– ह.भ.प. ज्ञानेश्वर म. मुंडे
हरिउच्चारणीं अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे ।।
हरिपाठातील अकराव्या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, हरिनामाचा जप केल्याने अनंत पापाच्या राशी एका क्षणांत नाहीशा होतात. गवताचा व अग्नीचा संबंध झाला की ते गवत अग्नीरूप होते, त्याप्रमाणे हरीचा जप करीत असले म्हणजे जपणारा हरिरूपच होतो.
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदां ।।
हरी या नाममंत्राच्या उच्चाराचे सामर्थ्य अपूर्व आहे. त्याच्या धाकाने भूतबाधा, पिशाच्चबाधा नाहीशी होते. इतकेच नव्हे तर जीवाच्या मागे लागलेल्या पंचमहाभूतात्मक देहाविषयीचा जो अहंकार त्याची देखील बाधा दूर होते, म्हणजे हरिनामाने देहाभिमानाचा नाश होतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा हरी सामर्थ्यवान आहे. त्याच्या स्वरूपाचा यथार्थ निर्णय उपनिषदांनाही झाला नाही.