-ह.भ.प. नारायण म. शास्त्री
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ।।
हरिपाठातील पहिल्या अभंगाच्या पहिल्या चरणात हरिपाठाच्या अधिकाऱ्याचे व प्रयोजनाचे जे स्वरूप सांगितले आहे त्याला उदाहरण म्हणून महाराज येथे पुराणांतील एका घटनेचा उल्लेख करतात.
माऊली म्हणतात, महर्षी वेद व्यासांनी लिहून ठेवलेल्या खुणेने (महाभारतावरून) सांगतो की, राज्यासारखा संसार करीत असलेल्या पांडवाच्या घरी त्यांनी हरिनामाचे प्रखर व्यसन लावून घेतल्यामुळे द्वारकाधीश श्रीकृष्णाने उष्ट्या पत्रावळी काढल्या व घोड्यांना खरारा करणे अशी अनेक कामे केली.
तात्पर्य, प्रपंच करून परमार्थ करणारा या ग्रंथाचा अधिकारी, चारी मुक्ती हे प्रयोजन, हरीचा नामोच्चार या ग्रंथाचा विषय आहे.