– राजाराम महाराज फड
ठावो न पवता जयाचा । मनेसी मुरडली वाचा ।। तो देव होय शब्दाचा । चमत्कारू।।
माऊली शब्दसृष्टीतील चमत्काराचे वर्णन करत आहेत. शब्द अमर असला तरी बोलणाऱ्या सर्वांचेच शब्द अमृतवचने होत नाहीत. मर्त्य असणाऱ्या जीवाला शब्दच अजरामर करत असतात मात्र ते शब्द प्रासादिक असायला हवेत. मनासारखं सूक्ष्म असणारं अकरावं इंद्रियसुद्धा ज्या परब्रह्माचा ठाव घेऊ शकत नाही तिथे नेत्रादिक इंद्रियांचा प्रवेश कसा होऊ शकेल?
मात्र माऊली म्हणतात, असं हे मनवाचातित असणारं परब्रह्मतत्त्व माझ्या शब्दात आलं कारण की माझ्यावर श्रीगुरूंची कृपा झाली. हा चमत्कार माझ्या श्रीगुरूंच्या कृपेमुळे झाला. ज्ञानेश्वरी हा सृष्टीतील अलौकीक चमत्कार आहे. श्रीगुरूंच्या कृपेचं ते वैभव आहे.
ग्रंथ नव्हे कृपेचे । वैभव तिये ।।
असं परतत्त्वाचा स्पर्श लाभलेलं शब्दवैभव श्रीगुरूंच्या कृपेमुळेच प्राप्त होणं शक्य आहे अन्यथा नाहीच.