– ह.भ.प. गणेश म. भा. फड
म्हणे आजि मियां । संपत्ति बहुतेकांचिया। आपुल्या हातीं केलिया । धन्यु ना मी?।।ऐसा श्लाघों जंव जाये । तंव मन आणीकही वाहे। सवेंचि म्हणे पाहे । आणिकांचेंही आणूं ।।हें जेतुलें असे जोडिलें। तयाचेनि भांडवले । लाभा घेईन उरलें । चराचर हें ।।ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया । मग दिठी पडे तया । उरों नेदी ।।
श्री ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायात माऊली म्हणतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असुरी पुरूषाचे वर्णन करून सांगतात, असुर म्हणतो, आज मी बहुतेक सर्वांची संपत्ती आपल्या हाती आणलीच आहे. मग मी धन्य नाही काय? असा जो-जो असुरी स्तुती करतो; तो-तो मनात आणखीन लोकांना लुटण्याची हाव बाळगतो आणि लगेच म्हणतो, उद्या अन्य लोकांचे द्रव्य लुटून आणेन.
माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल, त्याला मी संपवून टाकीन. ज्याला जास्त संपत्तीची हाव आहे, जगात जे काही आहे ते सर्व आपल्याला मिळावे असे ज्याला वाटते तो असुर समजावा.