पैं पूर्वे वाहतां पाणी। पव्हिजे पश्चिमेचे वाहणीं। तरी आग्रहोचि उरे तें आणी। आपुलिया लेखा ।।1286।। तैसा क्षात्रंस्कारसिद्धा। प्रकृती घडिलासी प्रबुद्धा। आता नुठी म्हणसी हा धांदा। परी उठवीजसीचि तूं ।।1288।। पैं शौर्य तेज दक्षता। एवमादिक पंडुसुता। गुण दिधले जन्मतां। प्रकृती तुज।।1289।। म्हणौनियां तिहीं गुणीं। बांधिलासि तूं कोदंडपाणी। त्रिशुद्धी निघसी वाहणीं। क्षात्राचिया ।।(अध्याय 18)
हे पहा, पूर्वेकडे पाण्याचा ओघ चाललेला असून, पोहणारा जर म्हणेल की, मी “पश्चिमेकडे जाईन,’ तर त्याचे म्हणणे व्यर्थ होऊन ते पाणी त्याला ओघाकडेच (पूर्वेकडेच) ओढून नेईल त्याप्रमाणे, हे प्रबुद्धा, तुझी प्रकृती क्षात्रगुणाने घडलेली असल्यामुळे, मी युद्ध करण्याला उठणार नाही, असे म्हणशील तर ते व्यर्थ होय.
तुझा क्षात्रधर्मच तुला युद्ध करण्यास उठवील. हे बघ अर्जुना, तुझ्या क्षात्रप्रकृतीने शौर्य, तेज, दक्षता इत्यादी गुण जन्मतःच तुला दिले आहेत. हे धनंजया, त्या प्रकृतीच्या गुणानुरोधाने, युद्ध न करता स्वस्थ बसणे होणार नाही.