– ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर
जया आपणपें सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं । तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ।।105।। सहजें स्वसुखाचेनि अपारें। सुरवाडलेनि अंतरें। रचिला म्हणौनि बाहिरें। पाउल न घाली ।।106।। सांगैं कुमुददळाचेनि ताटें। जो जेविला चंद्रकिरणें चोखटें । तो चकोरु काई वाळुवंटें । चुंबितु असे ।।107।। (अध्याय 5 वा)
जो आत्मसुखाला सोडून इंद्रियांच्या गावी येत नाही. म्हणजेच इंद्रिय सुखापासून अलिप्त राहतात, तो विषय सेवन करीत नाही किंवा त्याच्या आहारी जात नाही यात काही आश्चर्य नाही. अंतःकरणात असलेल्या आत्मसुखाच्या अमर्याद स्वाभाविक समृद्धतेने तो संतुष्ट पावलेला असतो. म्हणून सुख प्राप्त करण्यासाठी बाहेर इंद्रियांकडे त्याचे पाऊल पडत नाही.
जो चकोर पक्षी चंद्रविकासी कमळांच्या पानात चंद्रकिरणांतील अमृत कणांचे भोजन करतो, तो वाळवंटातील वाळूचे कण सेवन करील काय? जो आत्मसुखाने संतुष्ट आहे तो विषयसुख शोधण्यासाठी प्रयत्न करीत नाही किंवा आपणहून दुःखाच्या आहारी जात नाही.