– ह.भ.प. आदिनाथ म. गुणारे
नातरी निदैवाचा परिवरीं । लोह्या रूतलियां आहाती सहस्त्रवरी। परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ।। तैसा हृदयामध्ये मी रामु । असतां सर्व सुखाचा आरामु । कीं भ्रांतासि कामु । विषयावरी ।
ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात माऊली म्हणतात, दुर्दैवी पुरुषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत, पण तो तेथे राहून उपवास काढतो म्हणजेच दारिद्य्रात जीवन जगतो. त्याप्रमाणे या शरीररूपी घरात देव आहे; पण दैवहीन मनुष्याला तो ओळखता येत नाही. सर्व सुखांचा जणू बगीचा असा मी जो राम सर्वांच्या हृदयात असताना मला न जानता काही लोक सुखाकरीता विषयांचीच इच्छा करतात.
तुकोबाराय म्हणतात,
जनीं वनीं अवघा देव । वासनेचा पुसावा ठाव । मग वोळगा तो वासुदेव । ऐसा मनीं वसू द्या भाव गा ।।
सर्व जनावनांच्या ठिकाणी एक देवच आहे. तो पाहण्याकरिता वासना नष्ट करावी मग वासुदेवाला शरण जावे. असा भाव तुम्ही आपल्या मनात बळकट करा.