षानंतरही करोना विषाणूच्या आजारावर अद्याप लसीचा शोध लागलेला नाही. हा विषाणू मानवनिर्मित आहे का, याबाबतची शंकाही अद्याप बाजूला झालेली नाही.
महासत्ता होऊ पाहणाऱ्या चीनने आपल्या जीव जैविकयुद्धाचा एक भाग म्हणून प्रयोगशाळेत हा विषाणू तयार केला आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवला, असे म्हटले जाते. अमेरिकेसकट युरोपातील अनेक देशांनी या विषाणूच्या निर्मितीसाठी आणि प्रभावासाठी चीनला जबाबदार धरले आहे. सध्या चीनमध्ये या विषाणूचा प्रभाव अत्यंत कमी आहे; पण युरोप आणि अमेरिकेमध्ये मात्र दुसरी लाट येत आहे, ही गोष्टही या ठिकाणी महत्त्वाची मानावी लागेल. जगातील आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी जागतिक आरोग्य संघटना याबाबत कोणतीच भूमिका घेत नाहीये.
हा विषाणू कशाप्रकारे तयार झाला आणि त्याचा प्रसार कशा प्रकारे झाला याबाबत संशोधन करण्याचे कोणतेही परिश्रम गेल्या वर्षभराच्या कालावधीत जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेले नाहीत. त्यामुळे 2020 हे वर्ष संपत आले तरीसुद्धा जगात अनेक ठिकाणी या विषाणूचा प्रभाव कायम आहे. या विषाणूवरील लस अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यात असली, तरी ही लस कितपत प्रभावी ठरू शकेल याबाबत आतापासूनच शंका घेतल्या जात आहेत. लसीकरण करून या विषाणूंवर नियंत्रण ठेवता येणार नाही, तर अतिरिक्त औषधांचा डोसही द्यावा लागेल अशा प्रकारचे विधान मध्यंतरी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने केले होते. 2020 च्या प्रारंभी जेव्हा या विषाणूचा प्रभाव दिसू लागला तेव्हा जगातील बहुतेक देशांना असेच वाटत होते की, एक-दोन महिन्यांमध्ये हा विषाणू संपून जाईल आणि जग पूर्ववत होईल; पण तसे झालेले नाही.
2020 च्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत जगातील सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प करण्याचे काम या विषाणूने केले आहे. लोकांची जीवनशैली बदलून टाकली आहे. लॉकडाऊन व अनलॉक यासारखे नवीन शब्द वर्षभराच्या कालावधीमध्ये लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. पहिले काही दिवस दैनंदिन व्यवहार बंद असले, तरी नंतर काही प्रमाणात सवलत देण्यात आल्याने “वर्क फ्रॉम होम’ ही नवी संस्कृती भारतासारख्या देशातही रुजली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार कपात झाल्याने बेरोजगारीचे प्रमाणही वाढले. काम करून पोट भरणाऱ्या रस्त्यावरील विविध विक्रेत्यांचे हाल मोठ्या प्रमाणावर झाले. हॉटेल, पर्यटन, शैक्षणिक संस्था, मंदिरे ही सर्व महत्त्वाची ठिकाणे संपूर्णपणे बंद होती. त्यामुळे या घटकांवर अवलंबून असणारे विविध घटक पूर्णपणे संपून गेले.
गेल्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतात अनेक ठिकाणी सर्व दैनंदिन व्यवहार सुरू झाले असले, तरी या व्यवहारांना करोनाच्या भीतीची झालर आहे, हे मान्यच करावे लागेल. त्यामुळे या आगामी कालावधीमध्ये काळजी घ्यावीच लागणार आहे. गेल्यावर्षी वुहानमध्ये सुरू झालेल्या करोना संकटाला वर्ष होत असतानाच अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर करोना विषाणूची दुसरी लाट आलेली आहे, ही गोष्ट विशेषत: भारतासारख्या देशाने लक्षात घ्यायला हवी. योग्य वेळी केलेले लॉकडाऊन आणि इतर प्रतिबंधक उपाय यांचा योग्य वापर यामुळे भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये अद्यापही रुग्णांची संख्या एक कोटीच्या वर गेलेली नाही, ही खरोखरच अभिनंदनाची बाब असली तरी आगामी कालावधीमध्येही गाफील राहून चालणार नाही. हीच गोष्ट या वर्षपूर्तीच्या निमित्ताने लक्षात घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पालन, मास्क व सॅनिटायझरचा वापर याच्या जोडीला वैयक्तिक स्वच्छता, हा महामंत्र जपला जात आहे. तो यापुढेही जपावा लागणार आहे.
जेव्हा चीनमध्ये हा विषाणू प्रथम लक्षात आला त्यानंतर इतर कोणत्याही देशाने चीनमधून आपल्या देशात येणारी हवाई वाहतूक रोखली नसल्याने त्या प्रवाशांच्या माध्यमातून हा विषाणू जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला. जगातील संपूर्ण हवाई वाहतूक बऱ्यापैकी सुरू झाली असल्याने आणि युरोपमध्ये दुसरी लाट सुरू झाली असल्याने विमान प्रवाशांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा विषय अधिक गंभीर होण्याचा धोका नाकारता येत नाही. गेल्या वर्षी जी काळजी घेण्यात आली नव्हती ती काळजी यावर्षी घायला हवी. विशेषत: भारतासारख्या मोठ्या देशाने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. युरोप आणि अमेरिकेतून येणाऱ्या प्रवाशांची योग्य आरोग्य तपासणी करूनच त्यांना भारतात प्रवेश देण्याचा निर्णय झाला तरच भारतातील करोनावर नियंत्रण ठेवता येऊ शकेल.
मुळात भारतात अद्यापही मोठ्या प्रमाणावर असा एक वर्ग आहे की, ज्याला कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन करायचे नाही. मास्क वापरण्याचा नियमही अनेकजण गांभीर्याने पाळत नाहीत. मास्कच्या वापराने तुम्ही करोनाला दूर ठेवू शकता, असा प्रचार अनेक वेळा सर्व माध्यमांवर केला असूनही लोक त्याबाबत गंभीर नाहीत, ही चिंतेची बाब आहे. भारतात आता सर्व दैनंदिन व्यवहार सुरू झाले असल्याने आणि शैक्षणिक व्यवहारही नजीकच्या काळामध्ये सुरू होणार असल्याने सर्वोच्च पातळीवर काळजी घेण्याची हीच वेळ आहे, हे कोणालाही विसरून चालणार नाही.
सरकार आणि सरकारी यंत्रणा आपापल्या पातळीवर काम करत असल्या तरी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर काळजी घेतली तरच 2021 हे वर्ष भारतासाठी करोनामुक्त जाऊ शकते. करोनावर अद्याप कोणतेही ठाम असे औषध नसल्याने आणि लसही अंतिम टप्प्यात असल्याने सध्या कोणताही धोका पत्करण्यासारखी परिस्थिती नाही, असा संदेश या विषाणूच्या वर्षपूर्तीनिमित्त किमान प्रत्येक भारतीयाने तरी मनावर बिंबवून ठेवायला हवा. एक मात्र निश्चित की करोना विषाणूचा हा वाढदिवस जगाच्या पाठीवर कोणीही साजरा करणार नाही. उलट विषाणू लवकरच नष्ट होवो, अशाच प्रकारच्या शुभेच्छा यानिमित्ताने दिल्या जातील.