पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु । कां दीपद्वेषिया अंधकारु । विवेकद्वेषें अहंकारु । पोषूनि तैसा ।।1278।। स्वदेहा नाम अर्जुनु । परदेहा नाम स्वजनु । संग्रामा नाम मलिनु । पापाचारु ।।1279।। इया मती आपुलिया । तिघां तीन नामें ययां । ठेऊनियां धनंजया । न झुंजें ऐसा ।।1280।। जीवामाजीं निष्टंकु । करिसी जो आत्यंतिकु । तो वायां धाडील नैसर्गिकु । स्वभावोचि तुझा ।।1281।। (अध्याय 18)
पथ्याच्या द्वेषाने जसा ज्वर वाढतो, अथवा दिव्याच्या द्वेषाने जसा अंध वाढतो, तसा विवेकाच्या द्वेषाने अहंकार वाढेल. मग, आपल्या देहाला अर्जुन, दुसऱ्याचे देहाला हे माझे आप्त व यांच्याशी संग्राम करणे हेच पातक, याप्रमाणे आपल्या बुद्धीने तिघांना अशी तीन नावे ठेवून, अर्जुना, मी युद्ध करणार नाही, असा आपले अंतःकरणात पूर्ण निश्चय केलास, तरी तुझा जो नैसर्गिक स्वभाव आहे, तो तुझा निश्चय टिकू देणार नाही.