एथ पार्था पुढतपुढती । तेंचि तें सांगों किती । जरी मियां चाड तरी भक्ती । न विसंबिजे गा ।।
केवळ भक्तीनेच ईश्वरप्राप्ती होते, असे माऊली श्री ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात सांगतात. ओवी क्र. 430 ते 440 यामध्ये माऊली म्हणतात, अर्जुना, तेच ते किती वेळा सांगायचे? माझी जर तुला चाड असेल तर माझी भक्ती कर. कुळाच्या मोठेपणाकडे पाहू नको, कुलीनपणाचा अभिमान बाळगू नको, विद्वत्तेची व्यर्थ घमेंड वाहू नको, रूपाच्या अथवा वयाच्या संपन्नत्वाने फुगून जाऊ नको.
भाव माझ्या ठिकाणी नसेल तर हे व्यर्थ आहे. जळो ते माझ्या भक्तीवाचून असलेले जीवन! अरे, या पृथ्वीवर पाषाण काय कमी आहेत!
निंबाचे झाड फळांनी भरून आले तरी कावळ्यांसच सुकाळ होतो. खापरात वाढून पक्वाने चव्हाट्यावर ठेवली तर ती कुत्र्यांसच उपयोगी पडतात. त्याप्रमाणे भक्तिहीन जिणे म्हणजे संसार-दु:खांनी वाढलेले ताटच होय.