काळ वेळ नाम उच्चारिता नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ।।
रामकृष्णनाम सर्व दोषां हरण । जडजीवा तारण हरि एक ।।
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वाणी ।।
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठमार्ग सोपा ।।
संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील एकविसाव्या अभंगात म्हणतात, हरीचे नाम घेण्याला शुद्ध काळवेळेची जरुरी नाही, ते हवे तेव्हा घ्यावे. त्या योगाने आपल्या आईचे कुळ व वडिलांचे कुळ अथवा नाम घेणारा व ऐकणारा या दोहोंचाही उद्धार होतो.
रामकृष्णांचे नाम सर्व पापाचा नाश करणारे आहे. याप्रमाणे सर्व पापांचा नाश करून जड जीवांना तारणारा एक हरीच आहे. हरिनाम हेच सार आहे.
भजन करण्याकडे जिव्हेची ज्याने योजना केली आहे, त्याच्या दैवास कोणती उपमा द्यावी? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मजकडून हरीचे चिंतन यथासंग झाले. आता माझ्या पूर्वजांना वैकुंठास जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे.