– ह.भ.प. गणेश म. भा. फड
तें ज्ञान पैं गा बरवें। जरी मनीं आथि आणावें । तरी संतां यां भजावें। सर्वस्वेसीं।। जे ज्ञानाचा कुरूठा। तेथ सेवा हा दारवंठा। तो स्वाधीन करी सुभटा। वोळगोनी।। तरी तनुमनुजीवें। चरणांसी लागावे। आणि अगर्वता करावें। दास्य सकळ।। मग अपेक्षित जे आपुलें। तेंही सांगती पुसिलें। जेणे अंत:करण बोधलें। संकल्पा नये।।
माऊली म्हणतात, अत्यंत उत्तम असे ज्ञान जर प्राप्त करायचे असेल, मनात आणायचे असेल, तर या शब्दज्ञानी संतांची सर्वभावे सेवा करावी. ते संत म्हणजे साक्षात ज्ञानालय आहेत. त्यांची सेवा त्या घराचा उंबरठा आहे. सेवा करून त्यांना आपलेसे करावे.
देहाने, अंत:करणाने, जावभावे संतचरणाला नमस्कार करावा आणि निराभिमानीपणे त्यांची सेवा करावी. अशी सेवा केली असता, आपल्याला जे आत्मज्ञान अपेक्षित असते, त्या संदर्भात प्रश्न केला असता ते संत ज्ञानोपदेश करतील व त्यामुळे ज्ञानसंपन्न होऊन पुन्हा संशयाला जागा प्राप्त होत नाही.