दसरा आणि त्यानिमित्तानं यंदा होत असलेले एकाच पक्षातील दोन गटांचे दोन मेळावे, हाच विषय आज सर्वाधिक महत्त्वाचा आहे, असं कुणाकुणाला वाटतं? ज्यांना-ज्यांना वाटतं, त्यांनी आपापल्या घरातल्या वाढत्या वयाच्या मुलांचे चेहरे एकदा न्याहाळून पाहावेत. याच पिढीचं आपण उठता-बसता कौतुक करतो. हल्लीच्या मुलांना अमुक आवडतं आणि तमुक गोष्टीकडे हल्लीची पिढी ढुंकूनही बघत नाही, असं कौतुकानं वारंवार म्हणतो.
या मुलांकडेच बघून आपण म्हणतो, की जग बदलून गेलंय. आपल्या पिढीला जे महत्त्वाचं वाटलं, ते पुढच्या पिढीला कस्पटासमान वाटतं… इत्यादी, वगैरे..! आता दसरा मेळाव्यांची मैदानं आठवून पाहा आणि स्वतःला प्रश्न विचारा, “आपण जग बदललंय म्हणतो, त्याचा नेमका अर्थ काय? मुळात हे खरं आहे का?’ पिढ्या बदलल्यानंतर त्यांच्या आवडीनिवडी बदलतात, प्राधान्यक्रम बदलतात; पण त्यांच्या मनात असलेले सध्याचे प्राधान्यक्रम त्यांच्यावर कुठून लादले जातायत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारलाच पाहिजे. या मेळाव्यांना गर्दी करणारी आपलीच मुलं आहेत. येताना ती काय घेऊन घरी येणार? सर्वांप्रती प्रेमभावना की प्रतिस्पर्ध्याविषयी टोकाचा राग आणि द्वेष? जगात इतरत्र कुठेच काही घडत नाही, असं समजून वृत्तवाहिन्या दिवसरात्र एकच विषय लावून धरतात, त्याचा आपल्या मुलांवर नेमका काय परिणाम होत असेल? टोकाचा द्वेष मनामनात भरण्याव्यतिरिक्त नेतेमंडळी काही करतायत का?
जनरेशन-एक्स म्हणजे 1965 ते 1980 च्या दरम्यान जन्माला आलेली पिढी सध्या बहुसंख्येने सर्व स्तरांवरील राजकीय व्यवहार सांभाळत आहे, असं म्हणायला हरकत नाही. जनरेशन-झेड म्हणजे 1997 ते 2010 च्या दरम्यान जन्माला आलेली पिढी वेगवेगळ्या पक्षांची युवा आघाडी सांभाळत आहे. जनरेशन-वाय म्हणजे 1981 ते 1996 दरम्यान जन्माला आलेली पिढी सध्या भरकटलेल्या मनस्थितीत आहे. 1946 ते 1964 दरम्यान जन्माला आलेल्या पिढीचं नाव आहे “सायलेन्ट जनरेशन.’ ही पिढी मार्गदर्शक सर्वत्र मंडळात असायला हवी. सायलेन्ट राहता कामा नये, कारण त्यांच्याकडे अनुभवांचं भांडार आहे.
बदलांना सामोरं जाण्याचं कौशल्य आहे. परंतु या पिढीतली माणसं बोलू लागली तरी त्यांना “सायलेन्ट’ केलं जातं आणि सर्वांत ताज्या पिढीचं मात्र सगळंच खरं आहे, असं मानलं जातं. कारण ही पिढी टेक्नोसॅव्ही मानली जाते. वस्तुतः ती तंत्रज्ञानानं गिळलेली पिढी असल्याचं काही तज्ज्ञ सांगतात. काही जण तर ताज्या पिढीला “टू-जीबी पिढी’ असं नावही देतात. व्हॉट्सऍप, फेसबुकवरचे संदेश हेच वास्तव आहे आणि अखिल विश्वाच्या त्याच मर्यादा आहेत, असं समजून चालणारी ही पिढी आहे. तरीसुद्धा सभा-मेळाव्यांना गर्दी होते ती प्रामुख्यानं याच वयातल्या पोरांची..!
दसऱ्याला रावण-दहनही करतात आणि सोनं म्हणून आपट्याची पानंही वाटतात. एकमेकांना सोनं देणं ही एक प्रतिकात्मक परंपरा आहे. सद्विचारांचा प्रसार करणं हा हेतू त्यामागं आहे. रावण-दहनाच्या मागेही दुर्विचारांचा नाश करणं हाच हेतू आहे. परंतु या परंपरांचा अर्थ समजावून घेऊन खरोखर किती जण त्या पाळतात? किती राजकीय पक्ष आपल्या व्यासपीठावरून हे समजावून सांगतात? म्हणूनच दसऱ्यादिवशी कोणत्याही गटापेक्षा घरातल्या मुलांच्या वयोगटाचा विचार अधिक केलेला बरा..!