एवढे जिये महिमेचे करणे । ते वाचाबळे वानू मी कवणे । का सूर्याचिया आंगा उटणे । लागत असे ।। केऊता कल्पतरुवरी फुलौरा । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा । कवणे वासी कापुरा । सुवासु देवो ।।
ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यायातील ओवी क्र. 10 ते 13 यामध्ये माऊली गुरूमहिमेबद्दल म्हणतात, अमर्याद असलेल्या गुरूमहिमेचे कर्तृत्व शब्दांमध्ये मी कसे बांधू?
ज्याप्रमाणे सूर्याच्या कांतीला उटणे लावून तेजस्वी करणे हास्यास्पद आहे, कल्पतरूला इच्छापूर्तीसाठी पूजा बांधणे मूर्खपणा आहे, क्षीरसागरातील दुधाची गोडी स्वयंपाक करून वाढविण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे, कापुराला अत्तर लावून सुवास देण्याचा प्रयत्न करणे, चंदनाला उटी लावणे, अमृताला फोडणी देणे वा आकाशापेक्षाही उंच होण्याचा प्रयत्न करणे ज्याप्रमाणे फोल आहे, त्याचप्रमाणे श्रीगुरूंचे माहात्म्य पूर्णपणे जाणून घेण्याची क्षमता कशात (वा कोणात) आहे? हे कळल्याने मी मौन होऊन नतमस्तक झालो आहे.