– ह.भ.प. नारायण म. डमाळे
नातरी आंधाराचेनि रोखें । जैसीं डोळां रोंविजती नखें । तैसा कर्मद्वेषें अशेखें । कर्मेंचि सांडी ।। तयाचें जें कर्म सांडणें । तें तामस पैं मी म्हणें । शिसाराचे रागें लोटणें । शिरचि जैसें ।। भुकेलियापुढें अन्न । हो का भलतैसें उन्ह । तरी बुद्धी न घेतां लंघन । भाणें पापरां हालया ।। तैसा कर्माचा बाधु कर्मे । निस्तरिजे करितेनि वर्में । ते तामसु नेणें भ्रमें । माजविला ।। कीं स्वभावें आलें विभागा । तें कर्मचि वासंडी पैं गा । तरी झणें आतळा त्याला । तामसा तया ।।
माऊली म्हणतात, अंधारात काही दिसत नाही म्हणून अंधाराच्या रागाने आपल्याच डोक्यात मारावीत त्याप्रमाणे जो कर्माच्या रागाने सर्व कर्मे सोडतो. त्याचा कर्मत्याग मी तामस म्हणतो. डोकेदुखीच्या रागाने डोके फोडण्यासारखेच हे कृत्य होय.
भुकेने त्रासलेल्या माणसापुढे काही तरी गरम पदार्थ ठेवावा. परंतु ते त्याच्या मनास न आवडल्याने जर ते अन्न लाथाडून टाकील, तर त्याला उपवास घडेल. याच न्यायाने, कर्माचे बंधकत्व कर्मानेच नाहीसे करावे. ही युक्ती भ्रमाने नादावलेल्या जीवाला कळत नाही.